Derek O'brien Interview : एकनाथ शिंदे व अजित पवारांचा लवकरच राजकीय अस्त ; तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांचे धक्कादायक भाकीत

राज्यसभेत आक्रमकपणे मोदी सरकारवर हल्लाबोल डेरेक ओब्रायन यांनी अनेकदा केला आहे. तृणमूल काँग्रेसचे ‘फायरब्रँड’ नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याशी येथील तृणमूल भवनात साधलेला संवाद ...
Derek O'brien Interview
Derek O'brien Interview sakal

कोलकता : ‘‘ज्या पक्षाने व नेत्यांनी मोठे केले, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकविणार असून २०२५ मध्ये या दोन्ही नेत्यांचा राजकीय अस्त झालेला पाहायला मिळेल,’’ असे धक्कादायक भाकीत तृणमूल काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ता व राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केले.

राज्यसभेत आक्रमकपणे मोदी सरकारवर हल्लाबोल डेरेक ओब्रायन यांनी अनेकदा केला आहे. तृणमूल काँग्रेसचे ‘फायरब्रँड’ नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याशी येथील तृणमूल भवनात साधलेला संवाद ...

प्रश्न :मतदानाचे तीन टप्पे संपले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येतील, असे वाटते.

डेरेक ओब्रायन : पहिल्यांदा जानेवारी महिन्यात भाजपने ‘मोदी की गॅरंटी’ म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर मार्च महिन्यात त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यावेळीही ते म्हणाले ‘मोदी की गॅरंटी’. आता मतदानाचे तीन टप्पे संपल्यानंतर भाजपचे नेते आता ही ‘गॅरंटी’ विसरले. आता भाषणांमध्ये ‘मोदी की गॅरंटी’ नाही व ‘अब की बार ४०० पार’ ही घोषणाही गायब झाली आहे. त्यामुळे या तीन टप्प्यात त्यांची स्थिती किती दयनीय झाली आहे, याची कल्पना येईल.

भाजपने लोकसभेच्या राज्यातील ३५ जागा जिंकण्याचा दावा केला आहे.

- पश्चिम बंगालच्या २०२१ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपला २०० जागा मिळतील, असा दावा केला होता. प्रत्यक्षात ७० जागा मिळाल्या. अमित शहांनी दावा केलेल्या जागांपैकी केवळ एक तृतीयांश जागा भाजपला मिळाल्या होता. या निवडणुकीत ३५ म्हणत आहेत. आता ३५ चे एकतृतीयांश किती होतात, याची आकडेमोड तुम्ही करून घ्या.

‘संदेशखाली’च्या मुद्द्यामुळे तुमच्या पक्षाला फटका बसेल असे वाटते का?

- संदेशखालीच्या मुद्यावरून भाजप रंगेहाथ पकडली गेली आहे. तुम्ही स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ पहा. सर्व काही अगदी सुस्पष्ट झाले आहे. ही सर्व घटना विरोधी पक्षनेते व भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वात घडवून आणलेली आहे. हा केवळ महिलांचा अपमान नाही तर पश्चिम बंगालच्या लोकांचाही अपमान आहे. याचा फटका भाजपला बशिरहाटच्या मतदानातून दिसून येईल. मतदारच त्यांना धडा शिकवतील. ही जागा आम्ही दोन लाखांच्या मताधिक्यांनी जिंकू.

भाजप या निवडणुकीत हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयत्न करीत आहे, हे वाटते का?

- बंगाल हे वेगळे राज्य आहे. येथे ध्रुवीकरण होऊ शकत नाही. विधानसभेच्या २९४ पैकी २२० जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या होत्या. बंगालच्या लोकांनी घाणेरडे राजकारण कधीच सहन केले नाही. त्यांनी नेहमीच दुही पसरविणाऱ्यांना नाकारले आहे.

म्हणजे भाजपला खऱ्या मुद्यांवर चर्चा नको आहे का?

- बिलकूल. त्यांना जनतेच्या प्रश्नांवर चर्चाच नको आहे. २०१४ ते २०२० या काळात धर्म, जात, जन्मस्थान, भाषा यावर झालेल्या दोन गटांच्या संघर्षांच्या घटनांमध्ये देशात ५०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भाजपचे नेते तर नारी शक्तीच्या गोष्टी करतात...

- ते महिलांच्या अधिकारांच्या गोष्टी करतात? कठीण आहे. हाथरस, उन्नाव, कथुआ, बिलकिस बानो, ब्रिजभूषण शरण सिंग, प्रज्वल रेवण्णा हे काय आहे? महिलांवर २०२२ मध्ये झालेल्या अन्यायाच्या गुन्ह्यांची संख्या देशात साडेचार लाख आहे. म्हणजे प्रत्येक तासाला ५१ गुन्हे नोंदले गेले आहेत.

पंतप्रधान मोदी आरोप करतात की, केंद्राच्या अनेक योजना पश्चिम बंगालमध्ये लागू झालेल्या नाहीत.

- केंद्र सरकारच्या अनेक योजनांपेक्षा चांगल्या योजना आधीपासूनच पश्चिम बंगालमध्ये सुरू आहेत. तुम्ही आयुष्मान योजनेची गोष्ट करीत असाल. ही योजना लागू होण्यापूर्वी दोन वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये ‘स्वास्थ साथी’ योजना सुरू आहे. या योजनेतून आम्ही अडीच कोटींपेक्षा अधिक लोकांना फायदा दिला आहे. उलट ‘मनरेगा’ व ‘आवास’ योजनेसाठी एका पैशाचा निधी केंद्राने पश्चिम बंगालला दिला नाही. आपण संघराज्य संरचना स्वीकारली आहे. त्यांना एक राष्ट्र, एक राज्य, एक निवडणूक, एक भोजन हवे आहे. या विचारधारेच्या विरोधात आम्ही लढतो. भारताची विविधता जपण्यासाठी आम्ही लढत आहोत.

महाराष्ट्रातील राजकीय घटनांकडे कसे पाहता?

- उद्धव ठाकरे व शरद पवार हे दोन्ही नेते भाजपला जबर धक्का देणार आहेत. मी पुन्हा एक महत्त्वपूर्ण भाकीत करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे २०२५ पूर्वी संपूर्णपणे संपलेले नेते असतील. या दोन्ही नेत्यांचा राजकीय अस्त होईल.

म्हणजे हे दोन्ही नेते भाजपमध्ये सामील होतील, असे म्हणायचे आहे का?

- थांबा आणि पहा. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये घुसलेल्या या नेत्यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकविणार आहे. मी महाराष्ट्रावर प्रेम करणारा माणूस आहे. अनेक वर्षे मी महाराष्ट्रात काम केले आहे. ती माझी कर्मभूमी राहिली आहे. परंतु मला या गद्दारांबद्दल आदर नाही. ईडी व सीबीआयपासून वाचण्यासाठी ज्या पक्षाने व नेत्यांनी त्यांना मोठे केले. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. गद्दार ते गद्दारच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com