Tiger Project : साब.. यहाँ सिर्फ बाघ की किमत है

‘साब यहाँ सिर्फ बाघ की किमत है, आदमी की नही.. रणथंबोर नॅशनल पार्क की वजह से यहाँ कोई बडा प्रोजेक्ट नहीं आता,
ranthambore Tiger Project
ranthambore Tiger Projectsakal

सवाई माधोपूर - ‘साब यहाँ सिर्फ बाघ की किमत है, आदमी की नही.. रणथंबोर नॅशनल पार्क की वजह से यहाँ कोई बडा प्रोजेक्ट नहीं आता, इसलिए हमारे लडकों को काम के लिए बाहर जाना पडता है, ऐसा समझो ना बाघ इस इलाके की खुबसुरती है और अभिशाप भी...’ पन्नाशी ओलांडलेले रत्नेश्वर गौतम ऑटो चालवीत हताशपणे माधोपूरची व्यथा सांगत होते.

खरंतर रणथंबोरचे व्याघ्र सौंदर्य पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे पर्यटक येतात पण याच नॅशनल पार्कनं इथं थेट दोन वर्ग निर्माण केले आहेत. एकाच्या दारी सुबत्ता तर दुसरा रोजगारासाठी तळमळतोय. जुन्या माधोपूरवासीयांना वाटतं आमच्या हक्काचं शहराच्या नव्या भागात गेलंय तर नव्यांना वाटतं जुन्या भागातील लोकच श्रीमंत आहेत, प्रत्यक्षात रस्त्यांवर फिरताना वेगळीच परिस्थिती अनुभवायला मिळते.

शेवटी सगळ्या चर्चेतून एकच सूर निघतो तो म्हणजे हाताला काम पाहिजे असेल तर, मोठा प्रकल्प आल्याशिवाय अन् गुंतवणूक झाल्याशिवाय पर्याय नाही.

नॅशनल पार्कमुळं माधोपूरला ग्लॅमर आलं खरं पण विकास मात्र थांबला. लोक रेल्वे स्टेशनला उतरतात, शहराच्या नव्या भागातून खरेदी करतात आणि थेट नॅशनल पार्क पाहायला निघून जातात, अशी तक्रार स्थानिकांकडून ऐकायला मिळाली. पूर्वी जेव्हा या भागामध्ये सिमेंट प्रकल्प होता तेव्हा लोकांच्या हाताला काम मिळायचे. तसेच वाहतूक व्यवसाय देखील तेजीत होता. पण, हा प्रकल्प बंद पडल्याने सगळे काही ठप्प झाले.

शहराचा महत्त्वाचा भाग असलेल्या रणथंबोर रोडवर हॉटेल, रेस्टॉरंट उभी राहिली खरी पण तीही बाहेरच्या लोकांची असल्याची तक्रार अनेकांनी केली. या हॉटेलांत स्वयंपाक करणारे देखील हिमाचल प्रदेशातील आहेत, आमचे तरुण मात्र रोजगारासाठी बाहेर गेल्याचा सूर अनेकांकडून ऐकायला मिळाला.

म्हणून स्थलांतर

तेल रिफायनरी, बिअर प्लांट, खतांच्या निर्मितीचा प्रकल्प येथे उभा राहणार होते. पण भूसंपादनात अडथळे आल्याने ते सगळे प्रकल्प अन्य भागांत गेले. शिवाय पारंपरिक हस्तकला आणि उद्योगांना पुरेसे पाठबळ मिळाले नाही. परिणामी तरुणांना गाव सोडावे लागले.

मुस्लिमांना करायचाय जुना व्यवसाय

स्थानिक मुस्लिम समुदाय आतापर्यंत तरी काँग्रेसचा पाठीराखा राहिल्याचे दिसून येते. यातही अन्सारी पॉवरफुल, ते पूर्वी कापड व्यवसाय करत असत पण नवी यंत्रे आल्याने ते अडचणीत आले. अनेक मंडळी अन्य उद्योगांकडे वळली. पण संधी मिळाली तर पूर्वीचा उद्योग करायला आवडेल, असे दानिश अन्सारीने सांगितले.

धार्मिक ध्रुवीकरणाला नकार

कन्हय्यालाल प्रकरणामुळं राजस्थानात ध्रुवीकरणाचे वातावरण निर्माण झाले होते. अगदी पंतप्रधान मोदींनीही त्याचा जाहीर सभेत उल्लेख केला होता. माधोपूरमध्ये याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. ‘एनआरसी’ला थेट विरोध करणारा येथील मुस्लिम समुदाय धार्मिक कट्टरतेला नाकारतानाच शिक्षणाला प्राधान्य देताना दिसतो आहे. मदरशांप्रमाणेच आधुनिक शिक्षणही त्यांना महत्त्वाचे वाटते.

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि यंत्रणेकडे तक्रारी केल्या आहेत. पण, शहराच्या जुन्या भागाच्या समस्या कोणीच लक्षात घेत नाही. अगदी प्राथमिक उपचारासाठीही आम्हाला तीन ते चार किलोमीटरपर्यंत शहरात जावे लागते. रात्री अपरात्री वाहने मिळत नाहीत.

- रमेश मिश्रा, स्थानिक व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com