रेल्वेने तिकीट विक्रीतून ४५.३० कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली  

रेल्वेने तिकीट विक्रीतून ४५.३० कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली  

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने मुंबईसह पंधरा निवडक ठिकाणांसाठी १२ मेपासून सुरू केलेल्या प्रवासी रेल्वे गाड्यांचे ऑनलाइन बुकिंग हाउसफुल झाले असून आतापावेतो रेल्वेने केवळ १५ प्रवासी रेल्वेगाड्यांच्या तिकीट विक्रीतून दोन दिवसांत ४५.३० कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. मात्र लॉकडाउन सुरू असेपर्यंत अन्य प्रवासी गाड्या आणि उपनगरी रेल्वेसेवा सुरू करण्यास रेल्वेने नकार दिला आहे. 

सरकारने जाहीर केलेल्या विशेष रेल्वे गाड्यांसाठी आतापावेतो २ लाख ३४ हजार ४११ प्रवाशांनी तिकिटे आरक्षित केली आहेत, अशी माहिती रेल्वेतर्फे आज देण्यात आली. या गाड्यांसाठी २२ तारखेपासूनच्या आरक्षणासाठी वेटिंग श्रेणीतील तिकीट विक्रीदेखील होणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. विशेष रेल्वेगाड्या सुरू होताच ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर उड्या पडल्या आणि १२ तारखेला दुपारी चारनंतर हे संकेतस्थळ काही वेळासाठी क्रॅश झाले. दिल्ली पाटणा गाडी वगळता अन्य सर्व मार्गांवरील तिकीट विक्री क्षमतेने झाल्याचे रेल्वेने म्हटले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काल विशेष गाड्यांसाठी २०,१४९ प्रवाशांनी आणि आज सुटणाऱ्या गाड्यांसाठी २५,७३७ प्रवाशांनी आरक्षण केले आहे. दिल्लीतून काल मुंबईसह नऊ विशेष गाड्यांसाठी सुमारे १० हजार प्रवाशांनी आरक्षण केले होते. आतापावेतो रेल्वेने यातून ४५ कोटी ३० लाख ९ हजार ६७५ रुपयांची कमाई केली असून लॉकडाऊन संपेपर्यंत या गाड्या अशाच चालविण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. पाटणा गाडी वगळता इतर सर्व गाड्यांचे आरक्षण शंभर टक्के आणि त्यावर झाले होते असे रेल्वेने म्हटले आहे. जा स्थानकांवर गाडी थांबेल तेथेही आरक्षण पूर्ण झाले होते. हावडा, चेन्नई, मुंबई, जम्मू, तिरुअनंतपुरम या गाड्यांसाठी ११५ ते १४० टक्के आरक्षण झाले होते. मात्र याचा अर्थ लोकांनी उभे राहून प्रवास केला असा नसून मधल्या स्थानकांवर रिकाम्या होणाऱ्या जागा पूर्ण क्षमतेने भरल्या असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

इतर आरक्षणे रद्द 
रेल्वेने ३० जूनपर्यंत रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण केलेल्या सर्व प्रवाशांची तिकिटे रद्द करण्याची घोषणा केली आहे. ३० जूनपर्यंतची सर्व ऑनलाइन तिकिटे आपोआप रद्द होणार असून या तिकिटांचा शंभर टक्के परतावा प्रवाशांना मिळणार असल्याचे रेल्वेने जाहीर केले. रद्द करण्यात आलेल्या तिकिटांमध्ये मेल, एक्सप्रेस तसेच लोकल उपनगरीय रेल्वे तिकिटांचा समावेश आहे. मात्र या काळात स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमीक विशेष तसेच निवडक महानगरांसाठीच्या विशेष गाड्या सुरुच राहणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com