

छ. संभाजीनगर : गेल्या आठ पंचवार्षिक निवडणुकांमध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघावर सर्वाधिक काळ म्हणजे मतदारसंघ झाल्यापासून सहावेळा भाजपचा भगवा फडकत आलेला आहे. राजस्थानचे विद्यमान राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि विद्यमान आमदार अतुल सावे यांच्या माध्यमातून पूर्वमध्ये भाजपचा वरचष्मा आहे. यामुळे या निवडणुकीमध्येदेखील हा ‘गड’ राखणे भाजपसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. इतर पक्षांतील बंडखोरी, नजीकच्या प्रतिस्पर्ध्यांकडून दिलेला उमेदवार यामुळे सध्यातरी भाजपसाठी अनुकूल वातावरण असले, तरी निर्धास्त राहून चालणारे नाही.