मेरठ (उत्तर प्रदेश) : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी आज रोखले. दिल्लीतून उत्तर प्रदेशात मेरठमध्ये जात असलेल्या राहुल-प्रियंका यांना पोलिसांनी मेरठ शहराबाहेर रोखले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी, पुन्हा दिल्लीकडे जाण्याचा निर्णय घेतला.
काय घडले?
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA)विरोधात उत्तर प्रदेशात आंदोलन भडकले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यात काहींना आपला जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेशात जवळपास 11 जणांचा यात बळी गेला. त्यात काही जण मेरठ शहरातील आहेत. या मृतांच्या नातेवाईकांना भेटण्याचे नियोजन आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी केले होते. त्यासाठी दोघे गाडीने दिल्लीहून मेरठला निघाले होते. त्या वेळी मेरठ शहराबाहेर पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची गाडी रोखली. पोलिसांना विनंती करून, त्यांनी दोन्ही काँग्रेस नेत्यांना मेरठ शहरात प्रवेश दिला नाही. त्यामुळं नाईलाजानं राहुल आणि प्रियंका यांना पुन्हा दिल्लीच्या दिशेने परतावे लागले. सध्या दोघेही दिल्लीत येत असल्याची माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात काँग्रेसकडून अद्याप कोणतिही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच उत्तर प्रदेस पोलिस किंवा सरकारनेही या संदर्भात कोणतिही माहिती दिलेली नाही.
काँग्रेसचा कायद्याला विरोध
काँग्रेसने CAA आणि NRC कायद्यांच्या विरोधात सत्याग्रह करून, केंद्र सरकारला आव्हान देण्याचा निर्धार केलाय. काल (23 डिसेंबर) दिल्लीत राजघाटावर सत्याग्रह करून, काँग्रेसनं कायद्यांच्या विरोधात सत्याग्रह केला. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, सरचिटणीस प्रियंका गांधी आदी प्रमुख नेते उपस्थित होते. कायद्यांच्या विरोधात दिल्लीत हिंसक आंदोलन उफाळले होते. त्यावेळीही प्रियंका गांधी दोन वेळा इंडिया गेटच्या बाहेर धरणे आंदोलनाला बसल्या होत्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.