प्रेम सेवा शरण...

‘प्रेम सेवा शरण, सहज जिंकी मना’ हे एक अप्रतिम नाट्यगीत! जीवन यशस्वी करून सुख, शांती व स्वातंत्र्य अनुभवायचे असेल तर त्यासाठी प्रेम, सेवा व समर्पण ही तीन महत्त्वाची साधने होत.
प्रेम सेवा शरण...
Summary

‘प्रेम सेवा शरण, सहज जिंकी मना’ हे एक अप्रतिम नाट्यगीत! जीवन यशस्वी करून सुख, शांती व स्वातंत्र्य अनुभवायचे असेल तर त्यासाठी प्रेम, सेवा व समर्पण ही तीन महत्त्वाची साधने होत.

प्रेमाशिवाय केलेले काम म्हणजे नोकरी व प्रेमाने केलेले काम ही सेवा. समाजकार्य करताना मानवजातीवर असलेल्या प्रेमातून काम केल्यामुळे त्याची एक वेगळीच प्रतिष्ठा असते व अशा कामाची किंमत मोजता येत नाही. केवळ कार्यशक्तीचे मोजमाप करायचे ठरविले तर पगाराशिवाय हातात काहीच पडत नाही. काम कुठलेही असो, त्यामागे सेवेचा भाव असला, दुसऱ्याला मदत करायचा भाव असला, तर त्यातून योग्य तो मोबदला तर मिळतोच; पण आनंदसुद्धा मिळतो.

‘प्रेम सेवा शरण, सहज जिंकी मना’ हे एक अप्रतिम नाट्यगीत! जीवन यशस्वी करून सुख, शांती व स्वातंत्र्य अनुभवायचे असेल तर त्यासाठी प्रेम, सेवा व समर्पण ही तीन महत्त्वाची साधने होत. प्रेमाने काय होऊ शकत नाही? सर्व जगाची उत्पत्ती प्रेमातूनच झालेली दिसते. या प्रेमापोटीच स्त्री-पुरुष एकमेकाला समर्पणासाठी तयार होतात. या प्रेमापोटी होणाऱ्या आकर्षणातून निसर्गचक्र चालविण्यासाठी असलेल्या योजनेला आधार मिळतो. प्रेम शब्दांनी व्यक्त करावे लागतेच असे नाही. दोन दिवसांनी येणाऱ्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला प्रेम व्यक्त करण्याचे निमित्त समजले तरी प्रेम एका दिवसापुरते सीमित समजता येणार नाही. प्रेम हा ऊर्जासंक्रमणाचा परवलीचा शब्द आहे पण सध्याच्या उथळ व बाजारू स्वरूपाच्या काळात तो केवळ एक ध्वनी म्हणूनच वापरला जातो. प्रेम नावाची शक्ती ज्याच्या हृदयात असेल त्याच्या हृदयातून तो तरंगरूपाने सारखी प्रसारित होत राहते. म्हणूनच आईने उचलून घेतलेले मूल एक मिनिटात शांत होते. दोन प्रेमी एकमेकाला भेटल्यावर सर्व प्रकारची रुखरुख व काळजी, भीती दूर होऊन मन शांत होते. नाना प्रकारच्या योगधारणा वा चित्तनिरोधाचे निरनिराळे प्रकार करूनही शांत न झालेले मन आपल्या प्रिय व्यक्तीच्या दर्शनाने वा स्पर्शाने लीन व शांत होऊ शकते. मंदिरातील देवमूर्तीच्या दर्शनाने भक्ताचे मन शांत होते कारण त्याचे स्वतःच्या इष्ट देवतेवर अपरंपार प्रेम असते. साध्या आशिर्वचनाच्या हस्तमुद्रेतून वा दृष्टीतून प्रेम ओथंबून वाहत राहिले तर ते समोरच्या व्यक्तीला पूर्ण व्यापून त्याला शांती देऊ शकते. साहजिकच शांत मनात प्राणशक्तीचा संचार अधिक होत असल्याने प्रेमाने मारलेल्या मिठीमुळे वा प्रेमाने मस्तकावर ठेवलेल्या हातामुळे वा दुखऱ्या भागावर घातलेल्या फुंकरीमुळे रोग बरा व्हायला खूप मदत होते.

स्पर्शाने इलाज व उपचार करणारी मंडळी स्पर्शातून प्रेमच व्यक्त करत असतात. शरीर भौतिक पातळीवर असते, त्यामुळे प्रेम व्यक्त करण्यासाठी शरीराचा उपयोग केल्यास अशा शारीरिक प्रेमाचा असर कायम राहत नाही, पर्यायाने शारीरिक सुखाच्या आकर्षणात अडकून पडायला होते. पण भक्तीत समर्पण झालेल्या प्रेमाला कशाचेच बंधन राहत नाही. प्रेमाशिवाय केलेले काम म्हणजे नोकरी व प्रेमाने केलेले काम ही सेवा. समाजकार्य करताना मानवजातीवर असलेल्या प्रेमातून काम केल्यामुळे त्याची एक वेगळीच प्रतिष्ठा असते व अशा कामाची किंमत मोजता येत नाही. केवळ कार्यशक्तीचे मोजमाप करायचे ठरविले तर पगाराशिवाय हातात काहीच पडत नाही, संतमहात्मे नफातोट्याचा विचार करून किंवा मोबदला मिळविण्यासाठी काही करत नाहीत, तर मनुष्यमात्रावर असलेल्या प्रेमामुळे, त्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने ते स्वतःचे कार्य करत राहतात. काम कुठलेही असो, त्यामागे सेवेचा भाव असला, दुसऱ्याला मदत करायचा भाव असला तर त्यातून योग्य तो मोबदला तर मिळतोच, पण आनंदसुद्धा मिळतो.

जेव्हा शरीर व मन अस्वस्थ होते किंवा आजारपण येते तेव्हा औषधोपचारांबरोबर प्रेमशक्ती उत्तम काम करते. कुटुंबातील किंवा मित्रमंडळींपैकी कुणी आजारी पडले तर भेटायला जाण्याची पद्धत असते. केवळ कर्तव्य किंवा समाजात वाईट दिसेल म्हणून जाण्यामुळे रोगी व्यक्तीला व संबंधितांना त्रासच होऊ शकतो. पण रोगी व्यक्तीला व इतर कुटुंबीयांना प्रत्यक्ष मदत देऊन प्रेमाने आश्र्वस्त केल्यास रोगास सामोरे जाणे सोपे होते. प्रेम करण्याने मिळणारा आनंद दुसऱ्या कशानेच मिळत नाही. प्रेमात त्याग करायला तयार झालेली अनेक मंडळी व त्यांच्या कथा माहीत असतात. अगदी देहत्यागापर्यंत आपल्याला याबद्दलची उदाहरणे सापडतात. प्रेमासाठी आयुष्यभर वाट पाहण्यातील किंवा एखाद्या सूक्ष्म शक्तीवर प्रेम करण्यातील अलौकिकता सामान्यांना कळू शकणार नाही. संत मीराबाईंचे श्रीकृष्णावर प्रेम होते. कुठलीही अपेक्षा न ठेवता मनाला सूक्ष्म करून, विचारांचे पावित्र्य व सूक्ष्मत्व जपून त्या सूक्ष्मातिसूक्ष्म रूपावर प्रेम करणे ही घटना सर्वसामान्यांना कळण्यास अवघड वाटली तर नवल नाही. प्रेम म्हणजे जगातील सर्वांत मोठ्या शक्तीचे एक स्वरूप असते. प्रेमाने कुठलाही रोग बरा करता येतो, कुठल्याही प्रकारच्या अडचणीवर मात करता येते, शत्रूला जिंकता येते व आपल्या सख्याबांधवांना आपलेसे करून जीवन आनंदमय करता येते.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com