
हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा : साध्वी ऋतंभरा
कानपूर- लखनौ : वाद्ग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या हिंदुत्ववादी नेत्या साध्वी ऋतंभरा यांनी हिंदू कुटुंबाने चार मुलांना जन्म द्यावा आणि त्यातील दोन मुले ही देशाला अर्पण करावीत त्यामुळे भारत हा हिंदू राष्ट्र बनेल असे म्हटले आहे. दिल्लीत जहाँगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचाराचा संदर्भ देताना त्या म्हणाल्या की, ज्यांनी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला केला त्या मंडळींचा देशाची प्रगती पाहून जळफळाट होतो आहे . राजकीय दहशतवादाच्या माध्यमातून हिंदू समाजाचे विभाजन करू पाहणारी मंडळी धुळीला मिळतील असेही त्यांनी म्हटले आहे. त्या येथे राम महोत्सवामध्ये बोलत होत्या.
ऋतंभरा म्हणाल्या की, सध्या हिंदू भगिनी या ‘हम दो, हमारे दो’ या तत्त्वाचे पालन करत असतात पण मी त्यांना विनंती करते की त्यांनी चार मुलांना जन्म द्यावा त्यातील दोन मुले ही देशाला अर्पण करण्यात यावीत आणि उर्वरित दोन मुले स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवावीत असे केले तरच भारत लवकर हिंदूराष्ट्र होईल. देशामध्ये तातडीने समान नागरी कायदा लागू करण्यात यावा तसे केले तर लोकसंख्येमध्ये असमतोल तयार होणार नाही. देशाच्या लोकसंख्येमध्ये असमतोल असेल तर राष्ट्राचे भवितव्य देखील चांगले राहणार नाही. पालकांनी त्यांच्या दोन मुलांपैकी एक मुलगा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि दुसरा विश्व हिंदू परिषदेला अर्पण करावा, असेच आपले त्यांना सांगणे आहे.’’ राम मंदिर आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या ऋतुंभरा या विश्व हिंदू परिषदेच्या ‘दुर्गा वाहिनी’च्या संस्थापिका आहेत.
Web Title: Hindus Should Give Birth To 4 Children Controversial Statement Of Sadhvi Ritambhar Kanpur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..