काँग्रेसचा राजस्थानचा गड वाचवायला महाराष्ट्र धावला?

sachin pilot
sachin pilot

नवी दिल्ली - मध्य प्रदेशानंतर आता राजस्थानातही काँग्रेस सरकार अडचणीत आलं आहे. नाराज असलेल्या सचिन पायलट यांनी गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचं म्हटल्यानंतर काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. सचिन पायलट पक्ष सोडण्याच्या तयारी असले तरी काँग्रेस मात्र त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही यासाठी पुढाकार घेतल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माध्यमांसमोर आमदारांसह शक्ती प्रदर्शन केलं आहे. त्यामुळे सचिन पायलट एकटे पडले आहेत असंच काहीसं चित्र निर्माण झालं आहे. त्यातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन पायटल यांची मनधरणी कऱण्यासाठी प्रियांका गांधी चर्चा करत असल्याचं समजत आहे. 

सचिन पायलट यांच्या भूमिकेनंतर राजस्थानमध्ये काँग्रेसच्या मुख्यालयात असलेले सचिन पायलट यांचे पोस्टर्स काढण्यात आले होते. मात्र प्रियांका गांधींच्या आदेशानंतर पोस्टर पुन्हा लावण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियांका गांधींनी सचिन पायलट यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. तसंच त्यांना विश्वास दिला आहे की त्यांचे म्हणणे पक्ष ऐकून घेईल आणि बाजूही समजून घेईल. प्रियांका गांधी यांनी दोन्ही नेत्यांनी चर्चेतून हा प्रश्न सोडवावा असं सांगितलं आहे. 

दरम्यान, गेहलोत यांच्यामुळे नाराज झालेल्या सचिन पायलट यांच्या मनधरणीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील नेत्याला चर्चा करण्यास सांगितल्याची माहिती मिळते. मुंबई काँग्रेसचे युवा नेते मिलिंद देवरा यांना काँग्रेसने सचिन पायलट यांच्याशी चर्चा करण्यास सांगितलं असल्याचं म्हटलं जात आहे. सचिन पायलट यांच्याप्रमाणे मिलिंद देवरा हेसुद्दा काँग्रेसचा तरुण चेहरा आहेत. याबाबत मिलिंद देवरा यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी म्हटलं की, जगातील प्रत्येक पक्षात मतभेद असतात. मात्र अडचणी सोडवण्याचं काम पक्षाच्या नेतृत्वाचं असतं. राजस्थानातील वाद मोठा नाही जो सोडवता येईल. मात्र पक्षाचे हित पाहता सचिन पायलट यांची नाराजी दूर करायला हवी. पक्षातून एक एक नेते असे निघून गेले तर उरणार कोण असा प्रश्नही संजय निरुपम यांनी विचारला आहे. 

उमा भारतींनी केली टीका
मध्य प्रदेश सरकार असो किंवा राजस्थान सरकार, दोन्ही सरकारे पडण्यामागे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा मत्सर आहे. राहुल गांधी यांना काँग्रेमधील तरुण नेत्यांकडे पाहून हेवा वाटतो. राहुल गांधी सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मत्सर करतात. त्यांना वाटतं की, हे दोन्ही नेते पुढे जाऊ लागले तर आपल्याला कोणी विचारणार नाही, अशी बोचरी टीका उमा भारती यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com