
माझे वय २७ वर्षे आहे. मी शिक्षिका आहे. सतत उभे राहण्याने व फळ्यावर लिहिण्याने माझी मान, कंबर, पाठ नेहमी दुखते. त्यासाठी काही उपचार सांगावे.
प्रश्नोत्तरे
प्रश्र्न १ - माझे वय २७ वर्षे आहे. मी शिक्षिका आहे. सतत उभे राहण्याने व फळ्यावर लिहिण्याने माझी मान, कंबर, पाठ नेहमी दुखते. त्यासाठी काही उपचार सांगावे. ॲलोपॅथिक उपचारांचा फारसा उपयोग झाला नाही.....
- सुनंदा भोळे, अहमदनगर
उत्तर - कुठलेही काम करायचे असले तर त्यासाठी पाठीच्या कण्यामध्ये ताकद असणे अत्यंत आवश्यक असते. म्हणून त्रास होत नसला तरी आयुर्वेदात आठवड्यातून १-२ वेळा तरी मान, पाठ, कंबर यांना संतुलन कुंडलिनी सिद्ध तेलासारखे तेल खालून वर हलक्या हाताने लावण्यास सुचवले आहे. आपणही हा उपचार आठवड्यातून ४-५ वेळा तरी करावा. तेल थोडे कोमट करून घेणे अधिक परिणामकारक ठरते. रोजच्या आहारात दुधाचा समावेश असावा. कपभर दुधात चमचाभर खारीक चूर्ण टाकून दूध उकळावे व त्यात शतानंत कल्पासारखा कल्प टाकून घ्यावे. आहारात तीळ व खोबऱ्याचा समावेश असावा, डिंकाचा लाडू खावा. आहारात सकाळ-संध्याकाळ घरी बनविलेल्या गाईच्या साजूक तुपाचा २-३ चमचे या प्रमाणात समावेश करावा. शरीरात वातदोष वाढू नये म्हणून आहारातून थंडगार पदार्थ, वाटाणा, चवळी, ढोबळी मिरची, वांगे, गवार या गोष्टी कटाक्षाने टाळलेल्या बऱ्या. संतुलन वातबल, संतुलन कॅल्सिसॅनसारख्या गोळ्यांचाही फायदा होताना दिसेल. सलगपणे खूप वेळ काम न करता मध्ये मध्ये काम थांबवून थोडे चालल्यास रक्ताभिसरण वाढून अशा प्रकारचा त्रास कमी व्हायला मदत मिळू शकते.
प्रश्र्न २ - माझे वय ३२ वर्षे आहे. गेली कित्येक वर्षे मी संतुलनने सांगितलेला सात्त्विक आहार घेण्याचा, तसेच दिनचर्येचे पालन करण्याचा प्रयत्न करते. बाहेरचा आहार अजिबात घेत नाही. तरीही माझे पचन व्यवस्थित होत नाही आणि पोट साफ होत नाही. कृपया मार्गदर्शन करावे..
- प्रियांका, नवी मुंबई
उत्तर - पचन व्यवस्थित झाल्याशिवाय नीट भूक लागणे, किंवा पोट साफ होणे शक्य नसते. त्यामुळे पाचकाग्नी व्यवस्थित कार्य करत आहे की नाही याकडे लक्ष देणे आवश्यक असते. रूक्ष-कोरडे अन्न खाणे, शरीरात अतिरिक्त उष्णता व कोरडेपणा असणे, यामुळेही पोट व्यवस्थित साफ होत नाही. आहारात सकाळ-संध्याकाळ घरी बनविलेल्या गाईच्या साजूक तुपाचा २-३ चमचे या प्रमाणात समावेश करावा. रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे साजूक तूप कोमट पाण्यातून घेण्याचा उपयोग होईल. पचनाच्या दृष्टीने सकाळ-संध्याकाळच्या भोजनानंतर संतुलन अन्नयोगसारख्या गोळ्या तसेच रात्रीच्या जेवणानंतर संतुलन सॅनकूल चूर्ण किंवा संतुलन अविपत्तिकर चूर्ण घेण्याचा उपयोग होईल. पित्ताचा त्रास जाणवत असल्यात संतुलन पित्तशांती या गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. दिवसभर प्यायचे पाणी उकळलेले, शक्यतो कोमट असावे. व्यवस्थित निदान करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आहार व उपचार दोन्ही समजून घेऊन त्यानुसार आचरण ठेवल्यास त्रास कमी व्हायला मदत होईल.
Web Title: Question And Answer Back Pain Health 13th May 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..