
अहमदाबाद : ‘‘संसदेत संमत झालेला वक्फ दुरुस्ती कायदा राज्यघटनाविरोधी आणि धार्मिक स्वातंत्र्यावर आघात करणारा आहे,’’ अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अहमदाबाद येथील कार्यकारिणी बैठकीत नव्या वक्फ कायद्याविरोधातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. तसेच, जातीनिहाय जनगणनेची आक्रमक मागणी करताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींची व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जोरदार खिल्ली उडविली. अमेरिकेच्या शुल्क आकारणीमुळे गंभीर आर्थिक संकट येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.