शालेय शिक्षणातील मुलींची गळती रोखण्यासाठी सरकारमार्फत गेल्या काही दशकांपासून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुलींना विविध शिष्यवृत्ती दिल्या जात आहेत. शालेय शिक्षण घेताना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी ज्ञान मिळविण्यासाठीचे वरदान ठरत आहेत.
राज्यात इयत्ता पाचवी ते सातवीमधील मुलींची शिक्षणातील गळती थांबविण्यासाठी प्राथमिक शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमातीतील आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’ ही शिष्यवृत्ती लागू करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्या अंतर्गतच शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता पाचवी ते सातवीसाठी १९९६ पासून, तर इयत्ता आठवी ते दहावीसाठी २००३ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेसाठी कोणतीही उत्पन्नाची किंवा गुणांची अट देण्यात आलेली नाही. वर्षातून तीन वेळा ही शिष्यवृत्ती टप्प्या-टप्प्याने देण्यात येते.
या योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीमधील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना प्रतिमहा २५० रुपये प्रमाणे दहा महिन्यांसाठी दोन हजार ५०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी (वर्ग-२), संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्यांशी संपर्क साधावा.
तर इतर मागास प्रवर्गातील इयत्ता आठवी ते दहावीमधील विद्यार्थिनींना प्रतिमहा तीनशे रुपये याप्रमाणे दहा महिन्यांसाठी तीन हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते.
विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता पाचवी आणि सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठीदेखील शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेच्या शिष्यवृत्तीचे दर कमी असल्याने शिष्यवृत्तीच्या दरामध्ये वाढ करण्याचा विचार सुरू आहे.
(शब्दांकन : मीनाक्षी गुरव)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.