आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची काय चर्चा झाली

rahul-and-aaditya
rahul-and-aaditya

नवी दिल्ली - शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली. या भेटीत राज्यातील तसेच देशभरातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. नुकत्याच झालेल्या विरोधकांच्या बैठकीत काँग्रेसने शिवसेनेला निमंत्रण दिले नसल्याच्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसचे संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

‘रायसिना संवाद’ या कार्यक्रमानिमित्त दिल्लीत आलेल्या मंत्री आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी, राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. या व्यतिरिक्त त्यांनी ज्येष्ठ नेते अहमद पटेल, माजी मंत्री जयराम रमेश यांचीही भेट घेतली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयराम रमेश यांच्यासमवेत पर्यावरण तसेच इकोटुरिझमशी संबंधित योजना, प्रकल्पांवरही आदित्य ठाकरे यांनी चर्चा केली.

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एका बाजूला, तर काँग्रेस दुसऱ्या बाजूला असे चित्र आहे. त्यातच काँग्रेस आणि शिवसेना पक्षांत असलेल्या वैचारिक मतभेदांचे पडसाद उमटले आहेत. अशात, काँग्रेसने सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात बोलावलेल्या बैठकीत शिवसेनेला निमंत्रण टाळल्याच्या बातम्या झळकल्यानंतर दोन्ही पक्षांकडून ‘संवादाचा अभाव’ हे कारण देण्यात आले होते. महाराष्ट्रातील सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा हा दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असूयेचा विषय आहे. या पार्श्‍वभूमीवर आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची आणि काँग्रेसच्या नेत्यांची घेतलेली भेट म्हणजे संवाद वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com