Hathras Stampede : नुकसान भरपाईत वाढ करा; राहुल गांधी यांची राज्यसरकारकडे मागणी

पीडित कुटुंबीयांना आपल्या सर्वांच्या सहानुभूती आणि मदतीची गरज आहे. मृतांच्या कुटुंबीयांना तसेच जखमींना देण्यात आलेली भरपाई अतिशय कमी आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhiesakal
Updated on

नवी दिल्ली - हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना तसेच जखमींना लवकरात लवकर भरपाई दिली जावी, असेही गांधी यांनी या पत्रात म्हटले आहे.

पीडित कुटुंबीयांना आपल्या सर्वांच्या सहानुभूती आणि मदतीची गरज आहे. मृतांच्या कुटुंबीयांना तसेच जखमींना देण्यात आलेली भरपाई अतिशय कमी आहे. त्यामुळे ही भरपाई वाढवली जावी तसेच जखमींवर योग्य ते उपचार केले जावेत. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी या घटनेची पारदर्शकपणे चौकशी करणे आणि दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे,’’ असेही राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मागील आठवड्यात बाबा भोले याच्या सत्संगानंतर चेंगराचेंगरी झाली होती. यात १२० लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी हाथरसचा दौरा केला होता.

‘चेंगराचेंगरीत १२० जणांचा बळी जाण्याची घटना धक्कादायक अशी आहे. अत्यंत दु:खी मनाने मी आपणास हे पत्र लिहीत आहे. माझ्याप्रमाणे तुम्हालाही या घटनेमुळे वेदना झाल्या असतील. या प्रकरणाच्या अनुषंगाने सर्व प्रकारची मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. या प्रकरणाचे गांभीर्य राज्य सरकारने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे,’ असेही राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे.

घटनेची चौकशी सुरू

हाथरस येथील चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने तीन सदस्यीय न्यायालयीन आयोगाची स्थापना केली होती. याशिवाय आग्रा विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अनुपम कुलश्रेष्ठ यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकही (एसआयटी) नेमण्यात आले आहे.

पोलिसांनी या घटनेच्या अनुषंगाने आतापर्यंत नऊ लोकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे सत्संग घेणाऱ्या भोले बाबाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. राज्य सरकारने बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.