विशेष : संगणक कौशल्य संवर्धन

आजचं युग जागतिकीकरणाचे असून, माहिती तंत्रज्ञानानं क्रांती केलेली आहे. शिक्षणक्षेत्रात मुलांच्या मनावरचा जुन्या प्रक्रियांचा, स्पर्धांचा, उपक्रमांचा, विचारांचा प्रभाव कमी होत आहे.
Computer Skills
Computer SkillsSakal

आजचं युग जागतिकीकरणाचे असून, माहिती तंत्रज्ञानानं क्रांती केलेली आहे. शिक्षणक्षेत्रात मुलांच्या मनावरचा जुन्या प्रक्रियांचा, स्पर्धांचा, उपक्रमांचा, विचारांचा प्रभाव कमी होत आहे. त्यांना नावीन्यपूर्ण, नवनवीन कल्पनांचे कुतूहल वाटत आहे. नवमाध्यमांतील क्रिया-प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांची मानसिकता यांचा मेळ शैक्षणिक संस्थांना साधावा लागेल. आचार्य श्री विजयवल्लभ स्कूल ही अशीच एक संस्था आहे. मुलं शाळेमध्ये आनंदानं आली पाहिजेत, शिकली पाहिजेत आणि टिकलीही पाहिजेत याच विचारप्रवाहातून पारंपरिक व साचेबद्ध वाटांनी न जाता काळानुरुप होणाऱ्या बदलांची गरज ओळखून विजयवल्लभ शैक्षणिक संस्था सर्वांच्या मदतीनं व मार्गदर्शनानं नावीन्यपूर्ण संकल्पना मांडण्यात अग्रेसर आहे.

माहिती तंत्रज्ञानाची चाहूल अभ्यासून १० वर्षांपूर्वीच संस्थेनं विद्यार्थ्यांसाठी एक नावीन्यपूर्ण स्पर्धा सुरू केली, ती म्हणजे संगणक कौशल्य संवर्धन (कॉम्प्यु स्किल चॅम्पियनशिप). यासाठी संगणक क्षेत्रातील महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल), कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय), टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) व रोटरी क्लब ऑफ पुणे यांनी सहकार्य, सहयोग व मार्गदर्शन केले, ते आजही सुरू आहे.

स्पर्धेचं स्वरूप

संगणक कौशल्य संवर्धन ही आंतरशालेय स्पर्धा आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. सदर स्पर्धा स्क्रॅच या प्रोग्रॅमिंग भाषेत घेतली जाते. स्क्रॅच हे सॉफ्टवेअर www.scratch.mit.edu या संकेतस्थळावर निःशुल्क उपलब्ध आहे. माहिती-तंत्रज्ञानामुळं जगभरातलं ज्ञान आता मुक्त आहे, सर्वांसाठी खुलं आहे. तंत्रज्ञानाचा खुबीनं वापर करून ते मुलांपर्यंत पोहोचवणं हे शैक्षणिक संस्थांचं काम आहे. संगणक कौशल्य संवर्धन ही स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात घेतली जाते. प्रत्येक गटात चार ते पाच विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. प्रत्येक गटासाठी तीन विषय दिले जातात. विषय प्रामुख्यानं पुस्तकी ज्ञानापलीकडं जाऊन सामाजिक समस्या, कुतूहल जागृती, तार्किक क्षमता, संस्कृती संवर्धन, देशाची प्रगती, वैयक्तिक आरोग्याचे महत्त्व इत्यादी गोष्टी विचारात घेऊन ठरवले जातात. निवडलेल्या विषयांवर विद्यार्थ्यांनी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून चार ते पाच मिनिटांचा प्रोग्रॅम तयार करणं व तो परीक्षकांसमोर सादर करणं अपेक्षित आहे.

स्पर्धेची तयारी

स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, यू-ट्यूब, मेमरी कार्ड, इंटरनेट, फेसबुक, ट्विटर, विकीपीडिया, सोशल कम्युनिटी साईटस्, गॅजेटस्, अ‍ॅप्लिकेशन्स हे नव्या पिढीचे परवलीचे शब्द झालेले आहेत. दिलेल्या विषयावर पाच मिनिटांचा प्रोगॅम तयार करण्यासाठी सहभागी विद्यार्थी विचार करतात, वेगवेगळ्या वेबसाईटस्ना भेट देऊन विविध व्हिडिओ पाहतात, त्यावर चर्चा करतात व आवश्यक तो व्हिडिओ पेनड्राईव्हवर घेतात. प्रोग्रॅम करताना याचा वापर करतात. प्रोग्रॅम करताना अ‍ॅनिमेटेड पिक्चर्स, रंगीत डेटा, मोबाईलवरील चित्रीकरण यांचाही समावेश केला जातो. अनेक वेबसाईटस्, ब्लॉग्ज, विकीपीडियासारखी शोधसंकेतस्थळे यांचा वापर करताना त्यातला भाग निवडून घ्यावा लागतो. नको तो मजकूर काढावा लागतो. घेतलेला मजकूर विश्वासार्ह आहे का याची पडताळणी करावी लागते आणि शेवटी याची भाषा, काठिण्यपातळी, रंजकता याचा विचार करून अंतिम प्रोग्रॅम तयार करावा लागतो. यासाठी उत्तम नियोजन, तपशीलवार नोंदी, पृथःकरण कार्यपद्धती निश्चित केली तरच संगणकावर आपण उत्तम पद्धतीने दाखवू शकतो, याचा विद्यार्थ्यांना विचार करावा लागतो. यातच त्यांचं नकळत माहिती-तंत्रज्ञानाचं शिक्षण घडतं.

महत्त्व संगणक कौशल्य संवर्धनाचं

खडू-फळा विरहित रंजक अध्ययनामुळं विद्यार्थ्यांचा आनंद वाढतो. विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक प्रगल्भता वाढीस लागते. माहिती-तंत्रज्ञानाच्या वापरामुळं अप्रत्यक्षपणे गुणवत्तावाढीस मदत होते. विशिष्ट विषयावर कल्पकता लावून, विचार करुन प्रोग्रॅम तयार करताना विद्यार्थ्यांचं कुतूहल जागृत होतं. चैतन्यदायी वातावरण निर्माण होऊन शिक्षणातील कंटाळा नाहीसा होतो. इंटरनेटमुळं मुलांना जगाची ओळख होते. आपण केलेला प्रोग्रॅम स्टेजवरुन सादर करण्यामुळं विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. सभाधीटपणा जोपासला जातो व नवनवीन गोष्टींचं ज्ञान प्राप्त होतं. संगणक कौशल्य संवर्धन उपक्रमाचा मुख्य उद्देश स्पर्धा नसून मुलांना संगणक वापरासाठी प्रेरित करणं, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करणं, प्रभावी संवादकौशल्ये निर्माण करणं हा आहे. विजयवल्लभ शाळेची ही संकल्पना अजूनही पुढं विकसित व्हावी अशी अपेक्षा आहे. स्वतःच्या कल्पनांची भर टाकून संपूर्ण महाराष्ट्रानं अशा स्वरुपाच्या स्पर्धांचं एक जाळंच निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये माहिती-तंत्रज्ञानाची, संगणक शिक्षणाची आवड निर्माण करणं हीच काळाची खरी गरज आहे.

स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरू झाली असून, नाव नोंदणीची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०२१ आहे.

स्पर्धेत प्रवेश निश्चित करण्यासाठी पुढील लिंकवरील गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे.

लहान गट : गुगल फॉर्म लिंक https://forms.gle/hPEaYKT1qmGXioGr5

मोठा गट : गुगल फॉर्म लिंक - https://forms.gle/NHLqW83FZLYNHr2h9

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com