नवी दिल्ली : भारतीय महिला आपल्या पतीबाबत अत्यंत संवेदनशील आणि मालकी हक्क दाखवणाऱ्या असतात. त्यामुळे आपला पतीला इतर महिलांसोबत शेअर करणे हे त्या सहन करू शकत नाहीत, असं निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) नोंदवलं. न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील ट्रायल कोर्टाचा निर्णय कायम ठेवत याचिकाकर्ता (पती) सुशील कुमार आणि इतर सहा जणांची याचिका फेटाळून लावली.
पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तसेच पतीने आधीच दुसऱ्या महिलेशी लग्न केले होते. या लग्नातून त्याला दोन मुले देखील आहेत. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता तिच्यासोबत लग्न केले होते. त्यानंतर छळ करण्यात आला, असं सुसाईड नोटमध्ये तिने लिहिले होते. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी वाराणसी जिल्ह्यातील मदुआडीह पोलिस ठाण्यात आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पती सुशील कुमारला अटक करण्यात आली होती. त्याने जामिनासाठी अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण, न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली होती.
सत्र न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. पतीने 2018 मध्ये तिसरे लग्न केले. पत्नीच्या आत्महत्येमागे हे प्रमुख कारण असल्याचे समजते. आरोपींवर खटला चालवण्यासाठी पुरेशी माहिती असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच भारतीय महिला आपल्या पतींबाबत अतिशय संवेदनशील असतात. आपल्या पतीने दुसऱ्या महिलेशी लग्न केले आहे किंवा आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहे, हे कोणत्याही महिलेसाठी धक्कादायक असेल, असंही न्यायालयानं यावेळी म्हटलं आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.