Dr. Ambedkar : फक्त सरकारचा कोप होईल म्हणून शाळेत ॲडमिशन दिलं आणि इतिहास घडला..

Dr. Ambedkar : फक्त सरकारचा कोप होईल म्हणून शाळेत ॲडमिशन दिलं आणि इतिहास घडला..

तत्कालीन भारतीय समाजात अस्पृश्यांना हीन वागणूक दिली जायची आणि डॉ. आंबेडकरांनी स्वतः अनुभवली होती.

हर्षदा माने

मुंबई : 6 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन. भारतातील पददलितांसाठी या दिवसाची पहाट सूर्योदयानं नव्हे, तर सूर्यास्तानं झाली. कारण या दिवशी शोषित-वंचितांचा आधार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं.

जगण्यासाठी आणि शिक्षणासाठीच्या वैयक्तिक संघर्षापासून दलितांच्या उत्थानापर्यंत आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना साकारण्यापर्यंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास हा खडतर होता.

Dr. Ambedkar : फक्त सरकारचा कोप होईल म्हणून शाळेत ॲडमिशन दिलं आणि इतिहास घडला..
Inspiration : स्विफ्ट कार कापून तयार केले हेलिकॉप्टर; शेतकऱ्याच्या मुलाची कमाल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील इंदौर जिल्ह्यामधील 'महू' येथे झाला. अस्पृश्य मानल्या जाणार्‍या महार जातीत बाबासाहेबांचा जन्म झाला होता.

तत्कालीन भारतीय समाजात अस्पृश्यांना हीन वागणूक दिली जायची आणि डॉ. आंबेडकरांनी स्वतः अनुभवली होती.

शालेय जीवनापासूनच त्यांना भेदभावाची वागणूक मिळाली. त्यांच्या जातीमुळे त्यांना शाळेत इतर विद्यार्थ्यांसह बसणं शक्य नव्हतं आणि त्यांना वर्गाच्या बाहेरच बसून अभ्यास करावा लागायचा.

या शिवाय त्यांना त्या शाळेच्या नळालाही स्पर्श करण्याची परवानगी नव्हती, पण इतर विद्यार्थ्यांना असे कुठलेही बंधन नव्हते. ते पाहिजे तेव्हा पाणी पिऊ शकत होते.

पण आंबेडकरांना शाळेत दाखला मिळवणं सोपं नव्हतं. त्यांनीच हा किस्सा सांगितला होता. 13 जून 1953 रोजी मुंबईतील रावळी कँप येथे महिला मंडळासमोर बाबासाहेबांचे 'शिक्षणाबरोबर शीलही सुधारलं पाहिजे' या विषयावर भाषण झालं. भाषणाच्या ओघात बाबांनी त्यांच्या विद्यालयीन शिक्षणाची आठवण सांगितली.

Dr. Ambedkar : फक्त सरकारचा कोप होईल म्हणून शाळेत ॲडमिशन दिलं आणि इतिहास घडला..
Inspiration : या शाळेत प्रवेशाचे वय आहे ६० ते ९० वर्षे आणि गणवेश आहे नऊवारी साडी

त्यांनी सांगितलं की, 'मला शाळेत घ्यायचे की नाही याचा खल करण्यासाठी तीन-तीन दिवस मास्तरांची सभा भरली होती. मला त्या वेळी सरकारकडून तीन रुपये स्कॉलरशिप मिळत होती. या मुलाला शाळेत घेतले नाही तर सरकारचा कोप होण्याचा संभव आहे, या सबबीवर मला सरकारी हायस्कूलमध्ये घ्यायचे ठरले. त्यावेळी मी निव्वळ गावठी पोर होतो.

पहिल्या दिवशी मी हायस्कूलमध्ये माझ्या चाळीस वर्षे वयाच्या भावाचे शर्ट घालून गेलो. पायापर्यंत घातलेला शर्ट असा त्या वेळी माझा अवतार होता.'

पुढे सगळ्या अडीअडचणीवर मात करत आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून इकोनॉमिक्समध्ये पी.एच.डी. मिळवली. ही पदवी मिळवणारे ते पहिलेच भारतीय व्यक्ती होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, पारशी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच इ. भाषा त्यांना अवगत होत्या.

डॉ. आंबेडकर यांच्या 'The Problem of the Rupee – Its origin and its solution' पुस्तकाच्या आधारावर 'रिझर्व बँक ऑफ इंडिया'ची पायाभरणी झाली. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.

14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूर येथे 5,00,000 अनुयायांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथील राहत्या घरी झोपेत असताना या महामानवाचं महापरिनिर्वाण झालं. दलितांचा कैवारी अनंतात विलीन झाला.

लेखन - हर्षदा माने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com