
The Inspiring Journey of Justice Bhushan Gavai : लहान मुले अनुकरणप्रिय असतात, त्यामुळे त्यांना बालपणापासून चांगले संस्कार देण्याची जबाबदारी माता-पित्यांची असते. त्यामुळे भूषणसह राजेंद्र व कीर्तीवर खूप लक्ष दिले. दादासाहेबांना राजकीय जीवनातून फारच कमी वेळ कुटुंबासाठी मिळत असल्याने मुलांवर संस्कार करून त्यांना घडविण्याची जबाबदारी आई म्हणून पार पाडली. भूषण अनेक काळ त्यांच्या वडिलांसोबत राहिल्याने दादासाहेबांमधील बरेचशे गुण त्याने आत्मसात केले. विशेष म्हणजे दादासाहेबांच्या गैरहजेरीत भूषण कुटुंबप्रमुख म्हणूनच जबाबदारी उचलायचा. अतिशय कमी वयात त्याने जबाबदाऱ्या घेतल्या. आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना भूषण व सर्व भावंडांचे अगदी साधे राहणीमान होते, ते आजतागायत त्यांनी कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे, मुंबईला शिकायला असताना दादासाहेब आमदार होते, तरीदेखील कुठेही आमदारपुत्राचा बडेजाव त्यांच्यात आला नाही. शिक्षण घेण्यासाठी घरापासून कॉलेजपर्यंत भूषण बसनेच प्रवास करायचा. काटकसरीने जीवन जगण्याचा आमच्या कुटुंबाचा मूलमंत्र असल्याने भूषणसह त्याच्या भावंडांनीही तो जोपासला. लहानपणापासूनच भूषणला निसर्गाची आवड होती. यासोबतच शेतीमध्ये त्याला विशेष रुची होती. म्हणूनच मुंबईत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो अमरावतीला परतला आणि माझ्यासोबत शेती पाहू लागला.