आंतरभारती चळवळीचे प्रवर्तक, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, साहित्यिक, समाजसेवक, समाजसुधारणेसाठी झोकून देऊन काम करणाऱ्या पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेऊयात.
साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. गुरूजींचे प्राथमिक शिक्षण दापोलीत झाले. त्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी मामाकडे पुण्यात पाठविण्यात आले. पण पुण्यात त्यांचे मन रमले नाही, परत ते दापोली येथील मिशनरी शाळेत आले.
नूतन मराठी विद्यालयात शिक्षण झाल्यावर न्यू पूना कॉलेजमधून त्यांनी मराठी आणि संस्कृत साहित्यात त्यांनी एम. ए पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमळनेर इथे प्रताप विद्यालयात त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. याठिकाणी वसतिगृह सांभाळतांना त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले. सेवावृत्ती शिकवली, विद्यार्थ्यांचे ते सर्वाधिक आवडते शिक्षक झाले. अमळनेर या ठिकाणी साने गुरुजींनी तत्वज्ञानाचा अभ्यास देखील केला.
1928 साली साने गुरुजींनी ‘विद्यार्थी’ नावाचे मासिक सुरु केले. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार प्रभाव होता. स्वतःच्या जीवनात देखील ते खादी वस्त्रांचाच वापर करीत असत. समाजातील जातीभेदाला, अस्पृश्यतेला, अनिष्ट रूढी परंपरांना साने गुरुजींनी कायम विरोध केला. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या साने गुरुजींनी 1930 साली शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत उडी घेतली.
1942 च्या चळवळीमधे भूमिगत राहून सानेगुरुजीनी स्वातंत्र्याचा प्रचार केला. स्वातंत्र्य समरातील त्यांच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. नाशिकला कारागृहात त्यांनी श्यामची आईचे लेखन पूर्ण केले. आई विषयी अपार करुणा, देशाविषयीचे प्रेम आणि मानवते विषयीची तळमळ या सर्व गोष्टी साने गुरुजींच्या लेखनातून दिसून येतात. धुळे येथे कारागृहात असतांना साने गुरुजींनी विनोबा भावे यांनी सांगितलेली ‘गीताई’ लिहिली.
पुढे खान्देशाला त्यांनी आपली कर्मभूमी बनविले. प्रांताप्रांतातील भेदभाव दूर व्हावा आणि सर्वत्र बंधूप्रेमाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी साने गुरुजींनी आंतरभारतीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. साहित्य संमेलनात तशी इच्छा त्यांनी बोलून देखील दाखवली होती.
जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता ह्यांचे निर्मूलन झाले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. १९४६ मध्ये पंढरपूरचे विठ्ठलमंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले. त्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला. या लढ्याला तडीस नेण्यासाठी गुरूजींनी उपोषणही केले. ‘पंढरपूर मंदिर मोकळे व्हावे; पांडुरंगाच्या पायी हरिजनांना डोके ठेवता यावे, यासाठी आज मी एकादशीपासून उपवास करत आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या व्यवस्थापकांना माझी विनंती आहे की, त्यांनी देवाजवळ सर्व लेकरांस येऊ द्यावे. तशी त्यांनी घोषणा करावी. तोपर्यंत मी उपवास करत राहीन,असे त्यावेळी ते म्हणाले होते.
त्यांच्या या लढ्याला प्रचंड विरोधही झाला. “जावो साने भीमापार नही खुलेगा विठ्ठलद्वार”, अशा घोषणाही त्यांच्याविरोधात देण्यात आल्या. या सत्याग्रहाला महात्मा गांधींजींचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. पण, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. हा लढा सुरू असतानाच खुद्द गांधीजींना साने गुरुजींच्या आंदोलनाबद्दल गैरसमज करून देण्यात आला. गांधीजीनी गुरुजींना ताबोडतोब हे उपोषण थांबवा असा आदेश दिला. पण, साने गुरूजी थांबले नाहीत.
अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.
साने गुरुजी यांनी आपल्या आयुष्यातली शेवटची अनेक वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णैजवळच्या आपल्या मूळ गावी-पालगड गावी काढली. तेथे त्यांचे राहते घर आजही चांगल्या प्रकारे ठेवले आहे ते ज्या शाळेत जात होते ती प्राथमिक शाळाही आज चालू आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात गुरूजी भारतीय समाजातील असमानता दूर करण्याच्या शक्यतेमुळे निराश झाले. 1948च्या जानेवारी महिन्यात महात्मा गांधी यांची नथुराम गोडसेने हत्या केली. या हत्येचा गुरुजींच्या मनावर प्रचंड आघात झाला. साने गुरुजी अनेक कारणांमुळे देशाच्या स्वातंत्र्यानंतर खूप अस्वस्थ झाले. ११ जून १९५० रोजी झोपेच्या अधिक गोळ्या घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.