Education News : आधुनिक शिक्षण व्यवस्थेमुळे कुशलतेकडून अकुशलतेकडे वाटचाल ; गिरीश प्रभुणे

मतिन भोसले यांना निर्मला कार्यगौरव पुरस्कार प्रदान
Girish Prabhune statement Movement from skill to unskill due to modern education system
Girish Prabhune statement Movement from skill to unskill due to modern education systemSakal

पुणे : देशातील आदिवास्यांकडे शेती, वनस्पती, उत्खनन अशा विविध प्रकारचे ज्ञान असून वेगवेगळे कला-कौशल्य आहेत. मात्र आदिवासी मुलांना शिक्षण मिळत नाही. देशात नावाजलेल्या शिक्षण संस्था, विद्यापीठे असताना ही हा घटक शिक्षणापासून वंचित आहे.

सध्याची शिक्षण प्रणाली पाहता, आपली वाटचाल कुशलतेकडून अकुशलतेकडे होत आहे. असे मत पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे संचालक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. वनस्थळी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने कै. निर्मला पुरंदरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा निर्मला कार्यगौरव पुरस्कार यंदा प्रश्नचिन्ह निवासी आश्रम शाळेचे संचालक मतीन भोसले यांना प्रभुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी वनस्थळीच्या विश्र्वस्त मीना पवार आणि माणिक कोतवाल उपस्थित होते. प्रभुणे म्हणाले ‘‘जागाच्या वाटचालीमध्ये संशोधन क्षेत्रात भर घालण्यासाठी आधुनिक शिक्षण प्रणालीत बदल आवश्‍यक आहे.

पारंपारिक शिक्षणाचा अभ्यासक्रम आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा होत असताना मात्र आदिवासी समाजातील लोकांना अद्याप म्हणावे तसे स्वातंत्र्य मिळाले नाही. समाजातील हा घटक आजही वैद्यकीय सेवांपासून वंचित आणि शिक्षणापासून दूर आहे.

शिक्षणापासून वंचित असलेल्या या समाजातील लोकांना शैक्षणिक प्रवाहात सामील करून घेणे ही आपली जबाबदारी आहे. समाजात मतिन भोसले सारखी सामाजिक दायित्व निभावारी व्यक्तिमत्त्व निर्माण होणे गरजेचे आहे. शिक्षण हे जगण्याचे साधन निर्माण करते त्यामुळे व्यावसायिक शिक्षण व्यवस्थेत फासेपारधी समाजातील मुले सक्रिय होणे गरजेचे आहे.’’

क्रांतिकारक समाज महिलांचे संरक्षण करणारा फासेपारधी समाज हा मुख्य प्रवाहातून दुर्लक्षित राहिल्यामुळे आज देशोधडीला लागला आहे. समाजात त्यांच्याकडे गुन्हेगार याच नजरेने पाहिले जाते. फासेपारध्यांना सामाजिक घटक म्हणून समाज प्रवाह आणण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. असेही त्यांनी नमूद केले.

मनोगत व्यक्त करताना मतीन भोसले म्हणाले, ‘‘पोटाची भूक माणसाचं आयुष्य अधिक समृद्ध करते. फासेपारधी समाजामध्ये जन्माला आलो असल्याने जगण्याचा संघर्ष सुरवातीपासूनच अनुभवत आलो आहे.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्षातून अनुभव येत गेले. शिक्षणाची पाऊल धरली आणि आयुष्याचे परिवर्तन झाले. स्वतःबरोबर समाजातील इतरांचे परिवर्तन करण्याचा विचार स्वस्थ बसू देत नसल्याने आदिवासी मुलांसाठी उज्ज्वल भविष्याचे उत्तर शोधण्यासाठी शाळेची स्थापना केली.’’

वनस्थळी संस्था गेली चार दशकांहून अधिक काळ ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. बिकट परिस्थितीमध्ये जीवनातील संघर्षाला सामोरे जाण्याची ताकद वनस्थळीतील प्रत्येक महिलांमध्ये आहे याचा विशेष आनंद होतो. अशी भावना कोतवाल यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती भिडे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com