South Africa 12 cheetah
South Africa 12 cheetah

Africa Cheetah : आफ्रिकेतील १२ चित्त्यांना भारताची प्रतिक्षा

सामंजस्य कराराला विलंब; विलगीकरणामुळे प्रकृती खालावली

भोपाळ : नामिबियातून काही महिन्यांपूर्वी भारतात आणलेले आठ चित्ते आता वातावरणाशी जुळवून घेत आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिकेत आणखी १२ चित्त्यांना चार महिन्यांपासून भारतात मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नेले जाण्याची प्रतिक्षा आहे. त्यांच्या स्थलांतराविषयीचा सामंजस्य करार झाला नसल्याने त्यांचे स्थलांतर रखडले आहे. सुमारे चार महिन्यांपासून विलगीकणात असल्याने चित्त्यांच्या तंदुरुस्तीवरही परिणाम झाला आहे.

या चित्त्यांमध्ये सात नर व पाच मादी चित्त्यांचा समावेश आहे. गेल्या चार महिन्यांत त्यांनी एकदाही शिकार केलेली नसल्याने त्यांच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. भारतात चित्त्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी नुकत्याच काही बाबींची पूर्तता करण्यात आली. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने या चित्त्यांचे हस्तांतर करण्यासंदर्भात भारत सरकारशी अद्याप सामंजस्य करार केलेला नाही. यापैकी तीन चित्त्यांना दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलु-नताल प्रांतातील फिंडा विलगीकरण केंद्रात तर उर्वरित नऊ चित्त्यांना लिंपोपो प्रांतातील रूईबर्ग विलगीकरण केंद्रात १५ जुलैपासून ठेवले आहे.

तब्बल चार महिन्यांपासून शिकार न केल्याने चित्त्यांच्या तंदुरुस्तीवर मोठा परिणाम झाला आहे. सतत बैठ्या अवस्थेत असणाऱ्या मनुष्यांप्रमाणे त्यांचे वजन वाढू शकते, अशी भीती वन्यजीवतज्ज्ञांना आहे. धावणे बंद झाल्याने चित्त्यांच्या स्नायू, तंदुरुस्तीवर विपरीत परिणाम होत आहे. गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने चित्त्यांच्या स्थलांतराच्या भारताच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला. आता, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष दोन्ही देशांदरम्यानच्या औपचारिक कराराला मान्यता देतील, असे एका वन्यजीवतज्ज्ञाने सांगितले.

जगातील सर्वांत वेगवान प्राणी असलेल्या चित्त्यासाठी भारताने कुनो राष्ट्रीय उद्यानात केलेल्या सोयीसुविधांची पाहणीही दक्षिण आफ्रिकेच्या एका शिष्टमंडळाने केली होती. त्यानंतर, या सोयीसुविधांबद्दलही शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले होते. आता केवळ दोन्ही देशांतील सामंजस्य करार पूर्ण होण्याची प्रतिक्षा आहे. भारतीय वन्यजीव कायद्यानुसार चित्ते भारतात आल्यानंतर त्यांना पुन्हा एक महिना विलगीकरणात ठेवले जाईल.

करारावर लवकरच स्वाक्षऱ्या

मध्य प्रदेशचे प्रधान मुख्य वनसंरक्षण जे.एस.चौहान यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले, की नामिबियातील चित्त्यांप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेतील चित्त्यांना स्वीकारण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

या चित्त्यांच्या स्थलांतराबाबतच्या सामंजस्य करारावर लवकरच भारत व दक्षिण आफ्रिकेकडून स्वाक्षऱ्या केल्या जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com