नवी दिल्ली- कृषी आंदोलनावरुन राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी कृषी कायद्यांचे समर्थन करत काँग्रेसवर टीका केली. विरोधक म्हणताहेत की ज्यांनी कृषी कायदे बनवले ते शेतकरी नाहीत. ज्यांना बटाटे जमिनीवर उगतात की जमिनीमध्ये हे माहिती नाही ते शेतकरी आहेत का? सोनिया गांधी शेतकरी आहेत का? शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने कोणी काही केलं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या . त्या मेरठमध्ये बोलत होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात एमएसपीसाठी शेतकऱ्यांना 8 लाख कोटी रुपये दिले आहेत. दुसरीकडे यूपीएच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात केवळ 3.5 लाख कोटी रुपये खर्च झाले. सत्ताधारी असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?, असा सवाल स्मृती इराणी यांनी किसान संमेलनात केला. कृषी कायद्यावरुन काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. कायद्याचा मसुदा तयार करताना कोणत्याही शेतकऱ्याला बोलावण्यात आलं नाही, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
गेल्या 20 पेक्षा अधिक दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहे. सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दुसरीकडे सरकारने कृषी कायद्यात सुधारणा करण्याची तयारी दाखवली आहे, पण कायदे रद्द करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यामधील रोध कायम आहे. सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्या, पण काहीही तोडगा निघू शकलेला नाही.
पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायद्यांच्या समर्थनात आज भाष्य केले. कृषी कायद्याचा विषय हा एका रात्रीत घेतलेला निर्णय नाही. मागील 20-22 वर्षांपासून याविषयी मंथन सुरु होते. प्रत्येक सरकारने या मुद्यावर व्यापक चर्चा केली. देशातील शेतकरी, वैज्ञानिक, अर्थशास्त्रज्ञ यांच्याकडून कृषी क्षेत्रातील बदलासाठी कायद्यात बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. सरकारने ती सत्यात उतरवली, असेही मोंदीने सांगितले. निवडणुकीवेळी मतासाठी आश्वासन देणाऱ्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारायला हवेत. त्यांनी कधीच शेतकऱ्यांना प्राधान्य दिले नाही, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.