त्रिसूत्रींचे संतुलन अर्थात सद्‌गुरू श्रीदत्तात्रेय 

 Balancing the triad means Sadguru ShreeDattatreya
Balancing the triad means Sadguru ShreeDattatreya

मेंदू गुरूंचे काम करतो, तो गुरूच आहे    म्हणजे तो मोठा आहे. शरीरात सर्वांत वरच्या बाजूला त्याचे स्थान आहे. मेंदूमुळेच सर्व जीवनव्यापार चालू शकतो. तीन बाजू असलेली त्रिसूत्री आयुर्वेदाने तर स्वीकारलेलीच आहे; परंतु जीवनामध्येही त्रिसूत्री स्वीकारली   गेलेली दिसते. 

मनुष्याचा मेंदू म्हणजेच मनुष्याचे व्यक्तिमत्त्व. मनुष्याची ओळख ही त्याच्या मेंदूची ओळख असते. चेहरा पाहिल्यावर मनुष्य लक्षात राहतो; पण त्याचा मेंदू काम करत नसेल म्हणजे मनुष्य कोमामध्ये असेल तर ती एक निर्जीव अवस्था आहे असे समजायला हरकत नाही. मेंदू हा स्वतःची ओळख सांगतो आणि व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवतो, कृती करून दाखवतो, ज्या विषयाची आपल्याला माहिती असेल तो विषय दुसऱ्याला समजावून सांगतो. ही अंगठी कुठल्या बोटाची आहे हे लक्षात ठेवून अंगठी घालायच्या वेळी बरोबर तेच बोट पुढे करण्याचे कामही मेंदूच करतो. स्वतःच्या वस्तू ओळखणे, स्वतःचे घर लक्षात ठेवणे अशी अनेक कामे मेंदू करतो व त्यानुसार शरीराकडून कृती घडवतो. या सर्व कृतींसाठी आवश्‍यक असणाऱ्या चेतासंस्थेच्या जाळ्यावर मेंदूच नियंत्रण ठेवतो. शारीरिक असो, हृदयाचे ठोके चालू ठेवण्याची असो, अन्नपचनाची असो, पळण्याची असो वा दुसऱ्यावर हात उगारण्याची असो अशा वेगवेगळ्या कृती व्हाव्यात यासाठी मेंदूत वेगवेगळी विभागव्यवस्था असते. 

वरचा, खालचा, डाव्या बाजूचा, उजव्या बाजूचा, मागचा, पुढचा असे मेंदूचे आठ भाग केले जात असले तरी डावा मेंदू, उजवा मेंदू व मागचा मेंदू हे मेंदूचे मुख्य भाग तीन. त्यापैकी मेंदूचा डावा भाग व उजवा भाग या दोन विभागांपेक्षा महत्त्वाचा तिसरा भाग म्हणजेच मागचा मेंदू. येथे शिवग्रंथीचे वास्तव्य असते. या ग्रंथीला आरोग्यविज्ञानाच्या भाषेत पॉन्स म्हटले जाते. या तिन्ही भागांचे कार्य नीट चालल्यास मनुष्याला शांतीचा-समाधीचा अनुभव येतो. जो शिकवतो तो शिक्षक किंवा गुरू. मेंदू एक प्रकारे गुरूचे किंवा शिक्षकाचे कामही करत असतो. परंतु या तिन्ही विभागांना मिळून विश्वाचे ज्ञान घेण्याची तसेच ते ज्ञान अनुभवण्याची क्षमता असते. परमशांतीचा अनुभव घेण्याची क्षमता या तीन भागांमध्ये असल्यामुळे पूर्ण मेंदू हा जणू श्रीसद्‌गुरूंचे काम करतो. 

मेंदू गुरूंचे काम करतो, तो गुरूच आहे म्हणजे तो मोठा आहे. शरीरात सर्वांत वरच्या बाजूला त्याचे स्थान आहे. मेंदूमुळेच सर्व जीवनव्यापार चालू शकतो. तीन बाजू असलेली त्रिसूत्री आयुर्वेदाने तर स्वीकारलेलीच आहे; परंतु जीवनामध्येही त्रिसूत्री स्वीकारली गेलेली दिसते. या तीन बाजू ज्या एका बिंदूत मिळतात तो बिंदू या तिन्ही बाजूंवर लक्ष ठेवू शकतो, इतकेच नाही तर तिन्ही बाजूंचा एकसमयावच्छेदेकरून निर्णय घेऊ शकतो. एक बाजू शरीराचे भौतिक व्यापार चालवते. दुसरी बाजू भावनिक व्यवहार चालवते आणि तिसरी बाजू सर्वांना अंतर्भूत करून सर्वांच्या कल्याणाचा म्हणजेच अध्यात्माचा विचार करते. परंतु साधारणतः इंद्रिये एका कुठल्या तरी बाजूला ओढत ठेवतात आणि माणसाचे जीवन भरकटत जाते. असे होऊ नये म्हणून सर्वसमावेशक मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन जो करतो तो सद्‌गुरूंचा मेंदू. तो सद्‌गुरूंच्या नियंत्रणाखाली असतो. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघे सृष्टी व्यापार चालवितातच परंतु पलीकडची परमशांती लाभण्यासाठी सद्‌गुरूंची आवश्‍यकता असते. 
आयुर्वेदानेही हेच सूत्र घेतलेले आहे. आयुर्वेदात म्हटले आहे ‘समत्वं योग उच्यते’. तिन्हींचे संतुलन झाल्यास परमयोग-स्वतंत्रतायोग-शांतियोग-मोक्षयोग साधला जातो. म्हणून योगीश्वर असलेल्या श्री दत्तात्रेय यांचा अवतार झाला. त्यांना प्रसन्न करण्यासाठी मानवाला त्याच्या मेंदूत असणाऱ्या जाणिवेच्या अत्युच्च बिंदूवरून तिन्ही भागांना नियंत्रित ठेवावे लागते. 

श्रीदत्तात्रेय हे स्मर्तृगामी आहेत असे म्हटले जाते म्हणजे स्मरण केल्याक्षणी ते प्रकट होतात. आपली जाणीव, संपूर्ण विश्वाशी जोडलेले अस्तित्व असे जे काही आपण म्हणतो ती अवस्था सद्‌गुरूंची उपस्थिती आणि ती स्मरण केल्याबरोबर लक्षात येते. वस्तुतः त्यांच्या प्रभावानेच सर्व चालत असते परंतु त्याकडे आपले लक्ष नसते. दिव्याचा उजेड किती पडला, बल्ब किती मोठा आहे, किती दाबाने वीज येते आहे वगैरे गोष्टी आपल्याला समजतात, परंतु यामागे असलेल्या विजेकडे आपले लक्ष जात नाही. परंतु एखादा पंखा चालत नसला तर वायरमन सॉकेटमध्ये टेस्टर टाकून तेथे वीज आहे की नाही हे प्रथम पाहतो. 

वीज आहे की नाही हे पाहणे आवश्‍यक असते तसे प्रत्येकाने जाणिवेवर लक्ष ठेवून, सद्‌गुरूंच्या चरणी लक्ष ठेवून कार्य करावे, ते कार्य शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक या कुठल्याही प्रकारचे असो. केलेले कार्य जोपर्यंत परमोच्च जाणिवेला, सद्‌गुरूंच्या चरणी अर्पण होत नाही तोपर्यंत आयुष्य भटकते, आयुष्यात दोष उत्पन्न होतो. अशा वेळी कुठल्याही प्रकारचे समाधान न मिळाल्यामुळे तीच ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटते. पुन्हा पुन्हा कराव्या लागणाऱ्या गोष्टींतून किंवा पुन्हा पुन्हा जगाव्या लागणाऱ्या आयुष्यातून सुटका सद्‌गुरूंमुळे होऊ शकते. पुनर्जन्म घ्यावा लागला तरी हरकत नाही पण पुन्हा पुन्हा तेच अनुभव घेण्याची, त्याच अडचणींत जगण्याची आवश्‍यकता नाही. यातून सुटका सद्‌गुरूंच्या मार्गदर्शनामुळे होऊ शकते. 

‘ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे’ म्हणजे प्रत्येक गोष्ट करत असताना परमेश्वराचे स्मरण असावे. उदा., फूल तोडत असताना फूल तयार होण्यासाठी असलेला परमेश्वरी हात दिसावा, अन्न खात असताना ‘उदरभरण नोहे 
जाणिजे यज्ञकर्म’ हे लक्षात यावे. अशा तऱ्हेने प्रत्येक वेळी परमेश्वरावर लक्ष ठेवले तर आयुष्य आनंदमय होऊ शकते. देवतांना आवाहन करण्यासाठी आपल्या मेंदूत देवतांचे स्थान उत्पन्न केलेले असते. या स्थानांपैकी श्रीदत्तात्रेयांचे स्थान परमोच्च आहे. या ठिकाणी समाधीचा अनुभव घेता येतो, समत्व साधता येते आणि जीवन आरोग्यमय, आनंदमय करता येते. 

अशा या श्री दत्तात्रेयांचे ज्या दिवशी विश्वाला भान झाले तो त्यांचा जन्मदिवस म्हणजे श्रीदत्तात्रेय जयंती. ज्या दिवशी द्वैत संपले, असूया संपली तेव्हा अनसूयेच्या घरात जन्म झाल्याचा हा दिवस. आयुष्य आनंदमय, आरोग्यमय व्हावे यासाठी सद्‌गुरूंचा आशीर्वाद कसा उपयोगी पडेल या दृष्टीने उपासना करायचा हा दिवस व त्यानिमित्ताने श्रीदत्तात्रेयांचे विशेष स्मरण. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com