भारताची लसीकरण मोहीम अपयशी ठरलीय? वाचा काय आहेत नेमकी कारणं

vaccination
vaccinatione sakal

नवी दिल्ली : सध्या देशात कोरोनानं (coronavirus) थैमान घातले आहे. त्यात लसीकरणही (corona vaccination drive) सुरू केले आहे. आतापर्यंत १८ कोटी २९ लाख २६ हजार ४६० लोकांचं लसीकरण झालं आहे. मात्र, भारताची लोकसंख्या (population of india) बघता अद्याप फक्त १३ टक्क्यांच्या जवळपास नागरिकांचं लसीकरण झालं आहे. यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नटक ही मोठी राज्ये आघाडीवर आहेत. या आकडेवारीवरून असं लक्षात येतं, की १० जानेवारीपासून सुरू झालेली लसीकरणाची मोहीम ही थंड बस्त्यात आहे. लसीकरण याच गतीनं सुरू राहिलं तर अजून १३६ करोड लोकसंख्येचं लसीकरण व्हायला किती वेळ लागेल? याचा विचारही आपण करू शकत नाही. पण, भारताची लसीकरण मोहीम नेमकी कुठं अपयशी ठरली, म्हणजेच अजूनपर्यंत लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरण का होऊ शकली नाही? याबाबतचा आढावा आज आपण घेऊयात. (failure behind vaccination drive in india)

vaccination
कोरोनावर 2 DG औषध लाँच; जाणून घ्या सर्वकाही

देशात लसीकरणात टॉपवर असलेल राज्ये -

  • गुजरात १, ४८, ६३, ५५१

  • कर्नाटका - १, ११, ९१, ७०९

  • महाराष्ट्र १, ९७, ३३, ३१४

  • राजस्थान - १, ५१, ०६, ५९७

  • उत्तरप्रदेश - १, ४७, ६६,९०४

  • पश्चिम बंगाल - १, २५, ६६, ५९६

नोंदणी करायला उशिर -

भारतात १० जानेवारीला लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यात सर्वात आधी फ्रंट लाईन वर्करला प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले. मात्र, देशातील लोकसंख्येचा सर्वात मोठा भाग असणाऱ्या तरुण वर्गांकडे त्यावेळी दुर्लक्ष करण्यात आलं. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली आणि सर्वाधिक फटका हा तरुण वर्गाला बसला. तरुण बाधित होत असल्यामुळे लसीकरण झालेल्या ज्येष्ठांनाही कोरोनाची लागण झाली. मात्र, इतर देशांचा विचार केल्यास त्यांनी भारताच्या आधीच लसीकरण सुरू केले होते. तसेच युरोपियन युनियनमधील देशांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेतच लशींसाठी नोंदणी करून ठेवली होती. मात्र, भारतानं याच्या अगदी उलटी पावलं उचलली. भारतानं लशींसाठी खूप उशिरा म्हणजेच जानेवारीमध्ये नोंदणी केली. मात्र, ही नोंदणी आधीच करता येऊन दुसऱ्या लाटेवर काही प्रमाणात का होईना मात करता आली असती, असे तज्ज्ञ सांगतात.

कोरोना लशींची निर्यात -

भारतानं आतापर्यंत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन अशा दोन्ही लशींचे ३५ कोटी डोस विकत घेतले. त्यापैकी फक्त १८ कोटींच्या जवळपास नागरिकांचं लसीकरण झालं. यामधील काही डोस हे वाया गेलेत. तर लसीकरण सुरू झाल्यावर कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचं जाहीर करण्यात आलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लशींची निर्यात करायला सुरुवात केली. मार्चपर्यंत देण्यात आलेल्या लसीकरणाचे अधिक डोस हे निर्यात करण्यात आलेत. त्यामुळेच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी भारतातील जनतेच्या हिस्स्याची लसी ही इतर देशांना का दिली? असा प्रश्न केंद्र सरकारला विचारला. लस ही दुसऱ्या देशाला पुरविण्यापेक्षा आधी देशातील जनतेला प्राधान्य दिले असते तर आज जास्त लोकांचे लसीकरण करून मृत्यू थांबविता आले असते, असेही तज्ज्ञ सांगतात.

vaccination
रुग्णसंख्या कमी होत असताना WHO चा भारताला इशारा

लसीनिर्मित कंपन्यांना एप्रिल महिन्यात आर्थिक मदत -

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून लस निर्मित करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक मदत द्यावी, असा सल्ला दिला होता. मात्र, त्यावरूनही राजकारण रंगलं. टीका-टीप्पणी झाली. त्यानंतर सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर्श पूनावाला यांनी कोविड लसीची क्षमता वाढविण्यासाठी सरकारला 3,000 कोटी रुपयांच्या अनुदानाची विनंती देखील केली. अखेर १९ एप्रिलला केंद्र सरकारने सिरम इन्स्टीट्युट आणि भारत बायोटेक या लसनिर्मिती करणाऱ्या दोन्ही कंपन्यांना ४५०० कोटी आर्थिक मदत जाहीर केली. त्यापैकी १५०० कोटी रुपयांचे क्रेडीट हे भारत बायोटेक या कंपनीला देण्यात आले, तर सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाला ३००० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मात्र, तोपर्यंत भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली होती. लस निर्मिती कंपन्यांना ही मदत आधी दिली असती तर जास्त लशींची निर्मिती होऊन आज भारतातील चित्र काहीसं वेगळं असतं, असंही तज्ज्ञ सांगतात.

१८-४४ वयोगटातील लसीकरणाची सोय -

केंद्र सरकारनं १ मेपासून लोकसंख्येचा सर्वाधिक भाग असलेल्या तरुणांसाठी लसीकरण जाहीर केले. त्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, ऐन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लशींचा तुटवडा भासू लागला आणि कोविन अॅपवर तरुणांना स्लॉट मिळणे कठीण झाले. अवघ्या काही सेंकदामध्ये स्लॉट संपू लागले. काहीठिकाणी लस उपलब्ध दाखवून सुद्धा बुकींग होत नव्हतं. या सर्व समस्यांचा सामना करूनही अद्याप तरुणांना योग्य त्या प्रमाणात लस मिळत नाही. लस नसल्यामुळे महाराष्ट्रात तरुणांच्या लसीकरणाची मोहिम मध्येच ठप्प करावी लागली. त्यामुळे लसीकरण असंच सुरू असेल तर इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये लसीकरण पूर्ण व्हायला किती वेळ लागले? हा देखील मोठा प्रश्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com