आश्‍वासनानंतरही विद्यार्थ्यांचे केंद्र बदलेना; एका परीक्षेला मुकणार

health department recruitment exam
health department recruitment examsakal

नागपूर : आरोग्य विभागाद्वारे विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये बसणाऱ्या उमेदवारांच्या ओळखपत्रांमधील परीक्षा केंद्रांमध्ये अद्याप बदल झालेला नाही. त्यामुळे एकाच दिवशी दोन पेपर असल्याने उमेदवारांना कुठल्याही एका परीक्षेपासून मुकावे लागणार असल्याची स्थिती आहे.

राज्यात आरोग्य विभागामार्फत विविध पदांसाठी सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे ठरले. यात दहावी आणि बारावी अर्हता असलेला आणि पदवीधर अर्हता असलेला पदासाठी गट ‘क’, गट ‘ड’ अशा दोन गटातून परीक्षा घेण्यात येईल. यापैकी गट क परीक्षा २४ तर गट ड ची ३१ ऑक्टोबरला होणार आहे. त्यासाठी १ हजार ५०० केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली. मात्र, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मिळालेल्या ओळखपत्रात उत्तरप्रदेश आणि इतर राज्यातील केंद्र मिळाल्याने परीक्षा रद्द करण्याची नामुष्की विभागावर ओढविली. त्यानंतर आता २४ आणि ३१ ऑक्टोबरला नव्याने परीक्षा घेण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांना करावी लागली.

या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रातही घोळ झाल्याचे दिसून आले. यामध्ये एकाच विद्यार्थ्याला दोन परीक्षांसाठी वेगवेगळी केंद्रे आणि तीही वेगवेगळ्या जिल्ह्यात देण्यात आल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे. मात्र, संचालकांनी विभागाची बाजू सांभाळून घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात केंद्र देण्यात येईल, असे सांगून हेल्पलाइन क्रमांक देण्याची घोषणा केली. मात्र, अद्याप या विद्यार्थ्यांचे केंद्र बदलले नाही. विशेष म्हणजे, अमरावतीमधील एकाच उमेदवाराला वाशीम आणि अकोला तसेच नागपूरच्या उमेदवाराला अहमदनगर आणि सांगली अशी केंद्रे देण्यात आली. बहुतांश उमेदवारांनी दोन्ही गटातील पदासाठी अर्ज केले. त्यामुळे अशाप्रकारे केंद्रांचा घोळ निर्माण झाल्याने बहुतांश उमेदवार कुठल्याही एका परीक्षेला मुकणार आहेत.

हेल्पलाइन हेल्पलेस

उमेदवारांना त्यांच्याच जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यासाठी विभागाकडून हेल्पलाइन सुरू करण्यात आली होती. यासाठी बारा जणांचे भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आले. याशिवाय ई-मेलचीही सुविधा देण्यात आली. मात्र, त्याचा काहीही फायदा उमेदवारांना झाला नसल्याचे दिसून आले आहे. याशिवाय उमेदवारांनी पाठविलेल्या ई-मेलचाही अद्याप रिप्लाय आलेला नाही.

"आरोग्य विभागाद्वारे उमेदवारांचा अंत पाहण्यात येत आहे. अद्याप उमेदवारांच्या ओळखपत्रांवरील चुकांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारचे धोरण विद्यार्थी विरोधी आहे."

- पंकज तागडे, स्टुडंट्स राइट्स असोसिएशन ऑफ इंडिया

"आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी प्रचंड घोळ सुरू आहे. अद्याप अनेक उमेदवारांना ओळखपत्र मिळालेले नाही. ज्यांना चुकीचे ओळखपत्र मिळाले त्यात अद्याप बदल झालेला नाही. खासगी कंपनीच्या माध्यमातून घेण्यात येत असलेली परीक्षा संपूर्णपणे उमेदवारांच्या आयुष्याशी खेळत असून बरेच उमेदवार कुठल्या तरी एका परीक्षेला मुकणार आहेत."

- नीलेश गायकवाड, सचिव, एमपीएससी समन्वय समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com