नवी दिल्लीः पाकिस्तानात जाणारे आपल्या वाट्याचे पाणी अडविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. परंतु, भारताने आमचे पाणी बंद केल्याने काही फरक पडत नाही, असे पाकिस्तानच्या जल मंत्रालयाचे सचिव ख्वाजा शुमैल यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'सिंधू खोऱ्यातील पाणी करारानुसार सतलज, बियास व रावी या नद्यांचे पाणी भारताने बंद केल्याने पाकिस्तानवर काहीही फरक पडणार नाही. पाकिस्तानी नागिरक पाण्यासाठी दुसऱया मार्गाचा अवलंब करतील, असे शुमैल यांनी म्हटेल आहे.'
दरम्यान, सिंधू खोऱ्यातील भारताच्या वाट्याचे, परंतु पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी जम्मू-काश्मीर व पंजाबमधील नद्यांमध्ये वळविण्याचा महत्त्वाचा निर्णय गुरुवारी (ता. 21) केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच ट्विटद्वारे ही माहिती दिली. रावी, सतलज आणि बियास नद्यांचे पाणी वळविण्यात येणार असून, त्याचा वापर भारतातच करण्यात येणार असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. रावी नदीवर शाहपूर-कांदी येथे धरण बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पुलवामानध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. मोस्ट फेव्हर्ड नेशनचा पाकिस्तानला असलेला दर्जाही भारताने रद्द केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आणखी एक पाऊल टाकत पाकिस्तानात जाणारे आपल्या वाट्याचे पाणी अडविण्याचा निर्णय घेतला आहे.
असे वाचविणार पाणी
सिंधू खोऱ्यातील पाणी करारानुसार सतलज, बियास आणि या नद्यांचे पाणी भारताला मिळणार आहे. तर चिनाब, झेलम आणि सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानला मिळणार आहे. सिंधू खोऱ्यात उपलब्ध असलेल्या एकूण 168 दशलक्ष एकर फूट पाण्यापैकी भारताच्या वाट्याला 33 दशलक्ष एकर फूट पाणी येते. हे प्रमाण एकूण पैकी 20 टक्के आहे. भारत आपल्या वाट्याचे 93 ते 94 टक्के पाणी वापरते. उर्वरित पाणी पाकिस्तानात वाहून जात होते. ते पाणी आता इतरत्र वळविण्यात येणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.