महाड तालुक्यात रायगडवाडी येथील धबधब्यातील कुंडात पोहण्यासाठी गेलेला एक व्यक्ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला आहे. मनोज शांताराम खोपकर वय वर्ष 40 राहणार रायगड वाडी असे बेपत्ता व्यक्तीचे नाव आहे. NDRF पथक, स्थानिक ग्रामस्थांकडून त्याचा शोध घेतला जात असून तो अद्याप सापडून आलेला नाही. रविवारी दुपारी किल्ले रायगडावर अतीवृष्टीचे दरम्यान हि घटना घडली. मनोज पोहत असताना अचानक धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह वाढला, पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने मनोज वाहून गेला.
पुण्यासह रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
अहमदनगरमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथे चोराने चक्क पोलीस पाटलांच्या घरातच डल्ला मारल्याचा प्रकार घडला आहे. पहाटेच्या सुमारास एका चोरट्याने घरात प्रवेश केला आणि घरातील एक लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केलाय. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
"चांदणी चौक ते हिंजवडी या मार्गावर मेट्रो होण्याची गरज आहे. पुणे बंगळुरू या महामार्गावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी हा मार्ग आवश्यक आहे. या मार्गाचा नव्याने समावेश करण्याची सुचना मी केलेली आहे. अन्य प्रस्तावित मार्गांना कॅबिनेटमध्ये अंतिम मंजुरी देण्यासाठी पाठपुरावा करू.' अशी माहिती केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर माहोळ यांनी सोमवारी दिली. तसेच सिव्हील कोर्ट ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रोचे ऑगस्टमध्ये उद्घाटन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मेट्रोच्या शिवाजीनगर येथील कार्यालयास मोहोळ यांनी सोमवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास भेट देऊन मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त शेखर सिंग, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक अतुल गाडगीळ, हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मेट्रोच्या कामाची सद्यःस्थिती, प्रस्तावित प्रकल्प व विविध उपक्रमांबाबतची माहिती दिली.
मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीच्या पोस्टरचे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून प्रकाशन करण्यात आलं आहे. 11 तारखेला बीड शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील वाहतूक आता पुन्हा सुरू झाली आहे. मध्य रेल्वेवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा ठप्प झालेली. आता ती लोकल पुन्हा एकदा सुरू झाली असून या मार्गावरील स्लो आणि फास्ट, अप आणि डाऊन दिशेने वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
पावसामुळे कोणते रस्ते बाधित झाले आहेत याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. वाहतूक चालू रहावी, ज्या सखल भागात पाणी साचले आहे तिथे पंप लावून पाणी काढून टाकावे, जिथे रेल्वे सेवा बाधित झाली आहे तिथे बेस्ट बसेसची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
24 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करणे ही मोठी गोष्ट
CJI खंडपीठ म्हणाले, 'आम्ही अजूनही अनियमिततेचा फायदा घेणारे विद्यार्थी ओळखत आहोत का? जर होय, तर आम्हाला संपूर्ण परीक्षा रद्द करावी लागेल. NEET परीक्षा रद्द करणे ही 24 लाख विद्यार्थ्यांसाठी मोठी बाब ठरेल. जर आम्ही परीक्षा रद्द केली नाही, तर फसवणुकीचा फायदा झालेल्यांना ओळखण्यासाठी आम्ही काय करणार आहोत?'
गेल्या 48 तासांपासून मुंबई आणि उपनगरात पडणाऱ्या तुफान पावसाचा फटका ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहराला बसला असून, सकाळपासून विस्कळीत झालेल्या मध्य रेल्वे च्या वाहतुकीचा मोठा त्रास बदलापूरकरांना सहन करावा लागला आहे. सकाळी 7 वाजल्यापासूनच बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा विस्कळित झाल्याने, पुढे या लोकल कल्याण त्यानंतर ठाणे स्टेशन पर्यंत चालविण्यात आल्या.
त्यानंतर सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत बदलापूर हुन मुंबई गाठण्यासाठी बदलापूर ते कल्याण, पुढे कल्याण ते ठाणे आणि त्यानंतर ठाणे ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस असा प्रवास बदलापूरकरांना करावा लागला.
मात्र दुपार नंतर मध्यरेल्वे ची सेवा पूर्वपदावर आली असून, बदलापूर रेल्वे स्थानकातून दुपारी 1 वाजून 22 मिनिटांची पहिली थेट लोकल मुंबईकडे रवाना करण्यात आली. मात्र या सगळ्या त्रासात सकाळपासून रेल्वे स्थानकात ताटकळत बसलेल्या अनेक चाकरमान्यांना पुन्हा घरी माघारी फिरावे लागले.
पुरी येथे आयोजित दोन दिवसीय भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.
पुढील 24 तासात पश्चिम विदर्भातील अकोला अमरावती, यवतमाळसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुलढाणा, अमरावतीत, मुसळधार पाऊस होईल.नागपूरच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
दक्षिण मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू असून, मरीन ड्राईव्हच्या किनारपट्टीवर समुद्राच्या लाटा उसळल्या आहेत. पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने हायटाईड बाबत भीती व्यक्त केली जात आहे.
पुढील तीन तास मुंबई, रत्नागिरी, रायगड परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर आणि सातारा, कोल्हापूर आणि नाशिकातील घाट माथ्यावर मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून अलर्ट जारी करण्यात आलाय.
मुंबईतील लोकलसेवा सुरळीत होत आहे. बंद असलेली हार्बर लोकल सेवा देखील सुरू झाली आहे. तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा संथगतीने सुरु झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
नागालँड आमदार आपत्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी केली आहे. पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या याचिकेसोबत या प्रकरणी सुनावणी होणार आहे. १६ जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे.
मुंबईतील पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई कंट्रोल रूमला भेट दिली आहे. यावेळी आयुक्त सुजाता सौनिक, मंत्री केसरकर, लोढा इत्यादी उपस्थित आहेत. मुंबईकरांना गरज असली तरच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत समूद्रात दुपारी १. ५७ वाजता मोठी भरती येणार आहे. यादरम्यान मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
निसर्गाची कृपादृष्टी राहावी यासाठी सातपुड्याच्या आदिवासी बांधवांची नेवती पूजनाला सुरुवात पावसाळ्यानंतर गावातील लोक आणि जनावरांची जंगले हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण व्हावे पीठ पाणी चांगलं यावं गुरांना मुबलक चारा उपलब्ध व्हावा तसेच जंगलातून देखील विविध फळे भाजी उपलब्ध व्हावी अशा अनेक भावना सह आदिवासी समाज निसर्गाशी विश्वास ठेवत आपली नाती एकरूप करत पारंपारिक पद्धतीने निसर्गदेवतेची पूजा करत असतो नंदुरबार जिल्ह्यातील लक्कडकोट गावात आदिवासी बांधव एकत्रित सामूहिक पद्धतीने नेवती पूजा करण्यात आली...
हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील 365 दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुसळधार पावसाचा विधीमंडळ कामाकाजाला फटका बसला आहे. ११ वाजताचे कामकाज १ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कोरंम नसल्यानं कामकाज तहकूब करण्यात आले
मागील दोन दिवसांच्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची मोठी आवक झाली. मागील दोन दिवसात जवळपास ८ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १८.७३ टक्के पाणीसाठा आहे.
तुलसी आणि विहार धरणक्षेत्रात मागील २४ तासात अतिवृष्टी झाली.
बुलढाणा जिल्ह्यात घाटाखालील भागात मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस सुरु असून ठीकठकांनी नदीनाले तुडुंबं भरून वाहत आहे. तसेच खामगाव ते बुलढाणा दरम्यान रोहणा गावानजीक असलेल्या नदीला महापूर आल्याने खामगावचा बुलढाण्याशी संपर्क तुटला आहे. गेल्या दोन तासापासून रस्ता बंद झाल्याने वाहणाच्यात रांगा लागल्या आहेत.
रत्नागिरी - राजापूर पुरात अडकलेल्या 56 नागरिकांना राजापूर पोलिसांनी वाचवले. जवळपास पाच ते सहा तास रेस्क्यु आँपरेशन सुरु होतं. राजापूर बाजारपेठेत पुराच्या पाण्यात नागरिक अडकले होते. बोटीच्या सहाय्याने अडकलेल्या नागरीकांना काढले बाहेर. काल राजापूर बाजारपेठेत पाच ते सहा फुटांपर्यंत पुराचं पाणी होते. पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी मोलाची कामगिरी केली.
मुसळधार पावसामुळे माटुंगा रोड आणि दादर दरम्यान ट्रॅक पातळीपेक्षा जास्त पाणी असल्यामुळे WR च्या मुंबई उपनगरी गाड्या 10 मिनिटे उशिराने धावत आहेत.
मुंबईकरांना सुरळीत प्रवास करता यावा यासाठी रेल्वे रुळांपासून दूर पाणी काढून टाकण्यासाठी उच्च क्षमतेच्या जलपंपांचा वापर केला जात आहे.
कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू असून, नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. याचबरोबर जिल्ह्यातील तब्बल ५० बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशानसनाने अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय़ घेतला आहे. यामध्ये सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.
पहाटेपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत सगळीकडे पाणीच पाणी साचल्याच पाहायला मिळत आहे. दरम्यान वर्सोवा घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या मेट्रो मार्गाखालील अनेक स्थानके देखील पाण्याखाली गेली आहेत. साकीनाका मेट्रो स्थानक, आझाद नगर मेट्रो स्थानकाचा परिसर जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईत आज पहाटे 1 ते सकाळी 7 या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. काही सखल भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचले असून, उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी, मुंबईतील सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्राची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील सत्राचा निर्णय जाहीर केला जाईल
भांडुप स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅक वर पाणी साचल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान अप अँड डाऊन मार्गावरील सर्वच ट्रेन पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. ठाण्याच्या पुढे लोकल ट्रेन व एक्सप्रेस गाड्या जात नसल्याने कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवश्याची व चाकरमान्याची मोठी गर्दी झाली आहे.
Breaking Marathi News Updates 7 July 2024 : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांसह मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते वाहतुकीसह रेल्वे आणि लोकलवर परिणाम झाला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला धारेवर धरले. ‘‘आम्ही राज्य सरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारने काढलेले ‘सगेसोयरे’चे परिपत्रक लागू करण्यासाठी १३ जुलैपर्यंतची मुदत दिलेली आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या नेत्यांनी ‘सगेसोयरे’चे परिपत्रक राज्य सरकारने रद्द करावे, यासाठी सरकारवर दबाव आणला.
दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज मणिपूर दौरा करणार आहेत. यामध्ये ते हिंसाचारानंतर तेथील परिस्थिती कशी आहे याची पाहणी करणार आहेत.
यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.