सोनिया व राहुल यांच्याविना काँग्रेस अधिवेशनात; संसदेचे अधिवेशन आजपासून

sonia-gandhi-rahul-gandhi
sonia-gandhi-rahul-gandhi

नवी दिल्ली -अर्थव्यवस्था, कोरोना संकट, चीनची घुसखोरी या मुद्द्यावर संसद अधिवेशनात सरकारला जाब विचारण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला त्यांच्या प्रमुख नेत्यांशिवायच मैदानात उतरावे लागणार आहे. वैद्यकीय उपचारांसाठी अध्यक्षा सोनिया गांधी या परदेशात गेल्या आहेत, तर त्यांच्यासोबत राहुल गांधीही आहेत. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही पहिल्या दिवशी अधिवेशनात असण्याची शक्यता कमी आहे. 

कोरोना संकटाच्या सावटाखाली संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये मोदी सरकारला धारेवर धरण्यासाठी काँग्रेसच्या रणनितीची माहिती माजी मंत्री व वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकार आणत असलेल्या ११ अध्यादेशांपैकी ४ अध्यादेशांना काँग्रेसचा ठाम विरोध असेल असे त्यांनी स्पष्ट केले. 

घसरलेली अर्थव्यवस्था, कोरोनाचे संकट हाताळण्यात आलेले अपयश, चीनची घुसखोरी अशा मुद्द्यांवर गेल्या अनेक महिन्यांपासून राहुल गांधी केंद्र सरकारला जाब विचारत आहेत. या सर्व मुद्द्यांवर चर्चेची तयारी सरकारने दर्शविली आहे. मात्र या महत्त्वाच्या चर्चेवेळी सोनिया व राहुल गांधी उपस्थित असण्याची शक्यता कमी आहे. सोनिया गांधी किमान दोन आठवडे परदेशी असतील, तर राहुल गांधी हे किमान आठवडाभराने भारतात परतण्याची शक्यता आहे. संसदेचे हे अधिवेशन १८ दिवस चालणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधाची लोकसभेतील धुरा अधीर रंजन चौधरी, शशी थरूर, मनीष तिवारी आदी नेत्यांवर असेल. 

दरम्यान, काँग्रेसचे नेते व राज्यसभेतील सदस्य जयराम रमेश यांनी पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘कृषीला संकटात लोटणाऱ्या तीन अध्यादेशांना, सहकारी बॅंकांवर रिझर्व बॅंकेचे नियंत्रण आणणाऱ्या अध्यादेशाला काँग्रेस कडाडून विरोध करेल. तसेच वादग्रस्त पीएमकेअर फंडावरून सरकारला धारेवर धरले जाईल.’’ 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जयराम म्हणाले, की शेतीशी संबंधित कृषी बाजार, जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल यासारख्या अध्यादेशांच्या विरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. हे शेतकरी विरोधी अध्यादेश मागे घेण्याबाबत पंजाब, छत्तीसगड, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. पंजाब विधानसभेने तर याविरोधात ठरावही मंजूर केला आहे. या अध्यादेशांचा कृषीवर अवलंबून असलेल्या पंजाब, हरियाना, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्याच्या महसूलावर परिणाम होणार आहे. 

याखेरीज सहकारी बॅंका रिझर्व बॅंकेच्या नियंत्रणाखाली आणणारा बॅंकिंग नियमन कायद्यातील बदलासाठीचा अध्यादेशही घटनाविरोधी आहे. सहकारी बॅंका राज्यांच्या नियमांनी चालतात. नव्या बदलांमुळे सदस्य नसलेल्यांनाही सहकारी बॅंकांचे भागभांडवल घेता येईल. त्यामुळे या अध्यादेशाला काँग्रेसचा विरोध आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खासदार आणि मंत्र्यांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्याशी संबंधित अध्यादेशांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. परंतु, आर्थिक संकट असताना २० हजार कोटींचे नवे संसद भवन उभारण्याच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी मोदी सरकार का आग्रही आहे?, असा सवालही जयराम रमेश यांनी केला. खासदार मतदार संघ विकासनिधी दोन वर्षांसाठी स्थगित करण्यालाही काँग्रेसचा असलेला आक्षेप संसद अधिवेशनात प्रखरपणे माडंला जाईल, असे ते म्हणाले. 

‘पीएमकेअर्स’वर टीका 
करकायद्यातील बदलाशी संबंधित अध्यादेशावरून जयराम यांनी पीएमकेअर्स फंडला लक्ष्य केले. या निधीला १०० टक्के करसवलतीची तरतूद अध्यादेशात आहे. परंतु पीएमकेअर्स फंड पारदर्शक नाही. त्याचे लेखापरिक्षण होत नाही. त्यावर माहिती अधिकार कायदा लागू होत नाही. या निधीमध्ये चिनी कंपन्यांच्या देणग्या आहेत. सीमेवर चीनने घुसखोरी केली असून भारतीय भूभाग बळकावला असताना चिनी कंपन्यांकडून देणग्या घेतल्या जातात, यावर सरकारला जाब विचारला जाईल, असे ते म्हणाले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com