

Dr. Milind Naik discusses the concept and importance of integrated education in the ‘Shikshan Chintan’ column.
Sakal
डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
‘‘आज गणिताचा तास, त्यानंतर विज्ञान, मग इतिहास आणि दुपारी भूगोल’’... शाळेतील एका नेहमीच्या दिवसाचे हे चित्र. ज्ञानाच्या सोयीसाठी आपण विविध विषय निर्माण केले आणि प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक, शिक्षक, तासिका आणि परीक्षा तयार केल्या. ही व्यवस्था ज्ञानाचे वर्गीकरण करण्यासाठी उपयुक्त ठरली; परंतु हळूहळू या विषयांच्या भिंती विद्यार्थ्यांच्या विचारांच्या भिंती झाल्या. आजचा विद्यार्थी गणित शिकतो, विज्ञान शिकतो, इतिहास शिकतो, भूगोल शिकतो; परंतु हे सर्व वापरून प्रश्न सोडविणारी कर्ती बुद्धिमत्ता आणि कौशल्ये त्याच्याकडे निर्माण होत नाही. कारण ज्ञान एकमेकांशी कसे जोडलेले आहे, हे त्याला लक्षात आणून देणारी व्यवस्थाच आज शिक्षणात अतिशय कमी आहे. यातूनच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, आपण विद्यार्थ्यांना ज्ञान देत आहोत की ज्ञानाचे तुकडे देत आहोत?