आज दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

राज्यातील 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे.
Breaking News
Breaking News Sakal

लोणावळा येथे सोसाट्याचा वारा अन अवकाळी पाऊस; नागरिकांची तारांबळ

 लोणावळा : लोणावळा परिसरास गुरुवारी (ता.१६) सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे लोणावळाकरांसह व्यावसायिकांची तारांबळ उडाली.   

लोणावळ्यासह खंडाळा, कुसगाव बु., कार्ला परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तासभर हा पाऊस सुरू होता. लोणावळा परिसरात उकाडा जाणवत होता, गुरुवारी झालेल्या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारठा जाणवू लागला आहे.

पुण्यातील विविध भागात आज पुन्हा पावसाची हजेरी!

भारती विद्यापीठ, कात्रज, कोंढवा रस्ता, सुखसागरनगर, कोंढवा भागात ढग जमा झाले असून, वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे.

पुणे शहरातील खडकवासला, शिवणे-उत्तमनगर परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला आहे. मुंडवा केशवनगर परिसरात मध्ये काळे कुट्ट ढग जमा झाले आहेत. तर बाणेर बालेवाडी परिसरात काळे कुट्ट ढग जमा झाले असून, रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. औंध, सकाळ नगर येथे ढगांची गर्दी झाली असून हलका पाऊस सुरू झाला आहे.

रामटेकडी वैदूवाडी परिसरात पाऊस सुरु झाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आकाशात काळे ढग जमा झाले आहे. परिसरात रात्री पासून वीज नसल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे.

वीज रात्री ३ वाजल्यापासून बंद असून १४ तास उलटून गेले तरी वीज न आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. केबल टाकण्याचे काम चालू असून वीज सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे असे महावितरण कर्मचाऱ्यांनी संगीतले आहे.

दापोली साई रिसॉर्ट प्रकरण : सदानंद कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांची ईडी कोठडी आज संपली. यानंततर ईडीने वाढवून मागितलेला कोठडीची मागणी न्यायालयाने फेटळून लावली. यानंतर सदानंद कदम नी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात अटकेत असणारे जयराम देशपांडे व कदम यांची समोरासोर चौकशी करण्यासाठी ईडीने सदानंद कदम यांची ईडी कोठडी वाढवून मागीतली मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली व त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर पूर्ण; न्यायालयाने राखून ठेवला निकाल

मागील ९ महिन्यांपासून सुरू असलेली सत्तासंघर्षाची सुनावणी आज पूर्ण झाली आहे. आता येत्या काही दिवसांत या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊ शकतो. या सुनावणीचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे, त्यामुळे आता बऱ्याच दिवसांपासून राज्याचे लक्ष लागलेल्या या प्रकरणाचा निकाल काय लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या च्या घटनापीठाने शिवसेना पक्षातील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांमधील मतभेदामुळे उद्भवलेल्या घटनात्मक मुद्द्यांवरच्या याचिकांवरील निर्णय राखून ठेवला आहे .

ससून रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने परिचारक नियुक्तीस सुरुवात

पुण्यातील ससून रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने नर्सेस (परिचारक) नियुक्त करायला सुरुवात झाली आहे.

सरकारी अधिकारी, कर्मचारी जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी संपावर आहेत. याचा फटका पुण्यातील ससून रुग्णालयातील रुग्णांना होऊ नये यासाठी १ महिन्याच्या कालावधीसाठी नर्सेसच्या भरतीला सुरुवात.

ससून रुग्णालय तर्फे १०० नर्सेस तसेच वर्ग ४ श्रेणीचे कर्मचारी भरतीसाठी काल जाहिरात दिली होती.

या पार्श्वभूमीवर आज ससून रुग्णालयात ३५ नर्सेस रुजू झाल्या आहेत.

संपावर गेलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी परत कामावर यावे यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

तसेच रुग्णांना सेवेचा आभाव कुठे ही जाणवू नये यासाठी मेडिकल कॉलेज, इतर वैद्यकीय संस्थांनी ससून रुग्णालयात भरती प्रक्रियेत यावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

म्हणून शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं; सिब्बल यांचा मोठा दावा

सरकार कोसळलं तेव्हा अधिवेशन होऊ घातलं होतं. त्यात अर्थसंकल्पीय विधेयकांवर मतदान होणार होतं. त्याच्या विरोधात मतदान करायला हवं होतं. सरकार पडलं असतं. पण यांना सरकार पाडायचं होतं. मुख्यमंत्री बनायचं होतं. त्याचवेळी स्वत:ची आमदारकी घालवायची नव्हती.

निवडणूक आयोग किंवा कोणत्याही घटनात्मक आधाराशिवाय विधिमंडळ गटातला एक गट असा दावा करत होता की तेच शिवसेना राजकीय पक्ष आहेत. हा कसला राजकीय पक्ष असा सवाल उपस्थित केला.

आधी शिंदे गट म्हणाले की ते बाहेर पडले आहेत. नंतर ते म्हणाले की आम्ही मूळ राजकीय पक्ष आहोत. आता ते म्हणतात आम्ही पक्षातच आहोत. त्यामुळे शिंदे गटाकडून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या गेल्या.

हे सगळं प्रकरण निवडणूक आयोगाकडे जाण्याआधी म्हणजे १९ जुलैपूर्वी घडलं. त्यामुळे हे सगळंच घटनाविरोधी आहे. कारण राज्यपालंनी निवडणूक आयोगाच्या मान्यतेआधीच एका विधिमंडळ गटाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली.

विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणजे राजकीय पक्षानं, सदस्यांनी त्यांचा नेता म्हणून निवडलेला असतो. राजकीय पक्षानं त्यासंदर्भातले अधिकार दिलेले असतात. त्यामुळे राजकीय पक्षच गटनेता आणि प्रतोद यांची नियुक्ती करत असतो.

कनाथ शिंदेंनी विश्वासघात केल्याचं बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं.

व्हीप फक्त सभागृहातच बजावला जाऊ शकतो. सभागृहाबाहेर व्हीप काम करू शकत नाही. मग ते आसाममध्ये काय करत होते? तुम्ही आसाममध्ये भाजपाच्या मांडीवर बसला आहात आणि तुम्ही एका अशा प्रतोदला पदावरून दूर करत आहात जो राजकीय पक्षानं नियुक्त केला होता.

दहावं परिशिष्ट अस्तित्वातच नसतं, तर...सिब्बलांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा

राज्यपालांच्या भूमिकेवर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. राज्यपालांनी घटनात्मक मुद्द्यांवर निर्णय घ्यायला हवा. राज्यपालांनी सांगितलं की ३४ आमदार माझ्याकडे आले आणि मी त्यावर निर्णय घेतला. ही प्रक्रिया म्हणून बरोबर आहे. पण राज्यपाल फक्त पक्ष किंवा आघाड्यांशी चर्चा करू शकतात, वैयक्तिक कुणाशीही नाही. नाहीतर त्यावर गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल.

फक्त ८ मंत्री त्या ३४ आमदारांमध्ये होते. मग ते कसं म्हणू शकतात की त्यांना सरकारमधून बाहेर पडायचं होतं? इतर मंत्री त्यांच्याबरोबर नव्हते.

कोणत्या घटनात्मक आधारावर राज्यपाल एखाद्या विधिमंडळ गटाच्या एका गटाच्या दाव्यावर बहुमत चाचणीचे आदेश देऊ शकतात? असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला.

राज्यपाल विधिमंडळाचे घटक आहेत. पण त्यांनी विधिमंडळ पक्षातल्या एका गटाला मान्यता देण्यासाठी घटनेच्या चौकटीबाहेर जाऊन काम केलं. राज्यपाल संख्या बघून असं म्हणू शकत नाहीत का की बाहेर आलेल्या गटाच्या कृतीचा परिणाम सभागृहातील बहुमतावर परिणाम होतोय की नाही? दहावं परिशिष्ट अस्तित्वातच नसतं, तर राज्यपाल असं करू शकले असते. असा सवालही उपस्थित केला.

अपात्रतेची कारवाई कोणत्याही परिस्थितीत थांबवू शकत नाही, कपिल सिब्बलांचा युक्तिवाद

अविश्वास प्रस्ताव आल्यानंतरही अपात्रतेची कारवाई होतेच. अविश्वास प्रस्ताव आणि अपात्रतेची कारवाई या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राज्यपालांनी चुकीच्या पद्धतीनं बहुमत चाचणी बोलावली. शिंदे गटानं त्यांचाच व्हीप पाळला, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर केला.

संप बेकायदेशीर, जुन्या पेन्शनचा मुद्दा हायकोर्टात

राज्यभरात सुरु असलेल्या जुन्या पेन्शनच्या संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीये. संप करणाऱ्यांच्या मागण्या रास्त असू शकतात. मात्र, हा संप बेदायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते हे तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करणार आहेत.

अखेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शेतकरी मोर्चाच्या शिष्टमंडळाला भेटणार

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान माकपकडून काढण्यात आलेला मोर्चा मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान सरकारकडून या मोर्चाला कोणता प्रतिसाद देण्यात आला नव्हता. पण, सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे या आंदोलनातील प्रतिनिधींना आज मंत्रालयात भेटण्याची शक्यता आहे.

राजन साळवी यांच्या कुटुंबालाही एसीबीची नोटीस

ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढणार आहेत. त्यांच्या कुटुंबालाही एसीबीची नोटीस बजावण्यात आली आहे. राजन साळवी यांचा मोठा भाऊ, पत्नी आणि वहिनीला एसीबीनं नोटीस बजावली आहे. 20 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत.

लोकसभेसाठी ठाकरे गट 21, राष्ट्रवादी 19 तर काँग्रेस 9 जागा लढवणार

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. एकूण  48 जागांपैकी ठाकरे गट 21, राष्ट्रवादी 19 आणि काँग्रेस 8 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी चार जागा ठाकरे गट लढवेल तर प्रत्येकी एक जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडं असणार आहे.  

पुण्यात दहावीचा पेपर सुरक्षारक्षिकेच्या मोबाईलमध्ये आढळल्यानं खळबळ

पुण्यात दहावीच्या गणित भाग एकचा पेपर सुरक्षारक्षिकेच्या मोबाईलमध्ये आढळल्यानं खळबळ उडाली आहे. दहावीच्या परीक्षा केंद्रावर परवानगी नसतानाही हॉलमधील फोटो काढल्याने सुरक्षारक्षिकेवर गुन्हा दाखल झाला आहे. बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील हा प्रकार आहे. १३ मार्चला गणित भाग एकचा पेपर होता. यावेळी विद्यालयातील सुरक्षा रक्षक असलेल्या मनीषा कांबळे यांनी परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेपरचे फोटो काढले. १५ मार्चला बोर्डाचे पथक तपासणीसाठी विद्यालयात गेले असता आरोपी महिलेवर पथकाचा संशय आला.

अमृता फडणवीसांकडून डिझायनर विरोधात गुन्हा दाखल

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनुसार एका डिझायनरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मलबार हिल पोलीस ठाण्यात अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल झाला. अमृता फडणवीस यांना अनिष्का नावाच्या महिलेनं अप्रत्यक्षरित्या धमकावून, कट रचून 1 कोटींची लाच ऑफर करण्याचा प्रयत्न केला होता.

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

राज्यात मागच्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांसह हलक्या पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामान असल्याने आजपासून (ता.१६) राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पावसाचा तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा 'ऑरेंज' अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. शाळू, द्राक्षे, कापणीला आलेला गहू, यासारख्या पिकांना मोठा दणका बसल्याच दिसून येत आहे. काल झालेल्या पावसाने कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर, भुसावळ तालुक्यात मोठा पाऊस झाला आहे. 

भूकंपानं न्यूझीलंडची धरती हादरली; कर्माडेक बेटावर 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप

वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या कर्माडेक बेटावर (Kermadec Islands) आज (गुरुवार) भूकंपाचे (Earthquake In New Zealand) जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.1 मोजण्यात आली आहे. भूकंपाच्या धक्क्यांनंतर जवळपासच्या बेटांना सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाचं केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर अंतरावर असल्याचं सांगण्यात येत आहे.

ईडीकडून हसन मुश्रीफ यांची आठ तास चौकशी

कथित आर्थिक अफरातफरीच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेले माजी कॅबिनेट मंत्री आणि कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांची बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने आठ तास चौकशी केली. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने हसन मुश्रीफ यांना समन्स बजावले होते. तत्पूर्वी ईडीने मुश्रीफ यांना पुढील दोन आठवडे अटक करू नये, तसेच या अवधीत मुश्रीफ यांना अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात दाद मागण्यास मुभा आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने दिला होता.

संपात फूट; कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संघटनेची माघार

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सध्या राज्यातले शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सध्या राज्यातल्या शासकीय कामकाजाचा खोळंबा झाला आहे. मात्र आता या संपात फूट पडल्याचं दिसून येत आहे.

Maharashtra National Live Update : राज्यातील 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. तसेच देशभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. शिवाय, राज्यात शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरण गाजत आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. यासह देशभरातील विविध बातम्यांवर आमचं लक्ष राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com