सोपा ‘संतुलन क्रियायोग’

Yoga
Yoga

आयुर्वेद ही जशी जीवन जगण्याची पद्धत आहे, तसेच योग हे जीवनाचे लक्ष्य साध्य करण्याचे शास्त्र आहे, असे म्हणता येईल. म्हणून ही दोन्ही शास्त्रे एकमेकांना पूरक असतात. आयुर्वेदाच्या मदतीने आरोग्य मिळाले, योगातील अष्टांगाच्या मदतीने पर्यावरण, समाज, नातेसंबंध, मन, इंद्रिये यांच्या आरोग्याची जोड मिळाली तर जीवन यथार्थाने जगणे, जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण करणे हे शक्‍य होते. 

योग हा केवळ व्यायाम नव्हे, तर तो शरीर, मन व आत्मा यांच्या आरोग्याचे साधन आहे. त्यादृष्टीने विचार करून ‘संतुलन क्रियायोग पद्धती’ हा योगप्रकार तयार केलेला आहे. साहजिक यामुळे संप्रेरकांचे (हॉर्मोन्सचे) आरोग्य व संतुलन व्हायला मदत होते. योग भारतीय परंपरा अनेक दर्शनशास्त्रांनी संपन्न आहे.

योग हे त्यापैकी एक शास्त्र. ‘योगः चित्तवृत्तिनिरोधः’ अर्थात ‘मन अशांत, प्रक्षुब्ध करणाऱ्या चित्तवृत्तींवर नियंत्रण प्रस्थापित करणे’ अशी योगाची व्याख्या योगसूत्रांत आहे. शारीरिक क्षमता व श्वासोच्छ्वासाचे सामर्थ्य वाढविणे, मन अनुशासनबद्ध करणे आणि परमतत्त्वाप्रत श्रद्धा व विश्‍वास निर्माण करण्यासाठी योगाचा उपयोग होतो, असेही त्यात म्हटले आहे. त्याला ‘क्रियायोग’ असे संबोधन असून ‘तपः स्वाध्याय ईश्वरप्रणिधानानि इति क्रियायोगः’ अशी त्याची व्याख्या करण्यात आली आहे.

भारतीय योग ही शरीर, मन आणि आत्मा यांना आरोग्य देणारी पद्धती आहे आणि म्हणूनच धर्मनिरपेक्ष आहे. सर्व जगात योगाची आवश्‍यकता आहे हे लक्षात घेऊन चार वर्षांपूर्वी भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा योगदिवस ठरवून योगाची माहिती जागतिक पातळीवर पोचवली. याचे उद्देश दोन होते. नवीन नवीन येणाऱ्या शारीरिक, मानसिक त्रासांना व रोगांना आवर घालणे, त्याचबरोबर मनुष्यमात्राची मानसिकता बदलणे आणि हिंसाचार कमी करून समाजात बंधुभाव वाढवणे. समाजात एकी व एकरूपता आणून स्वास्थ्य मिळविण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचललेले आहे. 

आयुर्वेद ही जशी जीवन जगण्याची पद्धत आहे तसेच योग हे जीवनाचे लक्ष्य साध्य करण्याचे शास्त्र आहे असे म्हणता येईल. म्हणून ही दोन्ही शास्त्रे एकमेकांना पूरक असतात. आयुर्वेदाच्या मदतीने आरोग्य मिळाले, योगातील अष्टांगाच्या मदतीने पर्यावरण, समाज, नातेसंबंध, मन, इंद्रिये यांच्या आरोग्याची जोड मिळाली तर जीवन यथार्थाने जगणे, जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण करणे हे शक्‍य होते. 

ज्यांना योगासने करण्यात शारीरिक अडचण आहे त्यांनाही करता येईल अशी ‘संतुलन क्रियायोग’ ही एक योगावर आधारलेली, परंतु मूळ शास्त्रात कोणतीही विकृती न करता, योगोपचार पद्धती १९७२ साली मी संतुलनतर्फे पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली, त्याचा फायदा आजवर अनेकांनी उचललेला आहे. ज्यांना रोज सर्व आसने करण्यासारखी नाहीत किंवा जमत नाहीत त्यांच्यासाठी सूर्यनमस्कार किंवा संतुलन क्रियायोगातील विश्‍वप्रार्थना हा एक पर्याय असतो आणि दीर्घश्‍वसन हा प्राणायामासाठी पर्याय असतो. 

भारत सरकारच्या पुढाकाराने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. शारीरिक आरोग्य, मानसिक शांती, सामाजिक स्थिरता इतकेच नाही तर निसर्गातील समतोल कायम राहावा, सुधारावा यासाठी ‘योग’ व ‘आयुर्वेद’ यांच्याशिवाय पर्याय नाही हे हळूहळू सर्वांच्याच लक्षात येऊ लागले आहे. योगातील क्रियायोग आणि आसने यांच्या मदतीने शरीर, मन, बुद्धी, प्राणशक्‍ती वगैरेंची कार्यक्षमता वाढू शकते आणि त्यातून या प्रश्नाचे उत्तरही सापडू शकते. संपूर्ण योगशास्त्राचा अभ्यास करणे सर्वांसाठी अशक्‍य आहे. मात्र, आधुनिक जीवनशैलीचे आचरण करतानाही योगशास्त्रातील साररूप तत्त्वांचा उपयोग व्हावा यासाठी ‘संतुलन क्रियायोग (स्काय)’ हा योग तयार झाला. 

श्रीमद्‌भगवद्‌गीतेत विषादयोगापासून कर्मयोग, संन्यासयोग, ध्यानयोग, पुरुषोत्तमयोग, भक्‍तियोग, दैवासुरसंपदविभागयोग, मोक्षसंन्यास-योग असे अनेक प्रकारचे, जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे व विविध व्यक्‍तिमत्त्वांना अनुकूल असे योगाचे प्रकार सांगितलेले आहेत. मुख्य व्याख्या करताना मात्र, दैनंदिन जीवनात ‘योगः कर्मसु कौशलम्‌’ म्हणजेच ‘जीवन जगण्याची पूर्ण कला अवगत असणे’ हा योग व ‘समत्वं योग उच्यते’ म्हणजे ‘एकात्म अवस्थेत संतुलित असणे’ या ध्येयप्राप्तीचा योग सांगितलेला आहे. माणसाचे अस्तित्व शरीर, मन व आत्मा या तिन्ही पातळ्यांवर असते आणि विश्वाशी एकरूपतेचा अनुभव घेण्यापूर्वी या तिन्ही पातळीवर आरोग्य उत्तम राहणे महत्त्वाचे असते. श्री पतंजली महामुनींनी अष्टांगयोगाची रचना करून एकूणच योगमार्ग सुलभ केला. परंतु सध्या प्रचारात असलेली शरीरातील काही विकृतींवर काम करणारी आसन, प्राणायाम पद्धती म्हणजेच योग ही एवढी छोटी कल्पना न करता यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी असे शून्यापासून अनंतापर्यंत एकरूपता साधणारी अष्टांगयोगाची कल्पना केलेली आहे. ही सर्व अंगे एकाच वेळी आठही अंगांचा अभ्यास करीत आचरणात आणावीत असेही नव्हे व अगदीच पायरी पायरीने एकामागोमाग एक करीत जावे, असेही नव्हे. त्यामुळे सर्व अंगांचा अभ्यास हा योगविद्येत अभिप्रेत आहे. मात्र याची जाणीव एकूण समाजात केव्हा होईल व योग हे एक समाधीपर्यंत एकरूपता अनुभवण्याचे साधन आहे हे केव्हा समजेल व हा योग येईल तेव्हाच खरे. योगाचा अभ्यास जसजसा पुढे जाईल तसतशी एकेक कल्पना पतंजली मुनी पुढे वाढवीत जातात व त्यात ‘चित्तवृत्तिनिरोधः इति योगः’ व ‘तपः स्वाध्यायः प्रणिधानानि इति क्रियायोगः’ ही सूत्रे सांगतात. मन, चित्त या काही वाईट गोष्टी नाहीत. चंचल असणे हा तर मनाचा धर्मच. पण या वृत्तींचे अनुशासन करणे, म्हणजे मनाच्या पलीकडे पाहणे, मनाला आत्म्याच्या आज्ञेत काम करायला लावणे म्हणजे योग. तपस्या आणि त्याग स्वतःच जाणण्याचा ‘स्व’ अभ्यास म्हणजेच प्रेमातून सर्व जग समजून घेण्याची क्रिया. आणि हे सर्व मी करतो आहे, माझ्याभोवती विश्व फिरते आहे, असा समज न करता, त्या परम ईश्वराच्या, परम सत्तेच्या सान्निध्यात किंवा अस्तित्वामुळे घडते आहे, ही ठाम श्रद्धा ठेवणे हा योग. तेव्हा संपूर्ण जीवन हे योगमय करायचे असेल तर आसन प्राणायामाबरोबर त्याग आणि सेवा, अनुशासन आणि प्रेम, म्हणजेच सामाजिक बांधिलकी व सर्वसमभाव म्हणजे सर्वांभूती परमेश्वर ही श्रद्धा असा ‘योगाभ्यास’ करावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com