नवोदय विद्यालयासाठी जाणून घ्या प्रवेशप्रक्रिया

राज्यातील नवोदय विद्यालयांमधील प्रवेशासाठीच्या निवड चाचणी परीक्षेसाठी यंदा ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी आतापर्यंत ऑफलाइन अर्ज करावे लागत असत.
Jawahar Navodaya Vidyalaya
Jawahar Navodaya VidyalayaSakal

राज्यातील नवोदय विद्यालयांमधील प्रवेशासाठीच्या निवड चाचणी परीक्षेसाठी यंदा ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी आतापर्यंत ऑफलाइन अर्ज करावे लागत असत. पुढच्या शैक्षणिक वर्षात (२०२२-२३) इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी ही निवड चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेला बसण्यासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

प्रश्‍न - नवोदय विद्यालयात कोणत्या वर्गात प्रवेश घेता येतो?

राज्यातील नवोदय विद्यालयांमध्ये फक्त सहावीच्या वर्गात प्रवेश घेता येतो. यासाठी इयत्ता पाचवीच्या वर्गात असतानात यासाठीच्या निवड चाचणी परीक्षेला बसावे लागते. या परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणानुक्रमानुसार हे प्रवेश दिले जातात.

या निवड चाचणी परीक्षेसाठीचे अर्ज केव्हापासून करता येणार आहेत?

या विद्यालयांमधील २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठीच्या निवड चाचणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास २३ सप्टेंबरपासून सुरवात झाली आहे. इच्छुकांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

नवोदय विद्यालयांचे शिक्षण मंडळ (बोर्ड) कोणते असते?

१९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवोदय विद्यालयांची स्थापना केलेली आहे. यानुसार केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय नवोदय विद्यालय समिती स्थापन केलेली आहे. या स्वायत्त यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यांत मुलां-मुलींसाठी निवासी जवाहर नवोदय विद्यालये सुरू केली आहेत. या विद्यालयांमधील विद्यार्थांना दहावी व बारावी परीक्षेसाठी केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई बोर्ड) असते.

या विद्यालयांतील शिक्षणाचे माध्यम काय असते?

इयत्ता आठवीपर्यंत मातृभाषा किंवा क्षेत्रीय स्तरावरील भाषेतून हे शिक्षण दिले जाते. त्यानंतर गणित व इंग्रजी हे दोन विषय इंग्रजी भाषेतून आणि सामाजिकशास्त्र हे हिंदी भाषेतून शिकविण्यात येते.

जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशाचा विद्यार्थ्यांना नेमका फायदा काय?

या विद्यालयात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण मोफत पूर्ण होते. या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत भोजन, निवास, गणवेश आणि वह्या-पुस्तके मोफत पुरविली जातात. मात्र, नववीपासून पुढे दरमहा प्रत्येकी ६०० रुपये एवढे नाममात्र शुल्क विद्यालय विकास निधी म्हणून आकारले जाते. या नाममात्र शुल्कातून सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील विद्यार्थांना वगळले आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या पालकांकडून दरमहा प्रति विद्यार्थी दीड हजार रुपये विद्यालय विकास निधी शुल्क घेतले जाते.

या विद्यालयातील प्रवेशासाठी निवड कशी केली जाते?

या विद्यालयातील प्रवेशासाठी निवड चाचणी (लेखी परीक्षा) घेतली जाते. ही चाचणी १०१ गुणांची असते. या चाचणीत बुद्धिमापन, गणितीय आणि भाषेचे ज्ञान यावर आधारित १०० गुणांसाठी ८० प्रश्‍न विचारले जातात. यातील सर्व प्रश्‍न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी दोन तासांचा वेळ दिला जातो. या चाचणीतील गुणांच्या आधारे गुणानुक्रम आणि आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो.

जिल्हानिहाय किती जागा आणि त्यांचे आरक्षण कसे असते?

प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी एक जवाहर नवोदय विद्यालय आहे. या प्रत्येक विद्यालयात प्रत्येकी ८० जागा असतात. एकूण जागांपैकी ७५ टक्के जागा या ग्रामीण भागातील आणि २५ टक्के जागा या शहरी भागातील विद्यार्थांसाठी राखीव आहेत. एकूण जागांपैकी मुलींसाठी एक तृतीयांश, ओबीसीसाठी २७ टक्के, दिव्यांगांना सरकारी नियमानुसार आणि अनुसूचित जातीसाठी कमाल ११ टक्के आणि जमातीसाठी कमाल साडेसात टक्के जागा राखीव असतील.

पुढच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठीची निवड चाचणी परीक्षा कधी होणार आहे?

आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठीची निवड चाचणी परीक्षा पुढच्या वर्षी शनिवार ३० एप्रिल २०२२ ला होणार आहे. राज्यातील सर्व जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी एकाच दिवशी ही निवड चाचणी होणार आहे.

या निवड चाचणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

जवाहर नवोदय विद्यालय समितीच्या www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ॲडमिशन (प्रवेश) हा पर्याय निवडावा. त्यानंतर या पर्यायाच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करावा.

निवड चाचणीसाठी पात्रता निकष

इच्छुक विद्यार्थ्यांना केवळ स्वजिल्ह्यातील नवोदय विद्यालयासाठी अर्ज करता येईल

प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म १ मे २००९ पूर्वी आणि ३० एप्रिल २०१३ नंतर झालेला नसावा

तो २०२१-२२ या वर्षात स्वजिल्ह्यातील कोणत्याही शाळेत इयत्ता पाचवीत असावा

ग्रामीण जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांची तिसरी, चौथी व पाचवी ग्रामीण शाळेतून पूर्ण झालेली असावी

इच्छुक विद्यार्थ्यांने १५ सप्टेंबर २०२१ पूर्वी पाचवीच्या वर्गात प्रवेश घेतलेला असणे बंधनकारक

शहरी भागातील प्रवेशासाठी इयत्ता तिसरी, चौथी व पाचवीत किमान एक दिवस तरी शहरी शाळेतून शिक्षण घेतलेले असावे

तृतीयपंथी उमेदवारांसाठी स्वतंत्र आरक्षण उपलब्ध नाही

तृतीयपंथी विद्यार्थ्यांना मुलांच्या गटातून अर्ज करता येईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com