
इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली; ३१ जुलैला होणार परीक्षा
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी आणि आठवीची येत्या बुधवारी (ता.२०) होणारी शिष्यवृत्ती परीक्षा अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरसदृश स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या हित लक्षात घेऊन पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलै ऐवजी येत्या ३१ जुलै रोजी होणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे. सद्यःस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश स्थिती उद्भवली आहे.
तसेच बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी आणि विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ३१ जुलै या एकाच दिवशी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील ४८ हजार ८० शाळांमधील सात लाख २१ हजार ५९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिली आहेत. इयत्ता पाचवीच्या (पूर्व उच्च प्राथमिक) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी चार लाख १७ हजार ८९४ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तीन लाख तीन हजार ६९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील एकूण पाच हजार ७०७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
शिष्यवृत्तीसाठी नोंदणी झालेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांची आकडेवारी
- एकूण नोंदणी केलेल्या शाळा : ४८,०८०
- इयत्ता पाचवीचे विद्यार्थी : ४,१७,८९४
- इयत्ता आठवीचे विद्यार्थी : ३,०३,६९७
- एकूण विद्यार्थी : ७,२१,५९१
- परीक्षा केंद्रांची संख्या : ५,७०७
Web Title: Education News Class V And Viii Scholarship Exam Postponed To Be Held On 31st July Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..