न्यू नॉर्मल : भारतीय रेल्वे : दळणवळणाचे प्रमुख साधन

कोळशावर चालणारी रेल्वे, काळा धूर ओतणारी! हात बाहेर काढला तर कोळशाचे कण जमा व्हायचे. तो वास, आवाज, ती गती आता मागे पडली. जवळजवळ कालबाह्यच झाली आहे.
Indian Railway
Indian RailwaySakal
Summary

कोळशावर चालणारी रेल्वे, काळा धूर ओतणारी! हात बाहेर काढला तर कोळशाचे कण जमा व्हायचे. तो वास, आवाज, ती गती आता मागे पडली. जवळजवळ कालबाह्यच झाली आहे.

‘झुक झुक झुक झुक आगीन गाडी , धुरांच्या रेषा हवेत सोडी’’ हे गाणं आणि ६ मार्चला सुरू झालेली डौलदार स्मार्ट पुणे मेट्रो. रेल्वे किती बदलली. डेक्कन क्वीनला ९२ वर्ष पूर्ण झाली आहेत. पुणे-मुंबई अप डाउन करणाऱ्यांच्या जगण्याचा अविभाज्य घटक!

कोळशावर चालणारी रेल्वे, काळा धूर ओतणारी! हात बाहेर काढला तर कोळशाचे कण जमा व्हायचे. तो वास, आवाज, ती गती आता मागे पडली. जवळजवळ कालबाह्यच झाली आहे. जमशेदजी जीजी भॉय हे भारतीय रेल्वेचे प्रणेते होते. त्यांच्याबरोबर जगन्नाथ शंकरशेठ यांचा ही मोठा वाटा आहे. भारतात पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे हे ३४ किमीचे अंतर ४०० प्रवासी घेऊन धावली. ती हळूहळू जाणारी रेलगाडी ते आजच्या तुफान वेगाच्या, देशाच्या चारही दिशांना आणि सीमांना जोडणाऱ्या एक्स्प्रेस हा रेल्वेचा पसारा आश्चर्यचकित करणारा आहे. जवळ जवळ दोन शतकांच्या कालावधीत या स्वायत्त संस्थेचं रूप बदलत गेलं आणि देशभर रेल्वेचं जाळ तयार झालं.

जगात चौथ्या क्रमांकावर असलेली भारतीय रेल्वे ही सर्वांत मोठी, अत्यंत गुंतागुंतीची म्हणून प्रसिद्ध आहे. उत्तर, मध्य, दक्षिण असे विभागलेले रेल्वे मार्ग, मार्ग बदलण्यासाठी सुनिश्चित जंक्शन, तासांच्या अचूक मांडणीत बांधलेले रेल्वेचे वेळापत्रक हे सगळं अल्गोरिदम म्हणजे पट्टीच्या गणिती-तज्ज्ञाला किंवा सुपर कॉम्प्युटरला देखील न सुटणार कोड आहे.

भारतीय रेल्वेवर लिहिलेली पहिली शैक्षणिक केस स्टडी प्रसिद्ध झाली त्यावेळेस लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री होते. मधू दंडवते हे रेल्वेतून सर्वाधिक प्रवास करणारे रेल्वेमंत्री होते. माणसांचे प्रश्न जाणून घेणारे, फलाटापासून-इंजिनापर्यंत माहिती असणारे मंत्री म्हणून त्यांना ओळखलं जात. राम नाईक यांनीही दीर्घकाळ रेल्वे खात्याचा धुरा सांभाळली. अलीकडच्या काळातील अत्यंत हुशार रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, पीयूष गोयल त्यांच्या डोक्यात रेल्वेची धड-धड अविरत सुरू असली पाहिजे. प्रवाशांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि ते त्वरित सोडवण्यासाठी ट्विटरचा वापर हा नवा प्रयोग करणारे आणि रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणारे अलीकडच्या काळातील एकमेव रेल्व मंत्री ही सुरेश प्रभुंची ओळख. करोना काळातल्या किसान एक्स्प्रेस ही पीयूष गोयलांची ओळख.

प्रत्येक कालखंडात बदल झाले, प्रगती झाली. रेल्वेने गेल्या दहा वर्षांत वेगाने कात टाकली. आताच्या काळातील सरकारने दळणवळणाचे हे साधन अधिक सक्षम भरभक्कम केले.

भारतीय रेल्वे ही भारतीय सरकारच्या विशेष संविधानिक कायद्याने स्थापित केलेली संस्था आहे. अनेक भारतीयांच्या दैनंदिन प्रवासाचा भाग असलेली रेल्वे ही भारताची आर्थिक जीवनरेखा मानली जाते. प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी सर्वांत कार्यक्षम आणि प्रत्येकाला परवडणाऱ्या वाहतुकीच्या पद्धतींपैकी रेल्वे एक आहे. मालवाहतुकीमध्ये कोळसा, धातू-खनिज, पेट्रोलियम, रासायनिक खत आणि अन्नधान्य यासारखा वस्तूंच्या वाहतुकीत रेल्वेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अगदी ऑटोमोबाईल उद्योग देखील प्राधान्यवाहक म्हणून भारतीय रेल्वेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.

प्रमुख राष्ट्रीय मालमत्ता असलेली भारतीय रेल्वे सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी तेवढीच सक्षम यंत्रणा काम करते. रेल्वे नेटवर्क ६७,९५६ किमीमध्ये पसरले आहे. भारतीय रेल्वेच्या व्यवस्थापनांतर्गत ७,३४९ स्थानक, १३,१६९ प्रवासी गाड्या आणि ८,४७९ मालवाहू गाड्यांचा समावेश आहे. जून २०२१ अखेरीस भारतीय रेल्वेचा एकूण महसूल ३९,६५५.२५ कोटी रुपये, तर मालवाहतूक उत्पन्न ३३,२४१.७५ कोटी रुपये होते जे एकूण महसुलाच्या ८४ टक्के होते. प्रवासी विभागाची कमाई ४,९२१.११ कोटी रुपये एवढी होती.

रेल्वे उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारनेही महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर मास्टर प्लॅन (गती शक्ती) भारताच्या सर्वांगीण विकासाला मदत करेल. ‘विभागीय मंत्रालय केंद्रित’ स्वतंत्र कार्यपद्धती मोदी सरकारने दूर केली. मंत्रालयांमध्ये, परवानग्या देण्यामध्ये समन्वय संवाद व सुसूत्रता आणली, म्हणूनच पायाभूत सुविधांचा रोडमॅप जलद आणि कार्यक्षमतेने पूर्ण होताना दिसत आहे. गती शक्ती योजने मुळे २०२४ -२५ पर्यंत रेल्वेची मालवाहतूक क्षमता १६०० मेट्रिक टन एवढी वाढणे अपेक्षित आहे. मेट्रोच्या कामांनाही वेग आला आहे आणि येत्या काही वर्षात भारत एक अव्वल दर्जाचे मल्टी-मॉडेल ट्रान्स्पोर्ट हब होताना दिसेल. या प्रयत्नांमुळे भारताच्या आर्थिक समृद्धीचा वेग नक्कीच वाढणार आहे. अर्थात यात असंख्य अडचणी आणि आव्हाने आहेतच. विकास करताना पर्यावरणाचा समतोल साधणे हे सगळ्यात मोठे आव्हान. भारतीय रेल्वे मंत्रालय हळूहळू बदलत या आव्हानांना कसे सामोरे जात आहे ते पाहू या पुढच्या लेखात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com