Arvind Kejriwal : आता आरोग्य व्यवस्थेवरुन बिघडलं! दिल्ली सरकारने श्वेतपत्रिका आणण्याचा नायब राज्यपालांचा सल्ला

Arvind Kejriwal
Arvind KejriwalGoogle file photo

नवी दिल्ली : दिल्लीतील आरोग्य व्यवस्थेवरून नायब राज्यपाल आणि आप सरकारमध्ये जुंपली आहे. नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दिल्लीतील आरोग्य व्यवस्थेवर चिंता व्यक्त करताना रुग्णसेवेची व्यवस्था व्हेंटिलेटरवर गेल्याचा ठपका ठेवताना यावर श्वेतपत्रिका आणावी, असे दिल्ली सरकारला सुचविले आहे. तर दिल्लीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांनी मुख्य सचिवांच्या दुर्लक्षामुळे सरकारी रुग्णालयांची व्यवस्था बिघडल्याचा उलटवार केला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात आहेत. तसेच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपालांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राष्ट्रपती राजवटीच्या अटकळबाजीनेही जोर धरला आहे. दोन दिवसांपूर्वी नायब राज्यपालांनी दिल्ली सरकारची तक्रार करणारे पत्र गृहमंत्रालयाला पाठविले होते.

दिल्ली सरकार नायब राज्यपाल पदाचा अपमान करत असून राज्य सरकारमुळे न्यायालयीन खटले वाढल्याचे त्यात म्हटले होते. तर दिल्ली सरकारने त्यावर प्रत्युत्तर देताना मंत्र्यांचे आदेश सरकारी अधिकारी ऐकत नसल्याचे म्हटले होते. यात आता आरोग्य व्यवस्थेवरून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकारमधील शाब्दिक युद्धाची त्यात भर पडली आहे.

Arvind Kejriwal
Eknath Khadse : ''होय, मी माझ्या घरी जातोय...'', भाजपमध्ये निघालेले एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?

आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दिल्लीच्या डॉ. हेडगेवार आरोग्य संस्थान आणि चाचा नेहरू बालचिकित्सालय या रुग्णालयांमध्ये औषधोपचाराच्या सामग्रीची टंचाईबद्दल चौकशीची मागणी नायब राज्यपालांकडे केली होती. त्यावर नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून संबंधित रुग्णालयांच्या दयनीय अवस्थेकडे वेधताना दिल्लीतील बहुचर्चित आरोग्य सेवेचे मॉडेल कोलमडल्याचे आणि आरोग्य सेवा जणू व्हेंटिलेटरवर गेली असल्याचे शरसंधान केले.

त्यावर सौरभ भारद्वाज यांनी पुन्हा एकदा नायब राज्यपालांना प्रत्युत्तर देताना सरकारी रुग्णालयांमधील आरोग्य सेवा बिघडण्यासाठी दिल्लीच्या मुख्य सचिवांना आणि आरोग्य सचिवांना जबाबदार धरले. या दोन्हीही सनदी अधिकाऱ्यांवर नायब राज्यपालांचे नियंत्रण आहे. त्यापार्श्वभूमीवर सौरभ भारद्वाज यांनी नायब राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात म्हटले की या दोन्ही अधिकाऱ्यांनी पुरेसा औषधसाठा आणि पूरक सामग्री रुग्णालयात पुरेशी उपलब्ध असल्याची चुकीची माहिती का दिली अशी विचारणा केली. दिल्लीत आरोग्य सेवांचा गोंधळ व्हावा अशी त्यांची इच्छा होती काय, या अधिकाऱ्यांच्या चौकशी करण्याबाबत नायब राज्यपाल एक शब्दही का बोलत नाहीत, अशी सवालांची फैरही सौरभ भारद्वाज यांनी झाडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com