कोलकत्यातील इमारतींना भूकंपाचा धोका

कोलकत्यातील इमारतींना भूकंपाचा धोका

कोलकता : कोलकत्याचे मानबिंदू असलेली व्हिक्‍टोरिया मेमोरियल, इंडियन म्युझियम, बिर्ला प्लॅनेटोरियम आदी स्थळे व अन्य इमारती पत्यासारख्या एका क्षणात कोसळल्या तर... या कल्पनेनेही मनात धडधड निर्माण होते. कोलकत्यासह पश्‍चिम बंगालमधील असनसोल व सिलिगुडी आणि बिहारमधील धनबाद व पाटणामधील महत्त्वाच्या इमारतींना धोका आहे. 

आयआयटी खरगपूरमधील भूगर्भशास्त्र आणि भू-भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आणि पृथ्वी विशेषज्ज्ञ डॉ. शंकरकुमार नाथ यांनी केलेल्या संशोधनात हा निष्कर्ष काढण्यात आला. या इमारती ज्या भागात आहे, तो सर्व परिसर भूकंप्रवण क्षेत्रात असून, भूकंपकेंद्राच्या नजीक आहे, असे संशोधनात म्हटले आहे. पश्‍चिम बंगालमधील बहुतेक भूकंपांचा केंद्रबिंदू हा बंगालच्या उपसागर असून, त्याचे क्षेत्र 350 किलोमीटरपर्यंत विस्तारलेले आहे. उत्तर भारतातील भूकंपकेंद्र बंगालपासून 650 किलोमीटर अंतरावर आहे. हिमालय हा भूकंपाच्या धक्‍क्‍यांचे उगमस्थान मानले जाते. तो पश्‍चिम बंगालपासून 700 किलोमीटर अंतरावर आहे. या कोणत्याही भूकंपकेंद्रातून बसलेल्या धक्‍क्‍यांचा वर व्हिक्‍टोरिया मेमोरियल, इंडियन म्युझियम, बिर्ला प्लॅनेटोरियम या इमारती व नजीकच्या स्थळांवर परिणाम होतो, असे या अभ्यासात म्हटले आहे. 

पश्‍चिम बंगालमधील नऊ कोटी जनतेला 6.8 किंवा 9.2 रिश्‍टर स्केल भूकंपाच्या धक्‍क्‍याला सामोरे जाण्याची भीती आहे. एवढ्या तीव्र क्षमतेच्या धक्‍क्‍यामुळे राज्यातील अनेक भागांत प्रचंड हानी होण्याची शक्‍यता आहे. पैशात मोजणी केल्यास 23 हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल; पण यामुळे सर्व काही गमावले जाईल, असा निराशावादी सूर डॉ. नाथ यांनी काढलेला नाही. योग्यवेळी योग्य उपाययोजना करणे हे यावरील एकमेव उत्तर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नियोजन न करता व अवैज्ञानिक दृष्टीने बांधलेल्या इमारती, बांधकाम कोसळून सर्वाधिक वित्त व जीवित हानी होण्याची शक्‍यता असल्याने सर्व नवीन इमारती व बांधकामे "सिसमिक रिर्टोफॅट मायक्रोइमजिनिअरिंग कोड'नुसार बांधण्याचा सल्ला त्यांनी दिला. 

देशातील 66 केंद्रांवर संशोधन 

भारतातील 66 केंद्रांवर भूकंपाविषयी संशोधन सुरू असल्याचे शास्त्रज्ञ डॉ. शंकरकुमार नाथ यांनी सांगितले. या संशोधनामुळे भूकंपामुळे भविष्यात होणारी जीवित व वित्त हानी टाळणे शक्‍य होईल, अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला. भूकंपावर अभ्यास करणारे डॉ. नाथ यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com