अहमदाबाद - "आधार'प्रणालीवरील वितरण व्यवस्था रद्द केली जावी, अशी मागणी करत गुजरातमधील 25 हजार रेशन दुकानदारांनी गुरुवारपासून संप पुकारला आहे. या संपामुळे खेड्यापाड्यातील गरिबांना अन्नधान्य आणि केरोसिनपासून वंचित राहावे लागत आहे. वितरणासाठीची आधारप्रणाली रद्द करण्याबरोबरच कमिशनदेखील वाढवून देण्यात यावे, अशी या दुकानदारांची मागणी आहे. गुजरात सरकारने मात्र ही मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या नेतृत्वाखालील गुजरात रेशन दुकाने मालक संघटनेने राज्यातील दुकाने अनिश्चित काळासाठी बंद करण्याची धमकी दिली आहे. सरकारने वितरणप्रणालीसाठी उपलब्ध करून दिलेल्या "अन्नपूर्णा योजने'साठीच्या सॉफ्टवेअरमध्ये नेहमीच अडचणी येत असतात. बऱ्याचदा ही प्रणाली आधार क्रमांक वाचू शकत नाही त्यामुळे गरिबांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागते, असे मोदी यांनी म्हटले आहे. विक्रेत्यांनी त्यांचा संप मागे घ्यावा असे आवाहन सरकारने केला असून, विक्रेते मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारने लेखी आश्वासन दिल्यासच आम्ही हा संप मागे घेऊ, अशी आक्रमक भूमिका दुकानदारांनी घेतली आहे.
|