प्रश्नोत्तरे

question answer
question answer

माझे वय ३५ वर्षे आहे. बाळंतपणानंतर माझे वजन पूर्ववत झाले होते; मात्र आता वाढले आहे. जवळजवळ साठ किलोपर्यंत वाढले आहे. अशा अवस्थेत शतावरी कल्प घेतलेला चालतो का? बरोबरीने योगासने, व्यायाम वगैरे करायला हवे का? 
- वनिता

स्त्रीसंतुलनासाठी, उत्तम पचनासाठी, अग्निसंवर्धनासाठी शतावरी कल्प घेणे, नियमितपणे योगासने करणे आवश्‍यक असतेच. तसेच, शतावरी कल्प जर शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे शतावरीचा रस किंवा काढा करून, त्यात शुद्ध साखर मिसळून पाक करून, त्याचा कल्प केलेला असला तर त्यामुळे वजन वाढत नाही, उलट शरीरबांधा चांगला राहण्यास मदत मिळते. त्यामुळे शतावरी कल्प घेणे उत्तम होय, बरोबरीने वाढलेले वजन कमी व्हावे यादृष्टीने नियमित अभ्यंग करणे, रात्री फक्‍त द्रवाहार घेणे, प्यायचे पाणी उकळलेले व गरम असताना पिणे, स्नानाच्या वेळी मेदलेखन करणाऱ्या द्रव्यांपासून बनविलेले उटणे अंगाला चोळून लावणे या उपायांचा फायदा होईल. वजन अवाजवी वाढू नये, स्त्रीसंतुलन कायम राहावे यासाठी ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणेही उत्तम असते. 

माझ्या भावाला तीन वर्षांपासून पित्ताशयात खडा झाला होता. शस्त्रकर्म टाळण्यासाठी आयुर्वेदाचे औषध घेऊन पाहिले; पण फरक न पडल्याने गेल्या महिन्यात पित्ताशय काढून टाकले. तरीही पोट जड होणे, फुगणे वगैरे तक्रारी सुरू आहेत. फक्‍त पोट दुखणे पूर्ण बंद झाले आहे. त्रास पूर्ण बरा होण्यासाठी कृपया काही मार्गदर्शन करावे. 
- विवेक कुलकर्णी

प्रकृतीनुरूप आयुर्वेदिक औषध आणि खाण्याचे पथ्य सांभाळले तर खरे तर शस्त्रकर्म करण्याची व पित्ताशय गमावण्याची गरज पडत नाही. असो. आता अशा स्थितीत पचनाला मदत देण्याची गरज आहे. यादृष्टीने दोन्ही जेवणांनंतर ‘संतुलन अन्नयोग’ गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. जेवणापूर्वी लिंबाच्या रसातून अर्धा चमचा लवणभास्कर चूर्ण घेण्याचा उपयोग होईल. सकाळ- संध्याकाळ प्रवाळपंचामृत, ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. प्यायचे पाणी उकळून घेतलेले असणेसुद्धा चांगले. पित्ताशय काढून टाकल्यानंतर पचण्यास जड गोष्टी उदा. पनीर, चीज, श्रीखंड, वाटाणा, पावटा, राजमा, तळलेले पदार्थ, फ्रीजमध्ये साठवून ठेवलेले पदार्थ वगैरेंवर नियंत्रण ठेवणे चांगले होय.

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’चा नियमित वाचक आहे. यामुळे कुटुंबातील सर्वांचेच आरोग्य चांगले राहते असा आमचा अनुभव आहे. माझा प्रश्न असा आहे, की ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता भरून आणण्यासाठी गोळ्या घेणे हाच उपाय आहे का? की अभ्यंग स्नानाचा उपयोग होऊ शकतो?
- सूर्यकांत गायकवाड 

‘ड’ जीवनसत्त्वाची फारच कमतरता असेल, तर काही दिवसांसाठी अशा गोळ्या घ्यायला हरकत नसावी; मात्र त्या दीर्घकाळासाठी किंवा कायम घेता येत नाहीत. शिवाय, हे जीवनसत्त्व शरीराने स्वतः बनविणे आवश्‍यक असते. बाहेरून घेतलेल्या जीवनसत्त्वाचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. अंगाला अभ्यंग करून सकाळच्या वा संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ राहणे, सूर्यकिरणे तिरप्या कोनाने व त्वचेच्या जितक्‍या भागावर प्रत्यक्ष पोचतील, तितके ते ‘ड’ जीवनसत्त्वासाठी चांगले असते. म्हणून आपल्याकडे पूर्वी सकाळ- संध्याकाळ सूर्याला अर्घ्य देणे, सकाळ- संध्याकाळ अंगणात दिवा लावणे, रांगोळी काढणे अशा पद्धती होत्या. सध्या हे जमले नाही तरी अंगाला अभ्यंग तेल लावून सूर्य फार प्रखर होण्याआधी, म्हणजे साडेआठ- नवाच्या आत सूर्यप्रकाशात पूर्वेकडे तोंड करून सूर्यनमस्कार करता येतील. शक्‍य असेल तेव्हा संध्याकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात चालायला जाता येईल.  

‘सकाळ’ची ‘फॅमिली डॉक्‍टर’ ही आरोग्यविषयक पुरवणी खूप वाचनीय असते. गेल्या एक-दीड वर्षापासून मला ढेकर येण्याचा व खालून वायू सरण्याचा त्रास होतो आहे. यामुळे चारचौघांत जाण्यास अडचणीचे वाटते. मी नियमित व्यायाम करतो, आयुष्य शिस्तबद्ध आहे. कृपया आपण काही उपाय सुचवावा.
- अनंत जोशी 

काही दिवसांसाठी गव्हाऐवजी तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, वरई या धान्यांचा वापर, तसेच तेलाऐवजी घरी बनविलेल्या साजूक तुपाचा वापर करून पाहता येईल. जेवताना उकळून घेतलेले गरम पाणी पिण्याचा उपयोग होईल. जेवणांनंतर ‘संतुलन अन्नयोग’ गोळ्या घेणे, रात्री झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याचा उपयोग होईल. सकाळी उठल्यानंतर पोटाला ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ लावून गरम पाण्याच्या पिशवीने शेक करण्याचाही फायदा होईल. या उपायांचा फायदा होईलच, तरीही एकदा तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊन प्रकृतीनुसार नेमकी औषधे सुरू करणे चांगले. 

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे आणि त्याचा मला खूप फायदाही झाला आहे. माझा नातू एक वर्षाचा आहे. तब्येतीने तो चांगला आहे; परंतु या वर्षात त्याला दोन- तीन वेळा फिट आल्यासारखे झाले. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने ज्या काही तपासण्या केल्या त्यात काहीच दोष सापडला नाही. तो चालण्याचा प्रयत्न करत नाही, त्यामुळे डॉक्‍टरांनी फिजिओथेरपीचा सल्ला दिला आहे. कृपया आपण मार्गदर्शन करावे.
- दीप्ती रेडेकर 

फिजिओथेरपी करायला हरकत नाही, बरोबरीने नातवाला दिवसातून दोन वेळा म्हणजे स्नानाच्या पूर्वी आणि रात्री झोपण्यापूर्वी ‘संतुलन बेबी मसाज तेला’चा अभ्यंग करण्याचा उपयोग होईल. कण्याला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. तपासण्यांमध्ये काही दोष नाही हे चांगलेच आहे, तरीही असा त्रास पुन्हा होऊ नये यासाठी त्याला पाव-पाव चमचा ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ देणे, रात्री झोपण्यापूर्वी नाकात साजूक तुपाचे किंवा ‘नस्यसॅन घृता’चे थेंब टाकणे चांगले. त्याच्या आहारातही दोन-तीन चमचे साजूक तुपाचा अंतर्भाव करणे चांगले. मेंदूचा विकास व्यवस्थित व्हावा यादृष्टीने सुवर्णसिद्ध जल देणे, तसेच ‘संतुलन बालामृत’ सुरू करणेसुद्धा श्रेयस्कर. दर तीन महिन्यांनी जंतांचे औषध देणे इष्ट ठरेल. या वयात कोणतेही असंतुलन शरीरात थोडेही राहू नये यासाठी वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणेही आवश्‍यक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com