भाजपच्या दिल्लीश्वरांची आता ‘राजस्थान’वर नजर

वसुंधरा राजे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न; सचिन पायलट हेच ‘लक्ष्य’ राहणार!
Maharashtra politics bjp want to change politic in rajasthan also like maharashtra
Maharashtra politics bjp want to change politic in rajasthan also like maharashtra sakal
Updated on

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ताबदल केल्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आता त्याच पद्धतीने राजस्थानातही सत्ताबदलाची शक्यता चाचपण्यास सुरवात केली. सचिन पायलट यांना भाजपकडे वळविण्याचा प्रयोग फसला तरी पक्षनेतृत्वाने आशा सोडलेली नाही. नियोजित सत्तापरिवर्तनाच्या ‘खेला होबे‘ मध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी वठविलेल्या भूमिकेत दिसून ते त्याच मार्गाने जाऊ शकतात. दरम्यान, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर नाराज असल्याचे सांगितले जाणाऱ्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनाही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तूर्त समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले. एका भाजप नेत्याच्या मते, ‘फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रिपदाचा कसा सीन झाला, हे आपण पाहिले असेलच', हा मेसेज वसुंधरा यांच्यापर्यंत व्यवस्थित पोचविला आहे. वसुंधरा राजे यांच्या कारभाराबद्दल अजूनही रोष आहे.

मात्र त्यांची उपद्रव क्षमताही मोठी असल्याने ‘दिल्ली’ने वसुंधरा यांच्याबाबत सावध पावले टाकण्याचे धोरण ठेवले आहे. एरव्ही भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीत शक्यतो केंद्रीय मंत्रीच पत्रकारांना संबोधित करतात. मात्र हैदराबादमधील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्या दिवशीची पहिलीच पत्रकार परिषद घेण्याची जबाबदारी वसुंधराराजे यांच्यावर टाकून त्यांना चुचकारण्याचा आणखी एक प्रयत्न केला. राजस्थानात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत मात्र भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाला तेवढे थांबण्याचीही गरज वाटत नाही. गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच्या दौऱ्यांत आम्हाला अशोक गेहलोत सरकार पाडण्यात रस नाही, असे सांगितले. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मुख्य म्हणजे उदयपूरच्या घटनेने राज्यात काँग्रेसविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेवरून भाजपने गेहलोत सरकारला लक्ष्य केले आहे.

महाराष्ट्रात २१ जून रोजी शिवसेनेत दुफळी झाली, तेव्हापासून राजस्थान भाजप प्रदेश अध्यक्ष सतीश पूनिया, शेखावत आदी नेत्यांची वक्तव्ये पाहिल्यास ‘‘ राजस्थान तर महाराष्ट्रापेक्षा सोपे जाईल'', असे संकेत भाजपला मिळत आहेत. याही वेळेस भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे ‘लक्ष्य' सचिन पायलट हेच आहेत. त्यांच्या गटाकडून पुन्हा असंतोष व नाराजीदर्शक विधाने येत असल्याचे भाजपचे मत आहे.

कॉंग्रेसमध्ये पुन्हा संघर्ष?

राजस्थानात काँग्रेसमध्ये पुन्हा संघर्ष उफाळून आल्याने राज्य मुदतपूर्व निवडणुकांच्या दिशेने जात असल्याचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुण चतुर्वेदी यांनी सांगितले. राजस्थान सरकारच्या गाडीचे टायर कधी पंक्चर होईल व सरकार गडगडेल याची खात्री देता येत नसल्याचे विधान पुनिया यांनी अनेकदा केले आहे. मध्य प्रदेश असो, महाराष्ट्र की राजस्थान, काँग्रेस व त्यांच्या मित्रांना स्वतःचे घरही सांभाळता येत नाही व सरकार पडले की भाजपवर बिनबुडाचे आरोप लावले जातात, असा टोला भाजप नेत्याने शिवसेनेचे नाव न घेता लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com