नवी दिल्लीः पाकिस्तान पुन्हा असा बालिशपणा करेल असे वाटत नाही. पुढच्यावेळी चुकीला माफी नाही, काही करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तानचे नाक ठेचू, असे खडे बोल लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तानला सुनावले आहेत.
26 जुलै 1999 हा दिवस सर्व भारतीयांच्या हृदयावर अभिमानाने कोरला गेलेला दिवस आहे. कारण याच दिवशी भारतीय सैन्याने कारगिलमध्ये घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याला चारीमुंड्या चीत करीत युद्ध जिंकले होते. सुमारे अडीच महिने चाललेल्या या 'ऑपरेशन विजय'मध्ये देशाने 527 पेक्षा अधिक वीर योद्धे गमावले. 1300 पेक्षा जास्त जवान जखमी झाले. देशभरात आज कारगील विजय दिवस साजरा केला जात असून, हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली जात आहे. लष्कर, हवाई आणि नौदलाच्या प्रमुखांनी आदरांजली वाहिली.
जनरल रावत म्हणाले, "1999 मध्ये पाकिस्तानी सैन्याने मोठी चूक केली होती. त्याला भारतीय सरकार आणि सैन्याने जे उत्तर दिले होते, ते अजूनही पाकचे सैन्य विसरलेले नाही. पाकिस्तान 1999 मधील चूक पुन्हा करणार असेल, तर त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल. मला खात्री आहे की, पाकिस्तान असे पुन्हा करणार नाही. असे झालेच तर आमचे जवान कधीही त्यांचा हेतू यशस्वी होऊ देणार नाहीत. आपल्याकडे आता आधुनिक साधने उपलब्ध असून, घुसखोरी करणाऱ्यांची माहिती मिळवू शकतो.'
'मी देशवासियांना सांगू इच्छितो की त्यांनी अजिबात चिंता करु नये. सुरक्षा दलांना दिलेली जबाबदारी कितीही कठीण असली तर ती पूर्ण केली जाईल. आमचे जवान सीमारेषेची सुरक्षा करत आहेत, असेही रावत म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.