हल्ल्याची तयारी 11 दिवसांपासून; टाकलेल्या एकूण बाँबची किंमत 1.7 कोटी

bomb
bomb

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये करण्यात आलेल्या हवाई कारवाईतील बारा मिराज विमाने हरियानातील अंबाला हवाईतळावर तैनात होती. तेथून त्यांनी कारवाईसाठी उड्डाण केल्याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे गेले आठवडाभर या विमानांनी मध्य भारतात या कारवाईची रंगीत तालीम केल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे या कारवाईनंतर परराष्ट्र मंत्रालयातर्फे निवेदन करण्याचे सुमारे दोन दिवसांपूर्वी निश्‍चित करण्यात आले असल्याचे समजले. 

परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने गेल्याच आठवड्यात कारवाई निश्‍चित केली होती आणि याबाबतचे निवेदनही मंत्रालयातर्फेच देण्याचेही निश्‍चित करण्यात आले होते. हे निवेदन "काउंटर टेररिझम' विभागातर्फे तयार करण्यात आले. उरी "सर्जिकल स्ट्राईक'नंतर संरक्षण मंत्रालय व लष्करातर्फे माहिती देण्यात आली होती आणि त्यातून अनेक वाद निर्माण झाले होते. त्यामुळेच या वेळच्या कारवाईबाबतच्या निवेदनाची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयास देण्यात आली आणि त्यामध्ये राजनैतिक भाषेचा वापर करण्यात आला. यामागे भारताने आपली भूमिका स्पष्ट करताना पाकिस्तानने भारताचा अधिमान्य असा काश्‍मीरचा भाग गिळंकृत केलेला असून, त्या भागात कारवाईचा भारताला अधिमान्य अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय संसदेने हा भाग पुन्हा भारतात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव केल्याच्या बाबीकडेही निर्देश केला जातो. 

पुलवामा हल्ल्याबद्दल दहशतवाद्यांच्या विरुद्ध कारवाई न करणे सरकारला अवघड होते. त्याचे राजकीय परिणामही प्रतिकूल होणार होते. त्यामुळे उपलब्ध गोपनीय माहितीनुसार दहशतवाद्यांच्या तळांची माहिती जमा करून निश्‍चित कोठे हल्ला करायचा, हे ठरविण्यात आले. पुलवामामधील हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल धनोआ यांनी हल्ल्याचा आराखडा सरकारकडे सादर केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर प्रत्यक्ष हल्ल्यापूर्वी दोन दिवस आधीही 24 फेब्रुवारी रोजी हवाई सरावही करण्यात आला होता. मिराज विमाने प्रामुख्याने ग्वाल्हेर हवाईतळावर तैनात आहेत. सराव केल्यानंतर ती विमाने हरियानात अंबाला हवाईतळावर हलविण्यात आली. 

बालाकोट हे गाव मुझफ्फराबादपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव 2005च्या भूकंपात जवळपास पूर्णपणे नष्ट झाले होते. प्रचंड जीवितहानी झालेली होती. पाकव्याप्त काश्‍मीर आणि खैबर पख्तुनख्वा विभागातील मनसेहरा जिल्ह्यात हे गाव समाविष्ट होते. नियंत्रण रेषेपासून काही मैलावरच हे गाव आहे आणि तेथे लोकवस्ती अत्यंत विरळ आहे. त्यामुळे या हल्ल्यामध्ये नागरिकांची जीवितहानी झाल्याची शक्‍यता जवळपास नसल्याचे सांगण्यात येते. 

या हल्ल्यात दहशतवाद्यांची हानीबाबत अद्याप निश्‍चित माहिती सरकारतर्फे देण्यात आलेली नाही. सुमारे दोनशे ते तीनशे दहशतवादी मृत्युमुखी पडले असावेत ,असा अंदाज वर्तविला जात आहे. 

अशी झाली तयारी व हल्ले 
15 फेब्रुवारी 2019 ः पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी हवाई हल्ल्याचा प्रस्ताव सरकारपुढे मांडला. 
22 फेब्रुवारीपर्यंत ः हेरॉन ड्रोनच्या साह्याने नियंत्रण रेषेवर टेहाळणी, हल्ल्याच्या संभाव्य ठिकाणांची निश्‍चिती 
22 फेब्रुवारी ः हवाईदलाच्या 1 स्क्वाड्रन "टायगर्स' आणि 7 स्क्वाड्रन "बॅटल ऍक्‍सिस'ला सज्ज राहण्याचे आदेश. मोहिमेसाठी दोन मिराज स्क्वाड्रनमधील 12 विमाने निवडण्यात आली. 
24 फेब्रुवारी : पंजाबच्या भटिंडा येथून वॉर्निंग जेट आणि उत्तर प्रदेशच्या आग्रा येथून विमानात हवेत इंधन भरण्याचा सराव करण्यात आला. 
26 फेब्रुवारी ः लेझर गायडेड बॉम्बद्वारे बालोकोट, मुजफ्फराबाद आणि चकोटी येथे पहाटे 3.20 ते 4 दरम्यान हल्ले. 

- एकूण कारवाईसाठी 6 हजार 300 कोटी रुपये पणास 
- पाकवर टाकलेल्या एकूण बॉंबची किंमत 1.7 कोटी रुपये 
- पाकिस्तानात प्रवेश केलेल्या विमानांची एकंदरीत किंमत 2 हजार 568 कोटी रुपये 
- पाकिस्तानच्या हवाई हद्दीवर नियंत्रण ठेवलेल्या विमानांची किंमत 1 हजार 750 कोटी रुपये 
- हवेत इंधन भरण्यासाठीचा टॅंकर 22 कोटींचा, त्याचबरोबर अतिसक्षम ड्रोन यंत्रणा 80 कोटींची 
- याशिवाय प्रत्येकी 358 कोटी किंमत असलेली तीन "सुखोई' विमान कोणत्याहीवेळी हल्ल्यास तयार. त्याचबरोबर प्रत्येकी 154 कोटी रुपये किंमत असलेली पाच "मिग-29' विमानेही सज्ज 
- नियंत्रित बॉंब यंत्रणा (प्रत्येकी 225 किलो क्षमतेची) अंदाजे 14 लाख रुपये. असे चार ते पाच बॉंब तीन ठिकाणी टाकण्यात आले 

कारवाईचा घटनाक्रम 
हरियानातील अंबाला येथील 
हवाईतळावरून विमाने झेपावली 
...... 
सर्व विमाने "लेसर गायडेड बॉम्ब'ने सुसज्ज 
....... 
या विमानांमध्ये "इस्रायली लायटिंग टारगेटिंग पॉड्‌स'ही 
...... 
हवाई दलाचे एक विमान 
भटिंडा तळावरून झेपावले 
..... 
"मिड एअर रिफ्युलिंग टॅंकर' 
म्हणून ओळखले जाणारे 
विमान आग्रा येथून झेपावले 
....... 
विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी 
"हेरोन' हे लेझर गायडेड ड्रोनही सोबत 
........ 
वैमानिकांनी लक्ष्यांची अंतिम चाचपणी केली 
...... 
विमानांना पुढे जाण्यासाठी हिरवा कंदील 
....... 
मिराज विमानांनी लक्ष्याच्या 
दिशेने स्फोटके डागली 

भारतीय हवाई दलात पाकला जास्त रस
भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवासीयांनी त्यांच्या हवाई दलास जास्त गुगल केले. गुगल ट्रेंडस्‌वरून तरी हेच दिसत आहे. दिवसभरातील पहिल्या पाच ट्रेंडमध्ये बालाकोट आघाडीवर आहे, तर त्यापाठोपाठ एलओसी, इंडियन एअरफोर्स, पाकिस्तान एअरफोर्स आणि सर्जिकल स्ट्राइक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com