सुखी परिवार, आरोग्याचा आधार...

मनुष्य हा समाजप्रिय, समुदायप्रिय प्राणी आहे. अगदी प्राचीन काळी मनुष्य एकेकटा राहत असे, एकट्याने शिकार करत असे, एकटा सर्व संकटांशी झुंजत असे.
Family
FamilySakal
Summary

मनुष्य हा समाजप्रिय, समुदायप्रिय प्राणी आहे. अगदी प्राचीन काळी मनुष्य एकेकटा राहत असे, एकट्याने शिकार करत असे, एकटा सर्व संकटांशी झुंजत असे.

मनुष्य हा समाजप्रिय, समुदायप्रिय प्राणी आहे. अगदी प्राचीन काळी मनुष्य एकेकटा राहत असे, एकट्याने शिकार करत असे, एकटा सर्व संकटांशी झुंजत असे. स्त्री व पुरुष एकत्र येण्याने नैसर्गिक ऊर्मी भागली तरी त्यापेक्षा आजूबाजूला चार लोक असले तर आपण अधिक समाधानी असतो, असे त्याच्या लक्षात आले असावे. यातून मग टोळ्या तयार झाल्या असाव्यात. त्यातून पुढे गावे वसवली गेली असावीत. असे करता करता समाजाची स्थापना झाली असावी. भौगोलिक परिस्थिती, त्यावेळची धारणा यानुसार त्या त्या समाजाची वागण्याची वेगळी पद्धत तयार झाली. यातूनच वेगवेगळ्या संस्कृतींचा उगम झाला आणि मनुष्य सुसंस्कृत जीवन जगू लागला. आज काळ बदलला असला, जीवनमान बदलले असले तरी एकत्र राहण्याने जीवन सुखाने जगणे सोपे होते, मानसिक ताण कमी होतो, आलेल्या संकटाचा सामना एकत्रितपणे करण्याने त्याची तीव्रता कमी होते हा अनुभव सर्वांचा असतो.

उदा. अतिवृष्टीमुळे राहण्याच्या जागेत पाणी आले तर कुटुंबातील सर्वांनी मिळून पाणी काढून टाकणे, घर साफ करणे सोपे होते, तेच एकटा माणूस असला तर हेच काम करायला खूप वेळ लागणार हे निश्र्चित. मनुष्य हा संभाषणप्रिय, संवादप्रिय आहे. म्हणून कुटुंबात ४-६ माणसे असली तर माणूस एकमेकांशी संवाद, संभाषण करू शकतो, त्याच्या मनावरील ताण कमी होतात. संस्कृती टिकवायला कुटुंबाची गरज असते आणि संस्कृतीमुळे कुटुंब टिकते. संस्कृती आणि कुटुंब व्यवस्थित चालले तर जीवन तणावरहित होऊन शांततेत व समाधानात जगणे सोपे होते. पूर्वी एखाद्या कुटुंबात खापर पणजोबांपासून पतवंडांपर्यंत अनेक पिढ्या एकत्र राहत असत, म्हणजे एका कुटुंबात वीस-पंचवीस व्यक्ती सहज असत. एवढे मोठे कुटुंब एकत्र राहण्यासाठी विशिष्ट मानसिकता लागते, संस्कार लागतात, संस्कृती लागते, वडिधाऱ्यांसाठी आदर असावा लागतो. या सर्व गोष्टी एखाद्या कुटुंबात असणे आज अवघड वाटत असले, तरी ते अशक्य नाही.

आई-वडील व त्यांची एक मुलगी, एक मुलगा, जावई, सून, मुलाची १-२ मुले असा परिवार असणे अवघड नाही, मुलगी लग्नानंतर दुसऱ्या घरात राहात असल्यामुळे तिची मुले व यजमान हे सर्व अधून मधून या कुटुंबाशी जोडली जातात. एवढे कुटुंब तर एकत्र नीट राहायला काही हरकत नसावी. जितक्या अधिक माणसांचे स्वयंपाकघर एक असते तेवढा स्वयंपाकघरावरचा दरडोई खर्च कमी होतो, कारण वस्तू जितकी कमी प्रमाणात घ्यावी तितकी ती महाग पडते. शिवाय स्वयंपाकात विविधता अनुभवायला मिळते, सगळ्यांच्या मदतीने प्रेमाने शिजविलेले अन्न अधिक रुचकर लागते, प्रेमाने सर्वांबरोबर एकत्र बसून जेवण्याने ते अंगी अधिक चांगल्या प्रकारे लागते. एकत्र कुटुंबात उठा- बसायच्या खोलीत सगळ्यांना मिळून एक टीव्ही पुरतो.

तसेच मोठ्या कुटुंबात बाथरूम, शौचालय वगैरे जागाही त्यामानाने कमी लागतात. गरम होत असताना खोलीत एक माणूस असला तरी एक पंखा लावावा लागतो आणि चार माणसे बसली तरी एक पंखा पुरतो. त्यामुळे अधिक माणसे असतील तेव्हा खर्च आपसूक कमी होतो. पैसा व खर्च हा एकमेव मुद्दा नसला तरी आपल्या कमाईत सुखासमाधानाने राहता येण्यासाठी बऱ्याच वेळा पैसा महत्त्वाचा ठरतो. या उलट जेव्हा कुटुंब मोडते व दोन-दोन माणसांचे एक कुटुंब होते किंवा माणूस एकटा राहू लागतो तेव्हा घरातील बादलीपासून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन वगैरे सर्व गोष्टी प्रत्येक घरात असाव्या लागतात. या गोष्टी मोठ्या प्रमाणावर विकल्या जाव्यात म्हणून एकट्या - दुकट्याने एका फ्लॅटमध्ये राहावे अशा कल्पना तरुणांच्या डोक्यात भरवल्या गेल्या आहेत की काय अशी शंका येते.

नोकरी-कामानिमित्त दूर देशी राहावे लागले तर वेगळे राहणे ओघानेच येते व त्यावेळी नाइलाज असतो. परंतु शक्यतोवर घरातील सर्वांनी एकत्र राहणे, सर्व सुख-दुःखे, कामकाज, जबाबदाऱ्या, एकत्र मिळून सांभाळणे हे आरोग्यासाठी श्रेयस्कर असते. यासाठी फक्त स्वतःचा, स्वतःच्या सोयीचा आणि तोसुद्धा क्षणिक सोयीचा विचार न करता, आपल्यालाही दुसऱ्याची गरज पडू शकते याचे भान ठेवणे चांगले. यादृष्टीने घरातील सगळ्यांनी रोज किमान एकदा, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण, एकत्र बसून करणे, जेवणाच्या अगोदर ‘ॐ सह नाववतु’ सारखी प्रार्थना म्हणणे, ज्यात कुटुंबाच्या आरोग्याची, कुटुंबात स्नेहभाव कायम ठेवण्याची कल्पना केलेली आहे, उत्तम होय. कुटुंबातील सर्वांनी आपल्या जाण्या-येण्याच्या वेळा घरातल्यांना सांगणे; कुठे जातो आहोत, काय कामासाठी जात आहोत हे सांगणे; महत्त्वाच्या कामाला जाताना घरातल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेणे यासारख्या कृतींमुळे घरात कौटुंबिक वातावरण तयार होते.

शिवाय अशा वागण्यामुळे घरातल्या वयस्कर व्यक्तींना मिळणारे मानसिक समाधान त्यांच्या आरोग्याला कारणीभूत ठरते. घरातील लोक हे जसे कुटुंबातले असतात तसेच इमारतीतील किंवा कॉलनीतील, आजूबाजूला राहणारे लोक मिळूनही एक मोठे कुटुंबच असते. आपल्या घरात काही समारंभ असला, लग्नकार्य असले तर मोठ्या आवाजात गाणी लावण्याचा किंवा वेळी-अवेळी फटाके वाजविण्याचा या आसपासच्या लोकांना त्रास होणार नाही व त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही याचे भान ठेवणे इष्ट. कौटुंबिक आरोग्यासाठी घरातील सर्व मंडळी एकत्र येणे जसे आवश्‍यक असते, तसेच कॉलनीतील सर्व मंडळीही अधूनमधून एकत्र येतील अशा योजना आखण्याने एकमेकांबद्दल प्रेम, आदर उत्पन्न होऊन मानसिक समाधान मिळायला मदत होते. अडीअडचणीच्या वेळेला, आजारपणात वगैरे एकमेकांना मदत करण्याची तयारी ठेवली तर वेळप्रसंगी आपण एकाकी पडणार नाही हा विश्र्वास दृढ होत जातो. नैराश्य, आत्महत्या, फोबिया या तक्रारी आज पूर्वी कधी दिसत नव्हत्या तेवढ्या वाढताना दिसत आहेत. मनाच्या असंतुलनामुळे, संप्रेरकांच्या असंतुलनामुळे नवीन नवीन रोग झालेले आढळत आहेत. या दृष्टीनेही परिवाराची अखंडता जपणे ही काळाची गरज आहे. ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हे श्रीरामदासस्वामींचे वचन प्रत्यक्षात अनुभवायचे असेल तर त्याची सुरुवात घरापासून, परिवारापासून करायला हवी.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com