#FamilyDoctor रसायन वंशवृक्षाचे

Amla
Amla

लवकरच आवळ्याचा सीझन येतो आहे. आवळा वर्षाचे काही महिनेच मिळत असतो. आवळ्याचा कल्प तुपावर परतून केलेला च्यवनप्राश किंवा बाहेर ऊन असले तरी ताजे आवळे सावलीत वाळवून तयार केलेली आवळकाठी, आवळकाठीचे चूर्ण या गोष्टींची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आवळ्याच्या वृक्ष जणू परमेश्वराने मानवाला स्वस्थ ठेवण्यासाठीच निर्माण केलेला आहे. कोहळाही अनेक गुणांनी युक्‍त आहे. कोहळ्याला कुष्मांड असेही म्हणतात.

भारतीय संस्कृतीत वृक्षांना खूप महत्त्व दिलेले आढळते. कारण जीव नसलेल्या वस्तूंपासून किंवा अखाद्य वस्तूंपासून अन्न कसे निर्माण करायचे हे गुपित केवळ वृक्षच जाणतात. साधी माती, अगदी मुरमाड माती, त्यात पडलेले शेण वगैरे वस्तू यांच्यापासून आंबा, गहू, तांदूळ, मूग वगैरे अप्रतिम गोष्टी कशा तयार करायच्या हे फक्‍त वनस्पती सृष्टीलाच माहिती आहे. वनस्पती सृष्टी ही आपल्या आदि अस्तित्वाची खूण आहे. आपले आजोबा, पणजोबा असे खूप मागे मागे गेले तर आपणा सर्वांचा वंशवृक्ष हा वृक्षापर्यंत पोचतो हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. साहजिकच या वृक्षांची पूजा न झाली तरच नवल. 

वटवृक्षाची पूजा सर्वप्रथम केली जाते, कारण वड, पिंपळ हे वृक्ष असे आहेत की त्यांच्या पानाचे एक टोक जमिनीत खोवले तरी त्यापासून संपूर्ण वृक्ष तयार होऊ शकतो. त्यासाठी बीजाची आवश्‍यकता असतेच असे नाही. अशा प्रकारे नष्ट न होणारे कंटिन्युएशन त्यांच्यात असते. सस्टेनन्स (काळाच्या ओघात कायम टिकणे व सातत्य असणे) व कंटिन्युएशन हे दोन शब्द आपण सध्या खूप वेळा ऐकतो. काळाच्या ओघामध्ये टिकून राहणे व पुनरुत्पत्तीची ताकद असणे या दोन गोष्टी वड, पिंपळाच्या वृक्षांत दिसून येतात. हे वृक्ष जसजसे मोठे होतात तशी त्यांची जमिनीतील मुळे सुद्धा शे-पाचशे मीटर फैलावलेली असतात.

मानववृक्षही तसाच आहे. याची मुळे पृथ्वीवर दूरवर पसरलेली आहेत. त्यात तरी स्त्री, पुरुष, रंग, उंची वगैरे भेद असले तरी या सर्वांचे मिलन वंशवृक्षातच होणार असते. 

म्हणून वडा-पिंपळाचे पूजन केले जाते. स्वतःभोवती गोल गोल फिरण्याने भ्रूमध्यातील ग्रंथीला चालना मिळते. या ग्रंथीला चालना मिळालेली असताना या वृक्षांभोवती फिरण्याने आरोग्याला वेगवेगळे फायदे मिळत असतात. स्त्रियांच्या बाबतीत संप्रेरके (हार्मोन्स) अधिक महत्त्वाची असल्यामुळे या वृक्षांच्या पूजेचा स्त्रियांना अधिक लाभ होत असावा.

यानंतर पूजा येते आवळ्याच्या वृक्षाची. आवळा आकारमानाच्या बाबतीत वडाच्या पंक्‍तीत पूर्ण बसत नसला तरी श्रेष्ठत्वात तो काकणभर पुढे आहे की काय अशी शंका येऊ शकते. कारण आवळ्याच्या वृक्षाची फळे रसायन म्हणून सेवन केली जातात आवळ्याच्या सेवनामुळे मनुष्यमात्राला तारुण्य, जोम, उत्साह, आरोग्य यांची प्राप्ती होते. झाडावरून पडून वाळलेला आवळा खाल्ला तरी पचनासाठी उपयोग होऊ शकतो. अर्थात पूर्ण तयार झालेला आवळा झाडावरून काढून वाळवला तर तयार झालेली आवळकाठी निश्‍चितच अधिक गुणकारी असते. पूर्ण तयार झालेल्या आवळ्यापासून केलेला मोरावळा किंवा च्यवनप्राश यांची तुलना इतर कशाचीही होऊ शकत नाही. झाडावरून अकाली गळून पडलेल्या अपक्व आवळ्यांपासून केलेला तयार मोरावळा, आवळकाठी वा च्यवनप्राश यांचा कितपत उपयोग होत असेल हा मुद्दा वादातीत आहे. 

आवळ्याच्या झाडाभोवती आपल्या चेतासंस्थेला चालना मिळत असल्यामुळे या झाडाखाली श्री विष्णूंचा वास आहे असे समजले जाते. म्हणून आवळ्याच्या झाडाच्या सावलीत बसून भोजन करण्याची, आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची भारतीय परंपरा आहे. 

कुठल्याही झाडाला दुखवू नये. झाडे केवळ जंगलातच नाही तर आपल्या घरांभोवतीही असावीत. सध्या तर मनुष्याने आपल्या राहण्याच्या जागांमधून झाडांना हद्दपार केलेच आहे, पण त्याने जंगलेही कापायला सुरवात केली आहे. याचा दुष्परिणाम आज सर्वांना भोगायला लागतो आहे. जसे आई-वडिलांना दुखवल्यावर मुलांना कधीही सुख व यश मिळत नाही, तसे वृक्षांचा नाश केला तर जीवन कधीही चांगले होणार नाही. तेव्हा आपल्यावर वृक्षवल्लींचे उपकार आहेत ही गोष्ट नक्की. सध्या याची आठवण होण्याचे कारण म्हणजे सध्या झालेले पर्यावरणाचे प्रदूषण. हे प्रदूषण व त्यामुळे झालेले दुष्परिणाम पाहिले, की आपल्या पूर्वजांनी वृक्षांची पूजा का करायला सांगितली हे लक्षात येते. 

आता लवकरच आवळ्याचा सीझन येतो आहे. आवळा वर्षाचे काही महिनेच मिळत असतो. आवळ्याचा कल्प तुपावर परतून केलेला च्यवनप्राश किंवा बाहेर ऊन असले तरी ताजे आवळे सावलीत वाळवून तयार केलेली आवळकाठी, आवळकाठीचे चूर्ण या गोष्टींची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे या चार महिन्यांत आवळ्यांपासून च्यवनप्राशसारखे रसायन बनवून ठेवून आवळ्याचा उपयोग बारा महिने करून घेता येईल अशी व्यवस्था करून ठेवावी लागते. यामुळेही आवळ्याला अधिक महत्त्व आलेले आहे. म्हणून आवळीपूजन, आवळीभोजन झाले, की आवळ्यापासून वस्तू बनविण्यासाठी फार्मसीत सुरवात होते. 

आवळीपूजनाच्या आधी आवळा बाजारात आला तरी आत्मसंतुलनमध्ये आवळीपूजनाच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून नंतरच आवळ्यापासून बनवल्या जाणाऱ्या औषधीकरणाला सुरवात होते. च्यवनप्राश हा खरोखरी आयुर्वेदाने दिलेला जीवनीय चमत्कार आहे. लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच च्यवनप्राश घेता येतो. फक्‍त तो करण्याची पद्धत आपल्या शास्त्रांनी सांगितल्यानुसार असावी, त्यात कुठल्याही प्रकारचा समझोता केलेला नसावा. 

आवळे पोटलीमध्ये बांधून पाठात सांगितलेल्या सर्व वनस्पतींच्या काढ्यात शिजवून त्याचा गर काढला जातो. राहिलेला काढा घट्ट केला जातो. हा गर तेला-तुपावर परतून घेतला जातो. नंतर परतलेला घर, घट्ट केलेला काढा, साखर टाकून पुन्हा शिजवून च्यवनप्राश तयार होतो. यानंतर यात वंशलोचन, वेलची, दालचिनी, मध वगैरे द्रव्य टाकली जातात. असा शास्त्रोक्‍त पद्धतीने बनविलेला च्यवनप्राश अनेक गुणांनी युक्‍त असतो. असा च्यवनप्राश वर्षभर सेवन केल्याने आवळ्याच्या फायदा वर्षभर घेता येतो. आवळ्याच्या वृक्ष जणू परमेश्वराने मानवाला स्वस्थ ठेवण्यासाठीच निर्माण केलेला आहे. 

कोहळाही अनेक गुणांनी युक्‍त आहे. कोहळ्याला कुष्मांड असेही म्हणतात. कोहळ्याचा पेठा म्हटला की आग्र्याची आठवण होतेच.  कोहळा वृष्य गुणधर्माचा आहे, त्यामुळे  याचा पौरुषशक्‍तीला, शुक्रशक्‍तीला फायदा होतो. कोहळा शीत गुणधर्माचा असल्यामुळे त्यापासून केलेली भाजी खाण्यापिण्यावर बंधने असणाऱ्यालाही चालू शकते. कोहळा मेंदूसाठी अत्यंत उत्तम आहे. च्यवनप्राश बनवून जसे आवळ्याचे संरक्षण घेतले जाते तसे धात्री रसायनसारखे रसायन बनवून कोहळ्याचे लाभ वर्षभर मिळविता येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com