
पालकांनी मुलाचा कल पाहून त्याप्रमाणे त्यांनी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. पालकांचे विचार, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांचे वागणे हे मुलांच्या बुद्धिमत्तेत विकास घडवून आणण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. त्यांनी शाळेतील गुणांबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांना बसवून आपल्या मुलाची गुणवत्ता तपासावी. शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या थोडय़ा-थोडय़ाशा विषयात त्यांना न अडकवता, स्पर्धा परीक्षांना प्राधान्य द्यावे.
अकोला: परीक्षा आणि विद्यार्थी यांना आता वेगळे करता येणार नाही. त्यातही स्पर्धा परीक्षांना आता अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. मागील तीस ते चाळीस वर्षांपासून या दोघांमधील संबंध दृढ होत चालले आहेत.
यासाठी पालकांची भूमीकाही तेवढीच महत्वाची आहे. पालकांनी मुलाचा कल पाहून त्याप्रमाणे त्यांनी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. पालकांचे विचार, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांचे वागणे हे मुलांच्या बुद्धिमत्तेत विकास घडवून आणण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. त्यांनी शाळेतील गुणांबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांना बसवून आपल्या मुलाची गुणवत्ता तपासावी. शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या थोडय़ा-थोडय़ाशा विषयात त्यांना न अडकवता, स्पर्धा परीक्षांना प्राधान्य द्यावे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांना कालपर्यंत टाळणारेच ‘स्पर्धा परीक्षांशिवाय पर्याय नाही’ हे म्हणताना सर्रास आढळतात. तीस ते चाळीस वर्षांपूर्वीचा काळ आणि आताचा काळ यात बराच फरक पडत चाललेला आहे.
चौथीपासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी
उत्तम करिअर, चांगली नोकरी, पदव्युत्तर चांगला अभ्यासक्रम, मानसन्मान, प्रतिष्ठा, पारितोषिके, बक्षिसे इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्राप्त होते. प्राथमिक शालेय शिक्षणापासून ते उच्च पदाच्या नोकरीची निवड करण्यापर्यंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागते. १९८०-८१ पासून महाराष्ट्र शासनाने इयत्ता चौथीपासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास भाग पाडलेले आहे.
आता तर काही खासगी संस्थांनी अगदी तिसऱ्या इयत्तेपासूनच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्पर्धा तीव्र होत चालली आहे तरीसुद्धा ही स्पर्धा निकोप राहावी असेच सर्वाचेच म्हणणे आहे.
या आहेत परीक्षा
चौथी व सातवी स्कॉलरशिप, गणित-संबोध, प्रावीण्य व प्रज्ञा, डॉ. होमी भाभा परीक्षा, सी. व्ही. रामन परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा या शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा तसेच इंजिनीअरिंग, वैद्यकीय, आयआयटी, मॅनेजमेंट क्षेत्रातील पदवीसाठी प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्याव्याच लागतात.
भविष्यातील करिअरच्या अमाप संधी
रेल्वे, बँक, विमा कंपन्या, प्रॉव्हिडंट फंड, केंद्र व राज्य सरकारातील नोकरी, महानगरपालिकेची नोकरी, काही खासगी कंपन्यांतील नोकरी या सर्व नोकऱ्यांसाठी परीक्षा घेतल्या जातात आणि आता तर अगदी चतुर्थ श्रेणीतील पदासाठी ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते. त्यामुळेच स्पर्धा परीक्षांचे आज फार महत्त्व वाढले आहे आणि त्यामुळेच स्पर्धा परीक्षेचे तंत्र जे प्राप्त करतील अशा विद्यार्थ्यांना आपले करीअर उत्कृष्ट करून जीवनमान उंचावता येणार आहे.
येथे सुटतात करीअरचे प्रश्न
बऱ्याचदा पदवी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत सरकारी नोकरी मिळते कशी? त्यासाठी पात्रता कोणती असते? अर्ज कोठे मिळतात? नोकरी मिळण्यासाठी वेगळा कोर्स करावा लागतो का? परीक्षा असेल तर त्यासाठी अभ्यासक्रम कोणता असतो? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना उमेदीच्या काळात सतावतात आणि पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ओढा असतो तो पैसे मिळविण्याकडे. म्हणजे लगेच नोकरी मिळविण्याकडे. त्यासाठी ते स्पर्धा परीक्षांची वाटदेखील पाहायला तयार नसतात आणि यामुळेच हुशार असणारे विद्यार्थीही उत्तम नोकरी मिळविण्यापासून वंचित राहतात. स्पर्धा परीक्षांचे हे जग असे वेगळेच आहे. काहींना अगदी पहिल्या प्रयत्नात यश मिळते तर काहींसाठी सरकारी नोकरी हे स्वप्नच राहते.
गैरसमज टाळणे गरजेचे
स्पर्धा परीक्षांची सर्व माहिती मिळवल्यानंतरही परिपूर्ण म्हणजेच यश मिळविता येईल असा अभ्यास सर्वजण करतातच असे नाही. उमेदवारांचा समज असा झालेला असतो की आता पदवी परीक्षेपर्यंत अभ्यास केलेला आहे तर आता परत अभ्यासाची गरज काय? या संभ्रमातच अपयशाचे धनी होतात व त्या दरम्यान कोणत्यातरी खासगी क्षेत्रात करिअरला म्हणजेच नोकरीला सुरुवात करतात व त्या ठिकाणी नोकरी करताकरता रविवारी वेळ आहे म्हणून परीक्षा द्यायची इतके माहीत असते. बरं हीच मुले पुढे असे सांगताना आढळतात की, बऱ्याच परीक्षा दिल्या परंतु काही उपयोग नाही आणि या मुलांमुळेदेखील स्पर्धा परीक्षांबाबत गैरसमज पसरतात.
संगणक ज्ञान तर हवेच
आता कोणत्याही क्षेत्रात संगणक शिक्षणाला पर्याय नाही. आता परीक्षेचे अर्जदेखील ऑन-लाइन भरायचे असतात. संगणकाबाबत ज्ञान नसेल तर अर्जदेखील भरता येणार नाही. तसेच भविष्यात परीक्षादेखील ऑन-लाइन होतील. म्हणूनच आता ज्याला संगणक येत नाही अशा व्यक्तींना अशिक्षित म्हणावे लागेल, अशी पाळी येऊन ठेपली आहे. अर्ज ऑनलाइन भरताना इंटरनेटचे ज्ञानदेखील आवश्यक आहे. त्याचबरोबर जवळपास सर्व कार्यालये (मग ती खासगी असोत वा शासकीय) ही संगणकीकृत झाली आहे. बँकिंग क्षेत्रात तर संगणक ज्ञानामुळे अमूलाग्र बदल झालेला आहे आणि हळुहळू सर्वच क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जलद गतीने होत आहे तसेच होणार नाही तर मग या प्रवाहाविरुद्ध जाऊन कसे चालेल? नवीन ज्ञान अद्ययावत करणार नाही ते मागे पडतील म्हणून सर्व क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी संगणक ज्ञान घ्यायला हवे. ते रोज बदलत आहे म्हणून आपण ही प्रगती साधण्यासाठी काळाबरोबर बदलायला हवे.
नोकरीच्या शोधणाऱ्या उमेदवारांसाठी टिप्स
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी स्पर्धा परीक्षेशिवाय नोकरी मिळविणे शक्य नाही हे ओळखून त्या दृष्टीने मार्गक्रमण करायला हवे. अर्ज कोठे मिळतात? कोणत्या पदासाठी कोणत्या शासकीय मंडळातर्फे परीक्षा होतात? या परीक्षांना पास होण्यासाठी कोणत्याही प्रलोभनांचा विचार करायला नको? परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता असतो? पुस्तके कोणती वापरावीत? ती पुस्तके कोठे मिळतील? यापूर्वी कोणी या परीक्षेत बसून उत्तीर्ण झाले आहेत का? त्यांनी कसा अभ्यास केला होता? या तसेच आपणास भेडसावणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे निराकरण करून घ्यायला हवे आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे एकदा मिळविली की त्यायोगे मार्गक्रमण करून यशाच्या दिशेने पाऊलं टाकायला हवीत.
या आहे विविध शालेय परीक्षा
अ. क्र. |
परीक्षेचे नाव |
पात्रता लाभार्थी विद्यार्थी |
आवेदनपत्र भरण्याचा कालावधी |
परीक्षेचा कालावधी महिना |
१ |
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना www.mscepune.in |
महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य शाळेत इ. ४थी मधील विहित वयोगटातील विद्यार्थी |
ऑगस्ट |
फेब्रुवारी / मार्च |
२ |
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा www.mscepune.in |
ई . ७ वी |
ऑगस्ट |
फेब्रुवारी / मार्च |
३ |
शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा www.mscepune.in |
म. रा . ग्रामीण भागातील इ. ४ थी मधील फक्त मुले |
ऑगस्ट |
फेब्रुवारी / मार्च |
४ |
आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा www.mscepune.in |
आदिवासी क्षेत्रातील रहिवासी असणारे अनुसूचित जमातीचे इ. ४थी मधील फक्त मुले |
ऑगस्ट |
फेब्रुवारी / मार्च |
५ |
विमुक्त जाती व अ. जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा |
आश्रमशाळेतील इ. ४थी मधील विद्यार्थी |
ऑगस्ट |
फेब्रुवारी / मार्च |
६ |
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा www.navodaya.nic.in |
इ . ५ वी |
सप्टेबर |
फेब्रुवारी |
७ |
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा www.navodaya.nic.in |
इ. ८ वी |
सप्टेबर |
फेब्रुवारी |
८ |
सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा (सातारा ) www.sainik.satara.org |
इ. ५ वी फक्त मुले |
ऑक्टोबर |
फेब्रुवारी / मार्च |
९ |
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज , डेहराडून www.irmc.org |
इ. ७ वी / इ. ८ वी फक्त मुले |
जून |
जून/डिसेम्बर |
१० |
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा |
इ. ८ वीत शिकत असलेला व पालकांचे उत्पन्न रु. १,५०,००० /- |
सप्टेबर |
नोव्हेंबर ३ रा रविवार |
११ |
श्री शिवाजी मिलिटरी स्कूल , पुणे व नाशिक www.irmc.org |
इ. ४ थीत शिकत असलेला व पालकांचे उत्पन्न रु. १००००/- |
सप्टेबर |
एप्रिल |
१२ |
सांस्कृतिक प्रज्ञाशोध परीक्षा |
प्राथमिक, माध्यमिक, विहित वयोगटानुसार विद्यार्थी |
||
१३ |
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्यस्तर एनटीएस www.mscepune.in |
प्राथमिक, माध्यमिक, विहित वयोगटानुसार विद्यार्थी |
सप्टेबर |
नोव्हेंबर |
१४ |
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्यस्तर एनटीएस www.mscepune.in |
राज्यस्तर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी |
मार्च |
मे |
१५ |
राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा |
इ. ५ वी ते ८ वी चे विद्यार्थी |
जुलै |
जुलै /सप्टेबर |
१६ |
डॉ . होमीभाभा कालवैज्ञानिक परीक्षा |
इ. ६वी ते ९ वी चे विद्यार्थी |
डिसेंबर |
सप्टेबर
फेब्रुवारी |
१७ |
गणित ऑलम्पियाड |
इ. ९वी , १०वी , व ११ वी |
डिसेंबर |
|
१८ |
एलिमेंटरी /इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा |
इ. ७वी ते ९ वी चे विद्यार्थी |
जुलै |
फेब्रुवारी |
१९ |
क्रीडा प्रबोधिनी पुणे |
इ. २री ते ८ वी |
मार्च |
|
२० |
मुलांची सैनिकी शाळा |
इ. ५वी |
ऑक्टोबर |
डिसेंबर |
२२ |
गणित |
इ. ३री , ४थी , व इ. ६ वी (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ) |
जानेवारी |
मार्च |
२३ |
गणित |
इ. ३री , ४थी , व इ. ६ वी (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ) |
जानेवारी |
मार्च |
टिप- वरील तक्त्यामध्ये अंशता बदल होऊ शकतो
स्वत:ची भूमिका, मित्र व पालक
या परीक्षेसाठी आपली स्वत:ची भूमिका फार महत्त्वाची आहे. या परीक्षेसाठी ध्येय, चिकाटी, मेहनत, नियोजन व सहनशीलता या गुणांबरोबरच सकारात्मक भूमिका ही महत्त्वाची आहे. कदाचित दोन-तीन प्रयत्नांनंतर यश मिळणार नाही त्यामुळेच सहनशीलता हा गुण या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे तसेच परीक्षेबाबत नकारात्मक बाजू मांडणारे तसेच या संपूर्ण प्रक्रियेला नाव ठेवणारे लोक तुमच्या उत्साहावर विरजन पाडू शकतात म्हणूनच तुमची कणखर भूमिका, निश्चय तसेच सकारात्मक भूमिका फार महत्त्वाची आहे. संवाद कौशल्य वाढविण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. करिअरची सुरुवात करताना वेतन व पदाबद्दल आडमुठेपणा करू नये. या अमुक पदासाठी अर्ज करीन असा विचार न करता येणाऱ्या सर्व पदांसाठी अर्ज भरून परीक्षा द्यावी. म्हणजे या परीक्षा कशा असतात? आपण वेळेत पेपर सोडवू शकतो का? जे प्रश्न सोडविता आले नाहीत त्याचा योग्य अंदाज आपण बांधू शकलो का? याचे उत्तर सापडेल व आपण स्पर्धेत कोठवर आहोत याची प्रचीती येईल. अडलेले प्रश्न तसेच कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी चर्चेची फार गरज असते. ज्यांच्याजवळ असे मित्र नसतील त्यांनी पुस्तकांना आपले मित्र मानावे लागेल.
उत्तम करीअर, स्वतःसाठी आणि देशासाठीही
आपल्याला समाजासाठी, देशासाठी तसेच देशाच्या प्रगतीसाठी विधायक कामे करायची आहेत हा ध्यास घेऊन स्पर्धा परीक्षेद्वारे उत्तम नोकरी मिळवून ध्यासपूर्ती करण्याकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल.
.