तिळगूळ घ्या, गोड बोला....

आज आहे संक्रांत, नव्या वर्षातील पहिला सण. सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रमण असे म्हणतात व या काळात उत्पन्न झालेल्या शक्तीला ‘संक्रांती’ असे म्हटले जाते.
Tilgul
TilgulSakal
Summary

आज आहे संक्रांत, नव्या वर्षातील पहिला सण. सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रमण असे म्हणतात व या काळात उत्पन्न झालेल्या शक्तीला ‘संक्रांती’ असे म्हटले जाते.

या हेमंत ऋतूत दूध व उसापासून तयार केलेले विविध पदार्थ खावेत, गरम पाणी प्यावे, तेल, वसा वगैरे स्निग्ध पदार्थ खावेत, अंगाला अभ्यंग करावा, स्निग्ध द्रव्यांपासून बनविलेली उटणी लावावीत, डोक्यावर तेल लावावे, अंगावर ऊन घ्यावे असे चरकसंहितेत सांगितलेले आहे. संक्रांत साजरी करताना आपण नेमक्या याच गोष्टी करतो. थंडीच्या दिवसात जे स्निग्ध पदार्थ खायचे, त्यात तीळ अग्रणी ठरावेत. म्हणूनच संक्रांतीला ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ हा जणू परवलीचा शब्द असतो.

आज आहे संक्रांत, नव्या वर्षातील पहिला सण. सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रमण असे म्हणतात व या काळात उत्पन्न झालेल्या शक्तीला ‘संक्रांती’ असे म्हटले जाते. मकर राशीत सूर्य प्रवेश करतो ती मकरसंक्रांती. आकाशगंगेतील तीस अंशाच्या एका भागास मकर असे नाव दिलेले आहे. त्या राशीचा अधिपती शनी आहे व तो थंड व मंद गतीचा आहे. ही राशी सूर्याला असुविधा करणारी असते. आणि म्हणून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सूर्योपासना करण्याची योजना भारतीय संस्कृतीत आखलेली दिसते. आयुर्वेदिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर संक्रांत येते थंडीच्या दिवसात म्हणजे हेमंत ऋतूत. हेमंत ऋतूत दूध व उसापासून तयार केलेले विविध पदार्थ खावेत, गरम पाणी प्यावे, तेल, वसा वगैरे स्निग्ध पदार्थ खावेत, अंगाला अभ्यंग करावा, स्निग्ध द्रव्यांपासून बनविलेली उटणी लावावीत, डोक्यावर तेल लावावे, अंगावर ऊन घ्यावे असे चरकसंहितेत सांगितलेले आहे. संक्रांत साजरी करताना आपण नेमक्या याच गोष्टी करतो. उसापासून बनविलेल्या गुळाशिवाय संक्रांत पूर्ण होणार नाही.

थंडीच्या दिवसात जे स्निग्ध पदार्थ खायचे, त्यात तीळ अग्रणी ठरावेत. म्हणूनच संक्रांतीला ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ हा जणू परवलीचा शब्द असतो. संक्रांतीच्या दिवशी तिळाचे महत्त्व इतके की त्यांचा होता होईल तेवढा अधिकाधिक उपयोग करण्याची पद्धत असते. तीळ-गूळ खाण्याबरोबर तीळमिश्रित पाण्याने स्नान करणे, तिळाचे उटणे अंगाला लावणे, तीळ अग्नीवर टाकून धूप करणे, तीळ वाटणे वगैरे निरनिराळ्या मार्गांनी तीळ वापरायचे असतात. आयुर्वेदाने सांगितलेला अभ्यंगही औषधांनी सिद्ध तीळ तेलाचाच करायचा असतो. स्निग्ध द्रव्यांचे उटणे बनविताना त्यात त्वचेला हितकर तीळ अग्रणी असावेच लागतात. तसेच या काळात गरम शेगडीवर परात ठेवून तिळावर साखर चढवून हलवा केलेला असतो. अशा रीतीने या दिवसात गरम शेगडीभोवती बसणे, शेकोटी पेटवून त्याभोवती बसणे वगैरे आचरणही सुचविलेले दिसते. शिवाय मानसिक ऊब वाढण्याच्या दृष्टीने आजूबाजूच्या स्त्रियांना आपल्या घरी बोलावून त्यांना काहीतरी भेटवस्तू देणे अशा आचरणातून एकूणच संबंधात गोडवा आणण्याचा प्रयत्न केला जातो. घराबाहेर जास्तीत जास्ती राहून सूर्याची शक्ती जास्त मिळावी या हेतूने गच्चीवर वगैरे पतंग उडविण्यासारखी पद्धत रूढ झालेली दिसते. पतंग उडविणे हे एका दृष्टीने आकाशध्यानच आहे. नुसच्या मोकळ्या आकाशाकडे पाहणे तेवढे सोपे व मनाला फारसे आवडण्यासारखे नसल्याने सुंदर रंगीत पतंग आकाशाच्या कपाळावर ठेवून त्यावर त्राटक करण्याची क्रिया म्हणजे पतंग उडविण्याचा खेळ.

‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायानुसार बाह्यविश्र्वातील सूर्याचा आपल्या शरीरातील प्रतिनिधी म्हणजे शरीरस्थ अग्नी. मकर राशीत प्रवेश केल्याने सूर्याला जशी असुविधा होते तसाच परिणाम अग्नीवर होणे स्वाभाविक होय. अग्नीवर पचनाची जबाबदारी असते तसेच हॉर्मोन्सच्या संतुलनाचीही असते. स्त्रियांच्या बाबतीत ही संस्था अधिक संवेदनशील असल्याने संक्रांतीच्या काळात स्त्रियांसाठी अनेक व्रते सांगितलेली असतात. काळ्या वस्त्रात सूर्यांच्या उष्णतेचे शोषण अधिक प्रमाणात होते म्हणून संक्रांतीला काळी वस्त्रे घालण्याची प्रथा आहे. सकाळच्या वेळी लवकर जेवण्याची प्रथा आहे, ज्यामुळे अन्नाचे पचन नीट होण्याच्या दृष्टीने नीट वेळ मिळतो.

जेवणात खिचडी, गुळाची पोळी खाण्याचा प्रघात दिसतो. तीळ आणि गूळ स्वयंपाकघरात वापरले जातातच, पण आरोग्यासाठीही यांचे योगदान मोठे असते. उदा. रोज काळ तीळ चावून खाल्ले व वरून थंड पाणी प्यायले तर दात बळकट होतात. मूळव्याधीमुळे गुदभागी सूज व वेदना असता तीळ वाटून तयार केलेला लगदा कोमट करून लावल्याने बरे वाटते. गर्भाशयाच्या शुद्धीसाठी तीळ खाणे चांगले असते. म्हणून आपल्याकडे बाळंतिणीला तीळ-ओवा- खोबऱ्यापासून बनविलेले मिश्रण मुखशुद्धीसाठी देण्याची पद्धत असते. वाटलेले उटण्याप्रमाणे अंगाला लावून स्नान केले असता त्वचा कोरडी पडणे, खाजणे, अकाली सुरकुत्या पडणे वगैरे त्रास दूर होतात. पारंपरिक आणि रासायनिक द्रव्यांनी विरहित गूळ वात-पित्तशामक, रक्तधातूला संपन्न करणारा आणि थकवा दूर करणारा असतो. म्हणून पूर्वी आपल्याकडे उन्हातून थकून-भागून आलेल्या पाहुण्याला गुळाचा खडा देण्याची पद्धत होती. थंडीच्या दिवसात जेवणात गूळ-तूप खाण्याने शरीरात ऊब तयार होते, शिवाय ताकदही वाढते. एक वर्ष जुना गूळ सेवन करण्यास उत्तम असतो, हिमोग्लोबिन वाढण्यास मदत करतो, हृदयासाठीही हितकर असतो. मात्र गूळ उष्ण असतो हे लक्षात घेऊन प्रकृतीचा विचार करून योग्य मात्रेत सेवन करणे चांगले.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com