
नवी दिल्ली : लडाख सीमेवरील दीर्घकालीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पॅंगॉंग त्सो सरोवराच्या गोगरा-हॉटस्प्रिंग भागातील गस्ती बिंदूवरून (पेट्रोलिंग पॉइंट १५) भारतीय आणि चिनी सैन्य तुकड्यांनी माघार घ्यायला सुरूवात केली आहे. उझबेकिस्तानमध्ये होत असलेल्या शांघाय सहकार्य परिषदेमध्ये राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातो. चिनी सैन्याच्या घुसखोरीमुळे मे- २०२० पासून ताबारेषेवर तणावाचे वातावरण आहे. गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर टोकाला पोहोचलेला तणाव निवळण्यासाठी परराष्ट्रमंत्र्यांच्या पातळीवर बातचीत होऊन राजनैतिक आणि लष्करी पातळीवर वाटाघाटी सुरू झाल्या आहेत.
लष्करी कमांडर पातळीवर वाटाघाटींच्या आतापर्यंत सोळा फेऱ्या झाल्या असून ताबारेषेवर मे- २०२० पूर्वीच्या ‘जैसे थे’ परिस्थितीसाठी आणि चीनने सैन्य माघारी बोलवावे यासाठी भारताने ठाम भूमिका घेतली आहे. ताबारेषेमध्ये एकतर्फी बदलाच्या चीनच्या प्रयत्नांमुळे संबंध बिघडल्याचे भारतातर्फे वारंवार सांगण्यात आले आहे. ताबारेषेवर शांततेखेरीज संबंध पूर्ववत होऊ शकत नाही, असा निर्वाणीचा इशाराही भारताकडून देण्यात आला होता. तब्बल ५० हजार सैन्य तुकड्या आणि प्रचंड प्रमाणात शस्त्रसाठा सीमेवर दोन्ही बाजूंकडून तैनात करण्यात आला आहे.
चर्चेबाबत अद्याप अनिश्चितता
भारत, रशिया, चीनसह प्रमुख देशांचा समावेश असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांची बैठक उझबेकीस्तानमध्ये होत असून या बैठकीला चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यात सहभागी होणार आहेत. मोदी - जिनपिंग व्यासपीठावर उपस्थित राहणार असले तरी द्विपक्षीय संबंधांवर त्यांची बातचीत होणार काय? याबाबत अद्याप दोन्ही देशांकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. भारत आणि चीनच्या सर्वोच्च नेतृत्वाची २०१९ मध्ये ब्रिक्स परिषदेत बातचीत झाली होती. दरम्यान, ताबारेषेवरील तणाव आणि सैन्यमाघार या मुद्द्यावर चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची मार्चमध्ये (वांग यी यांच्या भारत दौऱ्यात) तसेच जुलैमध्ये ‘जी-२०’ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान बातचीत झाली होती.
तेथे चिनी सैन्याचे ठाण
सैन्य माघारीबाबत १७ जुलैला चुशूल क्षेत्रात भारतीय हद्दीमध्ये भारत आणि चीनदरम्यान लष्करी कमांडर पातळीवर वाटाघाटी झाल्या होत्या. सहमतीच्या आधारे सीमेवर शांतता आणि सलोखा राखण्याच्या दृष्टीने गोगरा हॉटस्प्रिंग भागात ‘गस्तीबिंदू- १५’ वरील सैन्यमाघार आज परस्पर समन्वयाने आणि योजनाबद्ध रीतीने सुरू झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनाद्वारे जाहीर केले. अर्थात, भारतासाठी संवेदनशील असलेल्या देप्सांग आणि देमचोक या भागातून अद्याप चिनी सैन्याची माघार झालेली नाही.
हॉवित्झर तोफा ताबा रेषेवर तैनात
नामसाई : अरुणाचल प्रदेशमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर वजनाला हलक्या असलेल्या पण भेदक मारा करण्याची क्षमता असणाऱ्या हॉवित्झर तोफा तैनात करण्यात आल्या आहेत. याआधी याच तोफा लडाखमधील संवेदनशील भागांतही तैनात करण्यात आल्या होत्या. गलवान खोऱ्यात चीनशी झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारताने मोक्याच्या ठिकाणावरील सुरक्षा वाढविली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.