Narendra Modi : भाजपने ३७० जागा जिंकणे हीच श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी आदरांजली

२०१९ पेक्षा चांगली कामगिरी आपल्याला यावेळी करायची आहे. भाजपने किमान ३७० जागा जिंकणे गरजेचे आहे.’
Narendra Modi
Narendra Modiesakal

नवी दिल्ली - ‘आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने ३७० जागा जिंकणे हीच श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी आदरांजली ठरेल,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. या बैठकीनंतर मोदी यांनी राष्ट्रीय अधिवेशनात सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर अधिवेशनात चर्चा करण्यात आली.

पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले, ‘लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी त्यांच्या बूथवर लक्ष केंद्रित करावे. २०१९ पेक्षा चांगली कामगिरी आपल्याला यावेळी करायची आहे. भाजपने किमान ३७० जागा जिंकणे गरजेचे आहे.’

विकास आणि गोरगरिबांसाठी ‘रालोआ’ सरकारने केलेल्या कामांची माहिती प्रचारादरम्यान दिली जावी, असेही ते म्हणाले. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील मोदी यांच्या भाषणाचा सारांश सरचिटणीस विनोद तावडे यांनी नंतर पत्रकारांना सांगितला. लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांकडून अनावश्यक तसेच भावनात्मक मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात.

मात्र भाजप कार्यकर्त्यांनी विकास, गरिबांच्या उत्थानासाठी केली जात असलेली कामे आणि जागतिक पातळीवर उंचावलेली देशाची प्रतिमा या मुद्द्यांवर भर द्यावा, असे निर्देश मोदी यांनी दिल्याचे तावडे म्हणाले. सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विकासकामांची माहिती देण्यासाठी २५ फेब्रुवारीपासून व्यापक संपर्क कार्यक्रम राबविला जाणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० संपुष्टात यावे, यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मोठा संघर्ष केला होता. हा संघर्ष करतानाच त्यांना बलिदान द्यावे लागले होते. मोदी सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० संपुष्टात आणले होते.

राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात

‘भारत मंडपम्’मध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनास भाजपचे देशभरातील ११ हजार ५०० प्रतिनिधी हजर आहेत. त्यात भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिवेशनात सामील झालेले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर नेत्यांनी अधिवेशनात सहभाग घेतला आहे. रविवारपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाचा समारोप पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.

गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून असो वा पंतप्रधान म्हणून असो, मागील २३ वर्षांपासून मी सरकारचा प्रमुख म्हणून काम करीत आहे. या दीर्घ काळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. केवळ विकासाचे राजकारण केले.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com