Telangana Lok Sabha : के. सी. आर. यांच्यासाठी जीवन-मरणाची निवडणूक; 'बीआरएस' पुढे अडचणींचा डोंगर

तेलंगण राज्याची निर्मिती झाल्यानंतर KCR यांच्या पक्षाला निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाले होते. काँग्रेस व तेलुगू देशम पक्ष फोडण्यासाठी त्यांनी जे धोरण राबविले होते, तेच त्यांच्यावर आता उलटले आहे.
KCR Telangana
KCR TelanganaeSakal

विधानसभा निवडणुकीत भारत राष्‍ट्र समितीला (बीआरएस) दारुण पराभव झाल्यानंतर तेलंगणमध्ये राजकीय चित्र पूर्णपणे पालटले आहे. विधानसभेनंतर वर्षभरातच लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये ‘बीआरएस’ला पुन्हा उभे राहण्यासाठी वेळ लागणार आहे. विधानसभेतील मिळालेल्या एकतर्फी विजयाने काँग्रेसचा दबदबा वाढला आहे.

- एम.ए.एस कुमार

तेलंगण आणि के.चंद्रशेखर राव ऊर्फ के. सी.आर. ही ओळख गेल्या दहा वर्षांपासून होती. राष्ट्रीय पातळीवर राजकारणात प्रवेश करण्यासाठी के.सी.आर यांनी तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती (बीआरएस) केले. या नावानुसार त्यांनी तेलंगणच्या शेजारील राज्यांमध्ये हातपाय पसरण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात नांदेडसह अन्य ठिकाणी जोरदार सभा घेतल्या. पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून चितपट झाल्यानंतर के.सी.आर राव आणि त्यांच्या पक्षाला आता अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पक्षाचे नेते व आमदारही सोडून जाऊ लागले आहेत.

आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन वेगळ्या तेलंगण राज्याची निर्मिती झाल्यानंतर के. सी.आर. राव यांच्या पक्षाला निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाले होते. सरकार आणि पक्षाला मजबूत करण्यासाठी, काँग्रेस व तेलुगू देशम पक्ष फोडण्यासाठी त्यांनी जे धोरण राबविले होते, तेच त्यांच्यावर आता उलटले आहे. विधानसभेत के.सी.आर यांचे ३९ आमदार आहेत. पण ही संख्या कमी होऊ लागली आहे. कधी, कोणता आमदार काँग्रेसचा ‘हात’ धरेल याचा अंदाजही करू शकत नाही, अशी स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देऊनही नेते अन्य पक्षांत प्रवेश करीत आहेत. राज्याच्या राजकीय पटलावर ‘बीआरएस’ची अशी अवस्था पहिल्यांदा पाहायला मिळत आहे.

तेलंगणमध्ये १३ मे रोजी मतदान होणार आहे. तीन पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर यशाची कमान कायम राखण्यासाठी मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्यासाठी लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. याआधीच्या लोकसभा निवडणुकीत उत्तरेकडील राज्यांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे यश देणारे राज्य म्हणून पक्षाचे लक्ष तेलंगणकडेच आहे. विधानसभेप्रमाणेच लोकसभेतही येथे जास्त जागा जिंकण्याची आशा पक्षाला आहे. २०१९ मधील निवडणुकीत एकूण १७ जागांपैकी काँग्रेसला तीन जागांवर विजय मिळाला होता. आताच्या निवडणुकीसाठी अद्याप पक्षाने १४ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. ‘बीआरएस’च्या नेत्यांना पक्षाकडे खेचण्यासाठी काँग्रेसने त्यांच्या काही खासदारांना तिकीट दिले आहे.

‘बीआरएस’पुढील अडचणी

  • नेते, आमदार अन्य पक्षांच्या शोधात

  • अनेक मतदारसंघात प्रभावी उमेदवारांची कमतरता

  • अनेक नेत्यांवर फोन टॅपिंगसह भ्रष्टाचाराचे आरोप

  • दिल्लीतील मद्य गैरव्यवहारात के.सी.आर यांची मुलगी के. कविता यांना ‘ईडी’कडून अटक

  • फोन टॅपिंगप्रकरणात आतापर्यंत चार पोलिसांना अटक

भाजपसाठी अनुकूल

  • काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीचा राज्यात प्रभाव नाही

  • काश्‍मीरमधील कलम ३७० रद्द करणे, तोंडी तलाक, अयोध्येतील राममंदिर आणि सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) हेच मुद्दे महत्त्वाचे

  • आदिलाबाद, निजामाबाद, करीमनगर, वरंगळ, मेहबूबनगर, जहिराबाद, सिकंदराबाद आदी शहरांमध्ये भाजपचा झेंडा पुन्हा फडकण्याची शक्यता

  • हैदराबादमध्ये ‘एमआयएम’चे उमेदवार असुदुद्दिन ओवेसी आणि भाजपच्या माधवीलता यांच्यात अटीतटीची लढत असेल

भाजप आणि काँग्रेसमध्येच लढत

तेलंगणमध्ये यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्येच खरी लढत असेल. २०१९ च्या निवडणुकीत एकूण १७ जागांपैकी ‘बीआरएस’ला नऊ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला तीन तर भाजप चार आणि ‘एमआयएम’ला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. यावेळी मात्र हा आकडेवारी बदलण्याची शक्यता असून काँग्रेसला ही निवडणूक लाभदायी ठरेल, असे चित्र आहे. ‘बीआरएस’ला सर्वांत कमी जागा मिळतील, असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. काँग्रेस, ‘बीआरएस’सह राज्यात भाजप हा ताकदीचा पक्ष आहे. केंद्रासह अनेक राज्यांतील सत्ता हाती असलेल्या भाजपसाठी दक्षिणेत कर्नाटकनंतर तेलंगण हे असे राज्य आहे, की जेथून त्यांना जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे.

कविता यांच्या अटकेवर चर्चा नाही

नवी दिल्लीतील मद्य गैरव्यवहारात के.चंद्रशेखर राव, कल्वाकुंटला ऊर्फ के.कविता यांच्यावर आरोप करण्यात आले आहे. कविता यांना अटक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबादच्या दौऱ्यावर आले असताना आणि निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी कविता यांना अटक झाली. याचा दबाव ‘बीआरएस’वर वाढू शकतो, असे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे. के.कविता यांच्या अटकेबद्दल जनतेची मते जाणून घेण्यासाठी ‘बीआरएस’ने सर्वेक्षण केले. पण जनतेकडून सहानुभूती मिळाली नसल्याने यावर चर्चा न करण्याचा अंतर्गत आदेश पक्षाच्या नेत्यांना देण्याची सूचना के.सी.आर यांनी केली असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com