
आपण जेव्हा एखाद्या नोकरीकरिता अर्ज पाठवितो, तेव्हा संपूर्ण बायोडेटा जोडलेला असतो. त्यात आपले शिक्षण, अनुभव; तसेच छंद या सर्वांचा उल्लेख केलेला असतो.
मानससूत्र : तंत्रं मुलाखतीची
- डॉ. जयश्री फडणवीस
आपण जेव्हा एखाद्या नोकरीकरिता अर्ज पाठवितो, तेव्हा संपूर्ण बायोडेटा जोडलेला असतो. त्यात आपले शिक्षण, अनुभव; तसेच छंद या सर्वांचा उल्लेख केलेला असतो. त्या सगळ्याचे नीट परीक्षण केल्यानंतरच आपल्याला मुलाखतीसाठी बोलाविले जाते, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच विचारलेल्या प्रश्नाचे थोडक्यात; पण अचूक उत्तर देणे महत्त्वाचे. तुमचा बायोडेटा माहीत असल्याने मुलाखतीत नेमके काय बघतात, तर तो तुमचा आत्मविश्वास, संवादकौशल्य, संघ सहकार्य; तसेच तुमचा स्वभाव, देहबोली या सर्वांचा अंदाज घेतला जातो.
या मुलाखत घेणाऱ्यांकडे काही प्रश्नसंच तयार असतात; पण पहिल्या १५-२० मुलाखतीत ते संपू लागतात. तसेव मुलाखत देऊन बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला बाहेरील उमेदवार लगेच विचारतात... ‘काय काय विचारलं तुम्हाला?’ सर्वांनाच काही प्रश्न सारखेच विचारले जातात. उदाहरणार्थ,
स्वतःची थोडक्यात ओळख करून द्या!
आपण या नोकरीकरिता का अर्ज भरलात?
आम्ही तुमची निवड या पदासाठी का करावी?
प्रश्न कितीही तेच ते वाटले, तरीही एक लक्षात घेणे आवश्यक आहे, की आपण दिलेल्या उत्तरातूनच पुढील मुलाखतीचा प्रशोत्तरांचा ओघ सुरू होतो. वरील तीनही प्रश्नांच्या उत्तरांची उत्तम तयारी, गृहपाठ करून गेल्यास आपल्या आत्मविश्वासात प्रचंड भर पडेल. कंपनी नेमकी कशाची आहे, कोणत्या पातळीवर काम करते आहे (शहर, राज्य, राष्ट्र की आंतरराष्ट्रीय), त्यानुसार उमेदवाराकडून काय अपेक्षा असतील याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. एक गोष्ट बोलताना कायम लक्षात ठेवायला हवी, की समोरील मुलाखत मंडळ हे अतिशय हुशार; तसेच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यामुळे वायफळ बडबड टाळावी.
‘तुमची निवड का करावी?’ या प्रश्नाचे उत्तर देताना तुम्हाला, तुम्ही केलल्या गृहपाठाची मदत होईल. उदाहरणार्थ, ‘आत्ता ज्या पदासाठी मी आपल्या कंपनीत अर्ज केलेला आहे, त्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यक्षमता माझ्यात आहे असे मला वाटते. लेखा विभागास (Accounts) लागणारी पर्याप्त क्षमता (Aptitude), सत्यनिष्ठा (Integrity), तटस्थ राहून निर्णय घेण्याची क्षमता आणि संयम या सर्व गुणांचा उत्तम उपयोग मी निश्चितच कंपनीच्या भल्यासाठी आणि माझ्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी करीन.’
हे ऐकताच पुढील प्रश्न येईल, की ‘तुमची बलस्थाने तथा तुमच्यातील न्यूनता सांगा.!’ बलस्थाने सांगताना कौतुकांचा (स्व) अतिरेक करू नका. खरेखोटे कळण्याइतपत interview board नक्कीच हुशार असतो. न्यूनतांची चर्चा करताना स्वतःला खूपच खालच्या पातळीवर ढकलू नका. आत्मसन्मान सांभाळा. प्रामाणिकपणा नेहमीच भावतो. एखादा प्रश्न नीट समजला नाही, तर पुन्हा विचारा, बोलताना स्वतःतील संवादकौशल्य व सृजनतेचा वापर करा.
उदाहरणार्थ, ‘एखादा निर्णय अथवा एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी मी बुद्धिप्रामाण्यवादी (assertive), तत्त्व (Logic) आणि शास्त्र (Science) या तिन्ही गोष्टींनी पडताळून पाहतो. माझे Planning उत्तम असल्याने वेळेच्या आत काम पूर्ण करतो. फुटबॉलसारखा team game खेळत असल्याने team management उत्तम जमते.’
न्यूनतांची चर्चा करताना ज्यातून तुम्ही स्वत:ची सुधारणा करू शकता व इतर कोणाला त्रास होत नाही अशा गोष्टी सांगा. उदाहरणार्थ, ‘मी Workoholic आहे, व्यवसायास उत्तम; पण अनेकदा मानसिक; तसेच शारीरिक संतुलन बिघडते.’ किंवा ‘माझे माझ्या आहारावर नियंत्रण राहत नाही. गोड खूप आवडते.’
तर, मित्र-मैत्रिणींनो स्वतःचे S&W सांगताना अशा पद्धतीचे सांगा, की त्यातून येणाऱ्या उपप्रश्नांची उत्तरे तुमच्या मनात तयार असतील. चक्क ५ Strengths आणि ५ weaknessची तयारी करून ठेवा. तुम्हाला स्वतःच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे जाणवेल. चला तर मग! लागा मुलाखतीच्या तयारीला. Wish you all the best for all types of interviews in your life.