प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

मला पूर्वी कावीळ झाली होती. आता भूक वगैरे लागते, पण अंगात कसकस असल्यासारखे वाटते. अंग खूप दुखते. जेवण केल्यावर लघवी झाली तर ती पिवळसर रंगाची असते. तेलकट पदार्थ खाल्ल्यावर अजूनच गडद पिवळ्या रंगाची होते. कृपया मार्गदर्शन करावे...... नितीन जोशी
उत्तर - पुन्हा कावीळ होते आहे का, हे पाहण्यासाठी एकदा यकृताच्या तपासण्या करून घ्यायला हव्यात. रक्‍तात बिलिरुबिनचे प्रमाण वाढलेले असले तर त्यानुसार योग्य उपचार व पथ्य पाळण्यास सुरवात करता येईल. तत्पूर्वी तेलकट पदार्थ टाळणेच श्रेयस्कर होय. आहारात साळीच्या लाह्या, पातेल्यात शिजविलेला भात, तुपाची फोडणी देऊन केलेली मुगाची आमटी, साध्या फळभाज्या, ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी अशा पथ्यकर गोष्टींचा काही दिवस समावेश करण्याचा उपयोग होईल. पचनावर आलेला ताण कमी झाला की कसकस, अंग दुखणेसुद्धा कमी होईल. बरोबरीने बिल्वावलेह किंवा "बिल्वसॅन', पुनर्नवाघनवटी, कुमारी आसव क्र. 3, "सॅन उदर आसव' ही औषधे घेण्याचा तसेच नियमितपणे पादाभ्यंग करण्याचा फायदा होईल.

मला एपिलेप्सीचा त्रास आहे. अचानक चक्कर येते आणि पाच-दहा मिनिटांसाठी काय होते हे समजत नाही. यासाठी काय उपचार केले पाहिजेत?..... परकार आसिफ
उत्तर - एपिलेप्सी किंवा अपस्मार हा मेंदूशी संबंधित असा त्रास आहे. तो नियंत्रित ठेवण्यासाठी आणि बरा होण्यासाठी अशा दोन्ही बाजूंनी प्रयत्न करणे आवश्‍यक असते. यादृष्टीने तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यायला हवा. काही दिवस नियमित औषधे घेतली की चक्कर येणे थांबू शकेल व त्यानंतर ऍलोपॅथिक औषधांची मात्रा हळूहळू कमी करता येऊ शकेल. वैद्यांच्या सल्ल्याने औषधे घ्यायला हवीतच, पण बरोबरीने "संतुलन ब्रह्मलीन घृत', सारस्वतारिष्ट, "सॅन ब्राह्मी गोळ्या' घेणे, नियमित पादाभ्यंग करणे, रात्री झोपताना नाकात पंचेंद्रियवर्धन तेलाचे किंवा "नस्यसॅन घृताचे नस्य' करणे हे उपाय योजता येतील. आहारात घरी बनविलेले साजूक तूप किमान चार-पाच चमचे समाविष्ट करणेसुद्धा चांगले.

दिवाळी शरद ऋतूत येते, की हेमंत ऋतूमध्ये? कारण आयुर्वेदानुसार शरद ऋतू 15 ऑगस्ट ते 15 ऑक्‍टोबरपर्यंत असतो. कालनिर्णय कॅलेंडरमध्येसुद्धा 21-22 तारखेला हेमंत ऋतू प्रारंभ असे दिले आहे. कृपया खुलासा करावा..... आशा करंदीकर
उत्तर - एक गोष्ट समजून घ्यायला हवी, की आयुर्वेदाच्या मूळ ग्रंथांमध्ये कोठेही ऑगस्ट, ऑक्‍टोबर वगैरे महिन्यांचा उल्लेख असू शकत नाही. कारण हे ग्रंथ लिहिले गेले तेव्हा मराठी महिने प्रचलित होते. मराठी चैत्र-वैशाख वगैरे महिने आणि सध्याचे जानेवारी-फेब्रुवारी महिने यांची पक्की सांगड नसते. कारण मराठी महिने चंद्राच्या गतीवर आधारलेले असतात. तर सध्याचे 12 महिने 365 दिवसांमध्ये विभाजित केलेले असतात. आयुर्वेदानुसार शरद ऋतू हा आश्विन-कार्तिक महिन्यांचा असतो. आश्विनाची सुरवात घटस्थापनेने होते, त्यानंतर 15 दिवसांनी शरदपौर्णिमा येते. आश्विन महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा दिवस, त्यामुळे दिवाळी शरद ऋतूच्या मध्यात येते. असे असले तरी त्या त्या ऋतूमानात जसे हवामान असेल त्याप्रमाणे बदल करत जावा, असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे. कालनिर्णयमध्ये जो हेमंत ऋतू प्रारंभ असे दिले आहे ते सौरकालगणनेनुसार आहे. आयुर्वेदानुसार किंवा प्राचीन भारतीय शास्त्रानुसार महिने किंवा ऋतू हे चंद्राच्या गतीनुसार मोजले जातात म्हणून हा फरक येतो.

माझे वय 30 वर्षे असून मला कधी कधी पायात व पोटरीत वाक येतो. खूप वेळ दुखते आणि नंतर दुखणे पायाकडे जाते. तसेच माझ्या केसांना वाढ नाही, चेहरासुद्धा खूप काळवंडलेला आहे. हात-पाय-कंबरेत फार थकवा येतो. कृपया मार्गदर्शन करावे.
... भार्गवी राजपूत

उत्तर - पोटरीत वाक येण्याचा संबंध सहसा पोटाशी, तसेच वातदोषाशी असतो. यादृष्टीने रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण अंगाला अभ्यंग करणे उत्तम होय. यासाठी वातशामक औषधांनी सिद्ध केलेले "संतुलन अभ्यंग तीळ तेला'सारखे तेल वापरणे उत्तम होय. आहारात दूध, खारीक, खसखस, घरी बनविलेले साजूक तूप, पंचामृत, डिंकाचे लाडू यांचा समावेश असणे चांगले. रोज सकाळी धात्री रसायन किंवा "सॅन रोझ' किंवा च्यवनप्राशसारखे एखादे रसायन घेणेसुद्धा आवश्‍यक. काही दिवस "संतुलन वातबल गोळ्या' घेतल्या, तूप-साखरेसह "संतुलन प्रशांत चूर्ण' घेतले तर वातशमन होऊन वाक येणे, हातपाय, कंबर दुखणे, थकवा जाणवणे वगैरे सगळे त्रास कमी होतील.



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com