

Adolescent Mental Health
sakal
डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
मुलं-मुली वाढत असताना नुसतंच त्यांचं शरीर वाढत नाही, त्यांचं मन फुलत असतं. त्यांचं व्यक्तिमत्त्व उमलत असतं. पौगंडावस्थेत त्याला अनेक पैलू पडत असतात. उत्साह खळाळून वाहत असतो. तरीही मुलांना गोंधळात टाकणारे प्रश्न पडत असतात, मनात घोंघावत असतात. ‘मी कोण आहे?’, ‘माझ्या शरीरात हे बदल का होतायत’, ‘माझ्या आसपासचं जग बदललेलं का वाटतंय’ असे अनेक प्रश्न पौगंडावस्थेत पडतात. आपण अचानक असे बदलू का लागलो, या चिंतेने मुले अस्वस्थ होतात आणि त्यांना प्रश्न पडतो, इतरांपेक्षा माझ्यात काहीतरी कमी आहे का? या सगळ्या जगरहाटीत माझं काय स्थान आहे? प्रत्येक गोष्टीत माझ्यावर पालकांचा दबाव का? आईबाबांच्याच कलानं, त्यांना आवडेल तेच मी का करायचे? स्त्री-पुरुष संबंध म्हणजे काय व इतरही लैंगिक प्रश्नांनी तो हादरून गेलेला असतो. याच काळात मुलांना सांभाळायला हवं. त्याचा काही कारणानं नुसताच मूड गेला आहे की, हा अस्वस्थतेचा किंवा नैराश्याचा आजार आहे, यातील फरक ओळखायला हवा. हे फक्त तज्ज्ञ व्यक्तीच करू शकते.